Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 07 December 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ डिसेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण
दिनानिमित्त देशभरातून आदरांजली; मराठवाड्यात विविध कार्यक्रमांद्वारे
महामानवास अभिवादन
·
न्यायालयीन निर्णय प्रक्रियेची जागा कोणतंही तंत्रज्ञान
घेऊ शकत नाही-सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
·
विमान रद्द प्रकरणी प्रलंबित प्रवासभाडं विनाविलंब परत
देण्याचे इंडिगोला निर्देश
आणि
·
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना जिंकून
भारताचा दोन – एक असा मालिका विजय
****
भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काल राज्यासह देशभरातून
आदरांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती
सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना
आदरांजली वाहिली. संसद भवनात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह संसद सदस्यांनी बाबासाहेबांच्या
तैलचित्राला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं.
नागपूर
इथं विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन केलं. दीक्षाभूमी, संविधान चौक,
शांतिवन चिचोली आदींसह शहरातल्या विविध बुद्ध विहारांमध्ये हजारो अनुयायींनी
डॉ. आंबेडकरांना अभिवादन केलं.
****
मुंबईत
दादरच्या चैत्यभूमी इथं राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी
बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं. इंदू मिलच्या जागेवर सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम पुढल्या वर्षी सहा डिसेंबरच्या आत पूर्ण करण्याची ग्वाही
फडणवीस यांनी यावेळी दिली. बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आज भारत जगातली चौथ्या क्रमांकाची
अर्थव्यवस्था ठरला असून, लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार
असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश
आंबेडकर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, आनंदराज आंबेडकर यांनीही चैत्यभूमीवर
जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं.
****
मराठवाड्यात
विविध कार्यक्रमांतून महामानवाला आदरांजली अर्पण करण्यात आली.
Voice Cast
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रवींद्र केसकर यांचं विशेष व्याख्यान झालं. ‘बाबासाहेबांच्या
जीवनातील दोन सुवर्ण पाने-माता रमाई आणि माईसाहेब’ या विषयावर केसकर यांनी मार्गदर्शन
केलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतही बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करून अभिवादन करण्यात आलं. विविध पक्ष संघटनांच्या वतीनेही बाबासाहेबांच्या पुतळ्याला
पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
लातूर जिल्ह्यातल्या पानगावात
बाबासाहेबांच्या अस्थींना अभिवादन करण्यासाठी शेकडो अनुयायी दाखल झाले होते. बाबासाहेब
यांच्या अंत्यविधीनंतर काही तरुणांनी त्यांच्या अस्थी पानगाव इथं आणल्या होत्या. महाराष्ट्रासह
कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेशातून हजारो अनुयायांनी
बाबासाहेबांच्या अस्थींना अभिवादन केलं.
धाराशिव इथं सामाजिक समरसता
मंच, केसरीया प्रतिष्ठान, राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. बहुजन विद्यार्थी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून
एक वही, एक पेन अभियान राबवण्यात आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात या उपक्रमास भीम अनुयायांनी मोठा प्रतिसाद
दिला.
नांदेड इथं डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, महापालिका
आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
बीड, जालना,
परभणी आणि हंगोली जिल्ह्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला
अभिवादनासह विविध कार्यक्रम घेण्यात आले.
****
कोणतंही
तंत्रज्ञान न्यायालयीन निर्णय प्रक्रियेची जागा घेऊ शकत नाही, असं सर्वोच्च
न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयीन प्रक्रियेत एआय आणि मशिन लर्निंगचं नियमन करण्याची
मागणी करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला
बागची यांच्या पीठानं हे मत नोंदवलं. न्यायालयीन निर्णय प्रक्रियेला नियंत्रित करण्याची
परवानगी एआयला दिली जाणार नाही, असंही सरन्यायाधीशांनी नमूद केलं.
न्यायाधीशांचं स्वातंत्र्य आणि मानवी विवेकबुद्धीचं भारतीय न्यायव्यवस्थेतलं स्थान
अबाधित राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
****
नागरी हवाई
वाहतूक मंत्रालयाने इंडिगो कंपनीला सर्व प्रवाशांच्या तिकिटांचे प्रलंबित पैसे विनाविलंब
परत देण्याचे निर्देश दिले आहेत. रद्द केलेल्या किंवा विस्कळीत झालेल्या सर्व उड्डाणांसाठी
परतफेड प्रक्रिया आज रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मंत्रालयाने
दिले आहेत. उड्डाण रद्द झाल्यामुळे ज्या प्रवाशांचा प्रवास प्रभावित झाला, त्यांच्यासाठी
कोणतंही पुनर्निर्धारण शुल्क आकारू नये, असे निर्देश विमान कंपन्यांना
देण्यात आले आहेत. तसंच परतफेड प्रक्रियेत कोणताही विलंब केल्यास किंवा अनुपालन न केल्यास
त्वरित नियामक कारवाई केली जाईल असा इशाराही मंत्रालयाने दिला आहे. उड्डाण रद्द झाल्यामुळे
किंवा विलंबामुळे दूर गेलेलं प्रवाशांचं सामान शोधून प्रवाशांच्या निवासस्थानी किंवा
त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पुढील ४८ तासांच्या आत पोहोचवलं जाईल, याची खातरजमा करण्याचे निर्देशही मंत्रालयाने दिले आहेत.
****
गोव्याच्या
अरपोरा इथं एका नाईट क्लबमध्ये सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत २३ जणांचा मृत्यु
झाला. यात हॉटेलच्या स्वयंपाकघरात काम करणारे कर्मचारी आणि चार पर्यटकांचा समावेश आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पहाटे घटनास्थळी पोहचून पाहणी केली. आग विझवण्याचं
काम पूर्ण झालं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
दक्षिण
आफ्रिकेविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना जिंकून भारताने तीन सामन्यांची मालिकाही दोन
– एक अशी जिंकली. काल विशाखापट्टणम इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा
नऊ गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २७१ धावांचं
आव्हान दिलं. भारतीय संघानं ते ४० व्या षटकातच एक गडी गमावत पूर्ण केलं. यशस्वी जयस्वालनं
११६, तर विराट कोहलीनं ६५ धावा केल्या. यशस्वी सामनावीर तर विराट मालिकावीर
पुरस्काराचा मानकरी ठरला.
****
भारतीय
दिव्यांग महिला क्रिकेट संघाची उप कर्णधार
गंगा कदम हिचा काल हिंगोली जिल्ह्यात
फुटाणा या तिच्या मूळ गावी जाहीर सत्कार करण्यात आला. पालकमंत्री नरहरी झिरवाळ, खासदार नागेश
पाटील आष्टीकर, यांच्यासह गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढून गंगा
कदमचा सत्कार केला. वसमतचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या वतीने गंगा कदम हिला एक लाखाचं
पारितोषिक देण्यात आलं.
****
ज्येष्ठ
सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातल्या ससून
रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असून ते अतिदक्षता विभागात
असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल रुग्णालयात जाऊन
आढाव यांची भेट घेतली.
****
कुंभमेळ्यासाठी
नाशिक शहरातल्या तपोवन इथल्या ५४ एकरातील एक हजार आठशे झाडं तोडण्याचा नाशिक महापालिकेचा
प्रस्ताव स्थगित करण्यात आला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली.
वृक्षतोडीच्या या प्रस्तावाला गेल्या १५ दिवसांपासून पर्यावरणप्रेमींसह समाजाच्या सर्वच
स्तरातून विरोध होत होता.
****
सातारा
इथं होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ लेखिका
आणि विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार असून, समारोप सोहळ्यास
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती असणार
आहे. महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती
दिली. प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक ते चार जानेवारी
२०२६ दरम्यान सातारा इथं हे संमेलन होत आहे.
****
परभणी जिल्ह्यात
रक्ताचा तुटवडा जाणवत असून, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या
संकल्पनेतून जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने काल रक्तदान
शिबीर घेण्यात आलं. यावेळी २९ जणांनी रक्तदान केलं.
****
राज्यातल्या
नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी
ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजनांचा समान लाभ मिळावा, अशी मागणी
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली. लोकसभेत शून्य प्रहरात त्यांनी हा मुद्दा
उपस्थित केला. नगरपालिका हद्दीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या हजारो कुटुंबांची उपजीविका
शेतीवर अवलंबून असूनही, फक्त नगरपालीका क्षेत्रात वास्तव्यास
असल्यामुळे त्यांना अनेक योजनांमधून वगळल जातं, याकडे निंबाळकर
यांनी लक्ष वेधलं.
****
लातूर जिल्ह्याच्या
औसा तालुक्यातल्या किल्लारी इथला निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना कालपासून सुरू झाला.
भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी कारखाना सुरू होण्यापूर्वी, कारखाना ते
ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरापर्यंत तीन किलोमीटर दंडवत घालत आपला नवस पूर्ण केला.
****
येत्या
१३ डिसेंबर रोजी राज्यभर होणाऱ्या लोकअदालतीमध्ये ई-चलन प्रकरणांची तडजोड स्वीकारली
जाणार नाही, असं स्पष्टीकरण वाहतुक शाखेचे अपर पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाकडून
देण्यात आलं आहे. काही सामाजिक संपर्क माध्यमांवर लोकअदालतीत ई-चलन दंडात सवलत मिळणार
असल्याची चुकीची माहिती पसरवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा करण्यात आला
आहे.
****
प्रत्येकाने
लहानपणापासून आध्यात्माची कास धरल्यास कुटुंब विभक्त होणार नाहीत, असं,
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. काल
शहरातल्या मिटमिटा इथल्या श्री स्वामी समर्थ सेवा आणि अध्यात्मिक बाल संस्कार केंद्रच्या
वतीने घेतलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
****
राज्यात
काल सर्वात कमी नऊ पूर्णांक सहा अंश सेल्सियस तापमान नागपूर इथं नोंदवलं गेलं. त्या
खालोखाल यवतमाळ इथं १० पूर्णांक दोन, मालेगाव – ११ पूर्णांक चार, धाराशिव – १२ अंश, छत्रपती संभाजीनगर तसंच परभणी इथं
साडे १२ अंश, बीड इथं १२ पूर्णांक आठ अंश सेल्सियस तापमानाची
नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment