Friday, 28 February 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.02.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 February 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      तीर्थराज प्रयाग सर्वांना एकता आणि समरसतेची प्रेरणा देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      प्रशासनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना, १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा घेतला आढावा

·      बसस्थानकं आणि आगारांचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

·      मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रशासनाला सूचना

आणि

·      मराठी भाषा गौरव दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

****

तीर्थराज प्रयाग आपल्याला एकता आणि समरसतेची प्रेरणा देत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उत्तरप्रदेशात प्रयागराज इथल्या महाकुंभाच्या सांगतेच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या लेखात पंतप्रधानांनी ही बाब नमूद केली. संपूर्ण जगात अशा विराट आयोजनाची तुलना नसल्याचं सांगत, कुंभमेळ्याचं हे नियोजन व्यवस्थापन क्षेत्रातल्या व्यावसायिकांसाठीही कुतुहलाचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या महाकुंभातून देशवासियांनी भारताच्या विराट सामर्थ्याचं जगाला दर्शन घडवलं असून, याच आत्मविश्वासातून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी मार्गक्रमण करण्याचं आवाहन त्यांनी केलं. तरुण पिढीचा कुंभमेळ्यातला सहभाग हा समाधानकारक असल्याची भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.

****

लोकाभिमुखता, गतिशीलता आणि पारदर्शकता या सुप्रशासनामध्ये अतिशय महत्त्वाच्या बाबी असून, सुप्रशासन राबवताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे १०० दिवसांच्या आराखड्यानुसार होत असलेल्या कामांचा काल आढावा घेताना ते बोलत होते. विविध विभाग आणि पातळीवर उत्कृष्ट काम करत असलेल्या १५ विभागांच्या कामांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं. मंत्रालयापासून गाव पातळीपर्यंत विविध कार्यालयांमधल्या सर्व अधिकाऱ्यांनी नागरिकांना सेवा सुविधांचा लाभ सुलभतेने मिळवून देण्यासाठी तसंच त्यांचं समाधान होईल यासाठी प्रयत्न करावेत, असं फडणवीस यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या अकृषी विद्यापीठांमधल्या अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेला शासनाने मान्यता दिली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता येण्यासाठी यापुढे नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार असून, शैक्षणिक क्रेडेन्शियल तसंच उमेदवारांची मुलाखतीमधली कामगिरी गृहीत धरण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

****

पुण्यात स्वारगेट बसस्थानकातल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी शिरुर तालुक्यातून अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात एस.टी महामंडळाची काल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. राज्यातल्या सर्वच बसस्थानक आणि आगारांचं तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसंच एसटी आरटीओ परिसरातल्या भंगार वाहनांची १५ एप्रिलपूर्वी विल्हेवाट लावावी, एसटी महामंडळाच्या सर्व बसमध्ये CCTV लावावेत, तसंच बसस्थानकावर महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. महिलांनी कोणतीही शंका न बाळगता एसटीतून प्रवास करावा, असं आवाहन सरनाईक यांनी केलं. ते म्हणाले...

‘‘लाडक्या बहिणींना माझी परिवहन मंत्री म्हणून विनंती आहे, आपला प्रवास ज्या पद्धतीनं तुम्हाला पूर्वीच्या माध्यमातून करत होतात, तसाच करा. पूर्ण सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभं आहे. जर आमच्या परिवहन विभागामध्ये आय पी एस अधिकाऱ्यांची नेमणूक झाली तर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातनं पोलिसांच्या माध्यमातून सगळी सुरक्षित यंत्रणा कार्यान्वित होईल. एस टी डेपो मध्ये आमच्या एस टी महामंडळाच्या जागेमध्ये ज्या ज्या ठिकाणी बसेस नव्हे तर ज्या गाड्या आर टी ओ नं जप्त केलेल्या आहेत, त्याचं सुद्धा पूर्णपणे पंधरा एप्रिलच्या आत पूर्णपणे विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात आला.’’

 

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लासूर स्टेशन इथं दोन आठवड्यापूर्वी झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येबाबत कठोर पावलं उचलण्याचे, तसंच दोषींवर कठोर शासन करण्याचे निर्देश, महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिले आहेत. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रशासकीय दिरंगाई प्रकरणी कारवाईचा इशाराही मेश्राम यांनी दिला. ते म्हणाले,

‘‘शोषित बांधवांना विनंती करतो की त्यांनी कोणत्याही पद्धतीच्या शोषणाला बळी न पडता, त्यांच्याविरूध्द जो काही अन्याय होत असेल, त्याच्याविरूद्ध आवाज आपला बळकट करावा. समाजानी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं व्हावं. आणि जर प्रशासन आपल्या कामामध्ये दिरंगाई किंवा कुचराई दाखवत असेल, तर आयोग त्यांच्यावर         भविष्यकाळामध्ये कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी कटीबद्ध आहे.’’

 

****

परभणी इथं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, एका आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी तपास सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी दिली. या घटनेच्या निषेधार्थ काल परभणी शहरात सकल मातंग समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

****

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीडच्या विशेष मोक्का न्यायालयात सीआयडीने दीड हजार पानी दोषारोप पत्र दाखल केलं आहे. संतोष देशमुख यांची गेल्या नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.

****

मराठवाड्यातला दुष्काळ संपवण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महत्त्वाचा असून, त्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. शिंदे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा केली. राज्यातल्या प्रत्येक गावाला स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पुरवठा, शाश्वत स्वच्छता यासोबतच ‘हर घर जल’ योजनेद्वारे १०० टक्के घरगुती नळ जोडणीचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.

****

मराठी भाषा गौरव दिन काल सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

मराठी भाषेच्या गौरवार्थ तसंच भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना काल मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. यावेळी २०२४ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत रा रं बोराडे यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या कन्या प्रेरणा दळवी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नामवंत प्रकाशन संस्‍थेसाठी श्री. पु. भागवत पुरस्कार पुण्याच्या ज्योत्स्ना प्रकाशनला, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. रमेश सुर्यवंशी यांना, तर मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार भीमाबाई जोंधळे यांना प्रदान करण्यात आला.

नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात शिरवाडे वणी हे ज्येष्ठ साहित्यिक वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचं गाव आता कवितांचं गाव म्हणून ओळखलं जाणार आहे. काल शिरवाडे-वणी इथं झालेल्या कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली.

भाषा गौरव दिनी छत्रपती संभाजीनगर इथं काल कविसंमेलनं घेण्यात आलं. मराठवाडा साहित्य परिषद तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालेल्या या संमेलनात अनेक कवींनी आपल्या रचना सादर केल्या.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथलं बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमानं दिला जाणारा आरती प्रभू पुरस्कार, यंदा प्रसिद्ध नाटककार प्रशांत दळवी यांना जाहीर झाला आहे. २१ हजार रूपये, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या माकणी इथल्या प्रहार दिव्यांग उत्पादक गटाने २०१५ पासून सुरू केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून एलईडी बल्ब निर्मितीचा व्यवसाय सुरू केला आहे. उमेद अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी व्यवसाय करण्यासंदर्भात त्यांना प्रोत्साहन दिलं. दिव्यांगत्वावर मात करत आत्मनिर्भर होत आलं, याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं. या बचत गटाचे सदस्य महंमद अली अत्तार यांनी याबाबत अधिक माहिती दिली,

 

बाईट – महंमद अली अत्तार

****

लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या विविध विकासकामांचं भूमिपूजन काल पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. अहमदपूर इथल्या तालुका पशुचिकित्सालय इमारतीचं भूमिपूजन आणि रस्ते विकास कामांचा यात समावेश आहे.

****

हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यात येहळेगाव-सोळंके इथं युवकांनी जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या कोरड्या जलकुंभावर चढून आंदोलन केलं. गावात पाणी पुरवठा होत नसल्याबद्दल जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीची कुठलीही दखल घेतली गेली नसल्यानं, हे आंदोलन करण्यात आलं.

****

लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त काल गौरीशंकर मंदिरापासून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत मानाच्या काठ्याची मिरवणूक काढण्यात आली. अश्व पथक, लेझीम पथक, मुला-मुलींचं स्वतंत्र काठी पथक आणि विविध देखाव्यांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 06.40 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 15 August 2025 Time 6.40 AM to 6.50 AM Language Marathi आकाशवाणी ...