Sunday, 23 February 2025

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 February 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.

****

विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण संस्थेच्या कायम संपर्कात राहावं-डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात उपराष्ट्रपतींचं आवाहन

सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणातून पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं भारताचं लक्ष्य साध्य होईल -  सहकार मंत्री अमित शहा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून आज देशवासियांशी संवाद साधणार 

दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप

आणि 

आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत - पाकिस्तान लढत

विद्यार्थ्यांनी दीक्षांत सोहळ्यानंतरही आपल्या शिक्षण संस्थेच्या कायम संपर्कात राहण्याचं आवाहन, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते काल बोलत होते. धनखड यांच्या सुविद्य पत्नी डॉ सुदेश धनखड, कुलपती तथा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, कुलगुरू डॉ विजय फुलारी, खासदार डॉ भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. माजी विद्यार्थी हे शिक्षण संस्थेची खरी शक्ती असतात, आणि त्यांच्याकडून संस्थेला सर्वप्रकारे मिळणारं योगदान हे संस्थेच्या प्रगतीत भर घालत असल्याचं, उपराष्ट्रपतींनी नमूद केलं. ते म्हणाले... 

  आंतरराष्ट्रीय घुसखोरी, धर्मस्वातंत्र्य, लोकशाहीची सुरक्षा, जागतिक पातळीवर भारताची उज्ज्वल प्रतिमा, पायाभूत सुविधांचा विकास, आदी मुद्यांवरही उपराष्ट्रपतींनी भाष्य केलं. आज भारतात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून, या संधींच्या आधारे तरुणांच्या आकांक्षाना पंख मिळू शकतात, असा विश्वास उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला, ते म्हणाले... 

पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवीप्राप्त विद्यार्थी तसंच पीएच.डी संशोधक अशा एकूण ५६ हजार १२२ विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात पदवी घेण्यासाठी अर्ज केले होते. या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात पदवी प्रदान करण्यात आली. 

या कार्यक्रमापूर्वी उपराष्ट्रपती तसंच कुलपतींनी एक पेड मां के नाम मोहिमेअंतर्गत विद्यापीठ नाट्यगृह परिसरात वृक्षारोपण केलं. 

शहरातल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमालाही उपराष्ट्रपतींनी संबोधित केलं. संविधानाने दिलेले मौलिक अधिकार वापरतांना, मौलिक कर्तव्यांची जाणीव ठेवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आणिबाणीच्या आठवणींना उजाळा देत, या पार्श्वभूमीवर देशाच्या भावी पिढीला संविधानाचं महत्त्व विशद करण्यात संविधान जागर अभियानाचं महत्त्व मोठं असल्याचं, उपराष्ट्रपतींनी नमूद केलं. 

दरम्यान, आपल्या या दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी वेरुळ इथं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन वेरुळ लेण्यातल्या कैलास लेणीला भेट दिली. छत्रपती संभाजीनगर इथला दौरा आटोपून उपराष्ट्रपतींनी सायंकाळनंतर दिल्लीकडे प्रस्थान केलं. 

****

सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणातून पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं भारताचं लक्ष्य साध्य होईल, असा विश्वास सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात जनता सहकारी बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात ते काल बोलत होते. बँकेच्या यशस्वी वाटचालीचा शहा यांनी गौरवपूर्ण शब्दांत आढावा घेतला.. 

“1988 में शेड्यूल सरकारी बैंक बना 2005 में कोर बैंकिंग को एक्सेप्ट किया 2012 में मल्टी स्टेट शेड्यूल कोऑपरेटिव बैंक बना और  देश  की  सबसे  पेह्ली  कोऑपरेटिव  डिमेट  संस्था  शुरू करने  का  सहभाग  भी   हमारी  जनता   को ऑपरेटिव  बैंक  को  मिला 71 ब्रांचेस दो एक्सटेंशन काउंटर 15200 से अधिक व्यापार 1 लाख 75 हजार सदस्य और 10 लाख से ज्यादा संतुष्ट ग्राहक एक बैंक नहीं है एक बहुत बड़ा परिवार हुआ है”

पुण्यात बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात शहा यांच्या उपस्थितीत, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या दहा लाख लाभार्थ्यांना, या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण तसंच वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचं वितरण करण्यात आलं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलतांना, अनुदानाच्या रकमेत ५० हजार रुपये वाढ करण्याचा तसंच प्रत्येक घराला सौर ऊर्जा संयत्र देण्याचा निर्णय जाहीर केला. या योजनेच्या उर्वरित लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता येत्या १५ दिवसांत देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. 

राज्यात २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये हा कार्यक्रम थेट दाखवण्यात आला. विविध ठिकाणच्या २० लाख लाभार्थ्यांना यावेळी ठिकठिकाणी मंजुरीचं पत्र देण्यात आलं. 

छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत तापडिया नाट्य मंदिरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

नांदेड इथं खासदार अजित गोपछडे यांच्या हस्ते जिल्ह्यातल्या एक लाख २० हजार लाभार्थीना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत पहिला हप्ता वितरीत करण्यात आला.

लातूर इथंही जिल्ह्यातल्या ४६ हजार ८६८ लाभार्थीना मंजुरी पत्र आणि २४ हजार ४६६ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११९ वा भाग असेल. आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यावरून या कार्यक्रमाचं सकाळी ११ वाजता थेट प्रसारण केलं जाणार आहे. 

****

दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होणार आहे. काल दुसऱ्या दिवशी "मनमोकळा संवाद - मराठीचा अमराठी संसार" या विषयावर परिसंवाद रंगला. भाषिक विविधता हा अडथळा न ठरता समृद्धीचे साधन ठरू शकतो, असा सकारात्मक सूर या परिसंवादातून उमटला. "मराठी पाऊल पडते पुढे" तसंच 'बृहन्महाराष्ट्रातील मराठी जीवन आणि साहित्य' या विषयावर पार पडलेल्या परिसंवादालाही साहित्य रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. 

****

१९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं काल छत्रपती संभाजीनगर इथं उद्घाटन झालं. त्यापूर्वी औरंगपुरा भागातून साहित्यदिंडी काढण्यात आली. पारंपरिक ढोल ताशाच्या निनादात आदिवासी नृत्यावर फेर धरलेल्या नागरिकांनी शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं. संमेलनाध्यक्ष अशोक राणा यांनी छत्रपती संभाजीनगरात भरलेल्या या संमेलनाचं अध्यक्षपद भुषवतांना आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. आमखास मैदानावर मलिक अंबर साहित्य नगरीत भरलेल्या या संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

****

सामाजिक आणि आर्थिक विषमता संपवून समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत न्यायदानाचं कार्य जलदगतीने आणि कमी खर्चात व्हावं, असा आशावाद सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केला आहे. काल हिंगोली इथं स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालय तसंच न्यायालयीन इमारतीचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. 

****

आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत - पाकिस्तान सामना होणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर दुपारी अडीच वाजता हा सामना सुरु होईल.  

****


No comments: