Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 September
2024
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
·
युवकांचा सहभाग वाढवल्यास सहकारी संस्थांचा कायापालट शक्य, राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांचं प्रतिपादन
·
राष्ट्रपतींच्या
उपस्थितीत आज मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाचा समारंभ
·
डिजीटल कृषी योजना आणि
मुंबई-इंदूर नवीन रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी
·
मराठवाड्यात २८४ मंडळात अतिवृष्टी, नुकसानीचे तत्काळ पंचनामे
करण्याचे सरकारचे प्रशासनाला निर्देश
आणि
·
राज्य सरकारचे शिक्षक पुरस्कार
जाहीर, मराठवाड्यातल्या २१ शिक्षकांचा
समावेश
****
सहकार क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवल्यास, प्रशासन आणि व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढून सहकारी संस्थांचा कायापालट करता येणं शक्य असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या काल कोल्हापूर जिल्ह्यात वारणानगर इथं, वारणा महिला सहकारी समुहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात बोलत होत्या. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सहकार हे सामाजिक शक्तीचा योग्य वापर करून घेणारं क्षेत्र आहे, मात्र या क्षमतेचा पूर्ण वापर करून घेण्यावर राष्ट्रपतींनी भर दिला. बदलत्या काळासोबतच सहकार क्षेत्रानंही बदलण्याच्या गरजेकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुण्यात सिम्बायोसिस
आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभाला, तसंच मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी
वर्षाच्या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. उद्या चार तारखेला लातूर
जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उदगीरमध्ये महाराष्ट्र सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थींच्या मेळाव्याला देखील त्या संबोधित करणार आहेत.
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये गुंतवणुकीच्या डिजिटल
कृषी योजनेला मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कृषी विज्ञान
केंद्रांच्या बळकटीकरणासाठी एक हजार २०२ कोटी रुपयांची आणि नैसर्गिक साधनसंपत्ती
व्यवस्थापनासाठी एक हजार ११५ कोटी रुपयांची तरतूद करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं
काल मान्यता दिली. मुंबई-इंदूर दोन शहरं जोडणारा तीनशे नऊ किलोमीटर लांबीचा नवीन
रेल्वे मार्ग निर्माण करण्यासाठी १८ हजार ३६ कोटी रुपयांच्या निधीलाही या बैठकीत
मान्यता देण्यात आली.
****
मराठवाड्यात सर्वत्र जोरदार पाऊस कायम असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. विभागातल्या २८४ मंडळात अतिवृष्टी झाली असून, ६३ गावांना फटका बसला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक
पाऊस होत आहे.
दरम्यान, मराठवाड्यातल्या विविध
जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा
घेतला असून, नुकसानीचे तत्काळ पंचनामे
करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
**
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं, अनेक रस्त्यांवरचे पूल पाण्याखाली गेले, काही गावांमध्ये पुराचं पाणी वसाहतींमध्ये शिरल्याचं वृत्त आहे. जिल्ह्यातलं जायकवाडी धरण ९० टक्के भरलं असून, धरणात १३ हजार ६९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे. धरणातून गोदावरी नदीपात्रात
कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल या धरणाचं जलपूजन केलं. धरणाच्या उजव्या कालव्यातून
माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्यात येत आहे.
**
बीड जिल्ह्यात मांजरा धरणाचा पाणीसाठा सुमारे पन्नास
टक्के झाला आहे. बीड शहरातल्या बिंदुसरा नदीच्या काठावरील नागरिकांनी
सद्य:स्थितीत सतर्कता बाळगण्याचं आवाहन, आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे. काल अधिकाऱ्यांसोबत पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. शहरातला चांदणी चौक ते जुना बाजारवेस पर्यंतचा जुना पुल
रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या २४ तासात बीड जिल्ह्यात ६१ महसुली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, खरीप पिकांचं नुकसान झालं आहे.
**
जालना जिल्ह्यातल्या आठही तालुक्यात नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक गावांना जोडणाऱ्या
पुलांवरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद आहे. जिल्ह्यातल्या २९ मंडळात
अतिवृष्टीची नोंद झाली असून, लघु आणि मध्यम प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. घनसावंगी
तालुक्यातल्या बाणेगाव इथले शेतकरी शिवाजी शिंदे यांचा काल नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
**
परभणी जिल्ह्यात ५२ मंडळांपैकी ५० मंडळांत अतिवृष्टी होऊन पिकांचं मोठं नुकसान
झालं आहे. मदत आणि बचावासाठी भारतीय सैन्य दलाची तुकडी दाखल झाली असून, या तुकडीनं सेलू, जिंतूर आणि सोनपेठ तालुक्यांतल्या गावांमधून अनेक
लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. पाथरी तालुक्यात बोरगव्हाण इथं पुरामुळे एका शेतातल्या
शेळीपालन केंद्रातल्या सुमारे नव्वद शेळ्या आणि चारशे कोंबड्या दगावल्या, तर शेती साहित्य वाहून गेलं. महसूल विभागानं या नुकसानीचा तत्काळ पंचनामा केला. मानवत तालुक्यात वझुर गावात रात्री मुक्कामी असलेली बस काल पुराच्या पाण्यात वाहून गेली.
**
हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे शेवाळा गावातल्या दीडशे ते
दोनशे घरांमध्ये पाणी शिरलं, तर कळमनुरी तालुक्यात वसमत ते उमरा फाटा रस्त्यावर कयाधू नदीवरच्या पुलाचा काही भाग पुरामुळे तुटला आहे. चार गावातून ३९ जणांना एनडीआरएफ च्या जवानांच्या मदतीने पुराच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या वायरलेस टॉवरवर काल सकाळी वीज कोसळली, सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
**
लातूर जिल्ह्यातल्या १० पैकी सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहे.
**
नांदेड जिल्ह्यात ९३ पैकी ४५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेतीचं
दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची
माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
यांनी दिली. उंचाडा इथं कयाधु नदीच्या परीसरात अडकलेल्या २५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात
आलं. पावसामुळे २५ जनावरं दगावली
असून, अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली
आहे. विष्णुपुरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. जुन्या नांदेडमधल्या संत दासगणू महाराज पुलावरून पाणी वाहत असल्यानं, हा मार्ग काल वाहतुकीसाठी बंद केला होता. नांदेड शहरात अनेक वसाहतींमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं, महापालिकेनं विविध प्रभागांमध्ये १५ निवारा केंद्रं उघडली आहेत.
**
धाराशिव जिल्ह्यात १६ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातले बहुतांश
नदी, नाले, ओढे तसंच तेरणा नदी भरून वाहत
आहे. यामुळे तेर मुरुड आणि धाराशिवहून लातूरकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली
होती.
सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या पीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेळीच
तक्रारी कराव्यात, असं आवाहन बीड जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य
शिक्षक गुणगौरव पुरस्कार काल जाहीर झाले. यावेळी विविध प्रवर्गांमधे ११० जणांची पुरस्कारांसाठी
निवड झाली आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या २१ शिक्षकांचा समावेश आहे. पुरस्कार वितरण येत्या पाच
सप्टेंबरला शिक्षक दिनी मुंबईत होणार आहे.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची पदकसंख्या पंधरा झाली आहे. यात तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि सात
कांस्यपदकांचा समावेश आहे. काल सुमीत अंतीलनंत भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक
पटकावलं. तर, पुरुष बॅडमिंटन एकेरी
स्पर्धेत नितेश कुमारनं सुवर्ण आणि सुहास यतीराजनं रौप्य पदक जिंकलं. महिला एकेरी
बॅडमिंटन स्पर्धेत तुलसीमती मुरुगसेन हिनं रौप्य, मनीषा रामदास आणि नित्यश्री सिवन यांनी कांस्यपदक, तर मिश्र तिरंदाजी
प्रकारात शीतलदेवी आणि राकेश कुमार जोडीला कांस्यपदक मिळालं. ऍथलेटीक्समध्ये योगेश
कथुनिया यानं थाळीफेकमध्ये सलग दुसरं रौप्य पदक पटकावलं.
****
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख १० हजार युवकांची
प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ६० हजाराहून अधिक युवा हे राज्यातल्या
खासगी तसंच शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल मुंबईत ही माहिती दिली.
****
गेल्या खरीप हंगामातील कापूस तसंच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार १९४ कोटी ६८ लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं आहे. या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी तत्काळ सोडवून, शेतकऱ्यांना १० सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरीत करण्याचे निर्देश, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
****
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होणार असल्याचा
दावा, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष
प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. लातूरमध्ये काल व्हि. एस. पँथर्स संघटनेचे
संस्थापक विनोद खटके यांनी आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते.
****
यंदाचा बी. रघुनाथ पुरस्कार ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांच्या 'भुईचे लळासे' या कविता संग्रहाला जाहीर झाला आहे. येत्या आठ तारखेला छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित बी. रघुनाथ स्मृती सोहळ्यात हा पुरस्कार भालेराव यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल.
****
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा भगवानराव
लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे.
****
No comments:
Post a Comment