Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 April 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ एप्रिल २०२५ सकाळी ७.१० मि.
****
• भारताचा फ्रान्ससोबत संरक्षण करार - दोन युद्धनौकांवर २६ राफेल विमानं तैनात होणार
• राष्ट्रपतींच्या हस्ते पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान, राज्यातल्या नऊ मान्यवरांचा सन्मान
• मुंबईत येत्या एक मे रोजी वेव्ह्ज संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
• सर्व शासकीय सेवा येत्या १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
आणि
• अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे यंत्रणांना निर्देश
****
फ्रान्सकडून राफेल मरीन प्रकारच्या २६ लढाऊ विमानांच्या खरेदीसंदर्भातला करार काल करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि फ्रान्सचे त्यांचे समपदस्थ सेबेस्टियन लेकॉर्नू यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या २६ विमानांपैकी २२ विमानं एकआसनी तर चार विमानं दोन आसनी आहेत. भारतीय नौदलाच्या गरजेनुसार या विमानांची रचना असेल. ही विमानं भारतीय नौदलाच्या विक्रांत आणि विक्रमादित्य या युद्धनौकांवर तैनात केली जाणार आहेत.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावर्षी सात पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. काल पहिल्या टप्प्यात तीन पद्मविभुषण, दहा पद्मभूषण तर ५८ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर, प्रसार भारतीचे माजी अध्यक्ष ए सूर्यप्रकाश, हॉकीपटू श्रीजेश, क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन, बँक अधिकारी अरुंधती भट्टाचार्य, उद्योजक पवन गोयंका, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली, माहेश्वरी हातमाग परंपरा जपणाऱ्या उद्योजक शालिनी होळकर, प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत, गायिका जसपिंदर नरुला, बासरीवादक पंडित रोणू मुजूमदार, गोवा मुक्तीसंग्रामातल्या शंभर वर्षांच्या स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई आणि सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांचा समावेश आहे.
****
राज्यातल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांशी प्रशासनाचा संपर्क झालेला असून, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या सर्वांना परत पाठवण्यात येत आहे. या सर्वांच्या परतीच्या प्रवासावर पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येत असून, याबाबतची आकडेवारी लवकरच सांगण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते,
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, मुंबईत तसंच उल्हासनगर भागात तात्पुरत्या व्हिजावर राहणाऱ्या १७, तर नवी मुंबई पोलिसांनी तीन पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवलं आहे. नवी मुंबईत २२९ पाकिस्तानी नागरिक दीर्घकालीन व्हिजावर राहात आहेत किंवा व्हिजा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही ५७ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असून, हे सर्वजण दीर्घकालीन व्हिजावर आहेत. या सर्वांशी नियमित संपर्क असल्याचं, पोलिसांनी सांगितलं.
****
दरम्यान, एमआयएम पक्षाचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करत, या मुद्यावर पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकता कायम राखण्याचं आवाहन केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते,
बाईट - खासदार असदुद्दीन ओवैसी
****
पर्यटन क्षेत्राला चालना तसंच पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी काल ही माहिती दिली. येत्या एक ते चार मे दरम्यान, महाबळेश्वर इथं होणाऱ्या महोत्सवात हे दल प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मत्स्योत्पादनात मूल्यवर्धन आणि पायाभूत सुविधा बळकट करण्याची गरज, केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि पशुपालन मंत्री राजीव रंजन सिंह यांनी व्यक्त केली आहे. काल मुंबईत कोस्टल स्टेट्स मीट २०२५ या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. किनारपट्टीवरची राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी मत्स्योत्पादनात मूल्यवर्धनासाठी काम केल्यास, फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेतच नाही, तर मासेमारांच्या जीवनातही भरीव योगदान ते देऊ शकतात, असं राजीव रंजनसिंह यांनी नमूद केलं.
****
मुंबईत येत्या एक ते चार मे दरम्यान जागतिक दृकश्राव्य मनोरंजन संमेलन - वेव्ह्ज चं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जियो वर्ल्ड सेंटर इथं आयोजित या संमेलनात ३३ देशातले मंत्री, १२० आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज सहभागी होणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.
****
शासनाच्या सर्व सेवा येत्या १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त काल मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. ज्या विभागाच्या सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन होणार नाहीत, त्या विभागाला दररोज प्रत्येक सेवेसाठी एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, असं त्यांनी सांगितलं. सेवा हक्क अधिनियम कायद्याची जनजागृती व्हावी याकरता शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश करण्याची सूचना योग्य असून, मुख्य सचिवांना याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. ते म्हणाले...
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिका मुख्यालयात काल सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी सेवेची बांधिलकी मानणारी सामुहिक शपथ घेण्यात आली. महानगरपालिकेच्या वतीनं विविध ८१ सेवा ऑनलाईन स्वरूपात देण्यात येणार आहेत. यासंदर्भात जनजागृतीसाठी यावेळी पथनाट्य सादर करण्यात आलं. तसंच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ विषयी माहिती फलक मनपा मुख्यालयात लावण्यात आला.
परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी मार्गदर्शन केलं. ऑनलाईन सेवा प्रणाली उत्तम प्रकारे राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
लातूर इथं सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लोकसेवा हक्क विषयक शपथ घेतली. यावेळी लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत उपलब्ध विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या क्यूआर कोड फलकाचं अनावरण करण्यात आलं.
जालना इथं सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. जिल्ह्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
धाराशिव इथं सेवा हक्क दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जास्तीत जास्त सेवांचा लाभ नागरिकांना द्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केलं. जिल्ह्यात सध्या सात प्रकारच्या सेवा ग्रामपंचायतींना ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
लोक सेवा हक्क कायद्याच्या कलम २० नुसार माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवेचे अर्ज स्वीकारायचे असून, त्याच माध्यमातून सेवा पुरवायची असल्याचं, राज्य सेवा हक्क आयोगाचे विभागीय आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले,
बाईट - राज्य सेवा हक्क आयोगाचे विभागीय आयुक्त डॉ. किरण जाधव
डॉ जाधव यांची ही मुलाखत उद्या बुधवारी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी आमच्या केंद्रावरून प्रसारित होणार आहे.
****
बालहक्क संरक्षणाच्या पंचसूत्रीची परवा एक मे पासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. बाल कामगार, बाल भिक्षेकरी, शाळा बाह्य मुले, बालकांचं आरोग्य आणि बालविवाह या सर्व समस्यांचं समूळ निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ‘पंचसुत्री: बालहक्क संरक्षणाची’ हा कालबद्ध कार्यक्रम तयार केला असून, हे अभियान ३१ मे पर्यंत चालणार आहे.
दरम्यान, उद्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे संभाव्य बालविवाह होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा, तालुका आणि गावस्तरावरच्या शासकीय यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी स्वामी यांनी यंत्रणांना दिले आहेत. यासंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.
****
राज्यात काल सर्वाधिक ४२ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान लोहगाव इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि बीड इथं सुमारे ४२ अंश तर परभणी इथं ४२ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment