Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 June 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ जून २०२५ सायंकाळी ६.१०
****
· राष्ट्रीय जनगणनेची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध-एक मार्च २०२७ पासून होणार जातनिहाय
जनगणनेला प्रारंभ
· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान-हा १४०
कोटी भारतीयांचा सन्मान असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
· नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ-चिमुकल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव विविध उपक्रमातून
साजरा
आणि
· जोरदार पावसामुळे कोकणातल्या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली-रत्नागिरीत भूस्खलन
****
१६ व्या राष्ट्रीय जनगणनेची आणि पहिल्यांदाच होत असलेल्या जातनिहाय
जनगणनेची अधिसूचना आज राजपत्रात प्रसिद्ध केली. ही जनगणना भारताच्या स्वातंत्र्यानंतरची
आठवी जनगणना असेल. देशभरात ३४ लाख प्रगणक आणि निरीक्षक, एक लाख तीन हजारांहून अधिक अधिकारी आधुनिक मोबाईल डिजिटल प्रणालीद्वारे या प्रक्रियेत
सहभागी होणार आहेत. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची यादी, मालमत्ता आणि सुविधा या माहितीचं संकलन, दुसऱ्या टप्प्यात सामाजिक-आर्थिक आणि जातीय माहिती संकलन करण्यात
येणार आहे. या प्रक्रियेमध्ये डिजिटल अॅप आणि स्व-गणनेची सुविधा देखील उपलब्ध करुन
देण्यात आली आहे. देशातल्या बर्फाळ प्रदेशात एक ऑक्टोबर २०२६ पासून, तर इतर भागात एक मार्च २०२७ पासून जनगणना सुरू होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
ग्रैंड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस-थ्री नं सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार म्हणजे
१४० कोटी भारतीयांचा सन्मान असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. भारतीय पंतप्रधानांचा हा
गेल्या दोन दशकातला पहिलाच सायप्रस दौरा आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यात सायप्रसनं
भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला समर्थन जाहीर केलं. तसंच भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या
सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वासाठी सायप्रसनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोदी यांनी
आभार मानले. दोन्ही देशांदरम्यान संरक्षण, उद्योग, आरोग्य, अपारंपरिक ऊर्जा या क्षेत्रातील सहकार्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा
झाली.
****
गेल्या दहा वर्षात भारताने आपली कार्यक्षमता, वेग आणि अचूक व्यवस्थापन यांच्या बळावर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात
महत्त्वाची कामगिरी केल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे.
ते आज नवी दिल्ली इथे राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतकार्य आयुक्त आणि आपत्ती
प्रतिसाद दलांच्या परिषदेला संबोधित करत होते. विविध प्रकारच्या संकटांमध्ये बचावकार्य
करण्यासाठी जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापन योजना असणं महत्त्वाचं आहे, असं सांगताना विविध राज्यांच्या मदतकार्य आयुक्तांना पुढच्या
९० दिवसात प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करण्याच्या सूचनाही
शहा यांनी दिल्या.
****
गुजरातमधील अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातातील ९२ मृतांची
डीएनए चाचणी करण्यात आली असून, आतापर्यंत
४७ मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आले आहेत.
दरम्यान, अपघातात
मृत्युमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या पार्थिव देहावर आज
राजकोट इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
येत्या २१ जून रोजी साजरा होणाऱ्या ११ व्या आंतरराष्ट्रीय योग
दिनाची देशभरात जय्यत तयारी सुरु आहे. यानिमित्त देशपातळीवरचा मुख्य कार्यक्रम विशाखापट्टणम
इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचा आयुष मंत्रालय
आणि राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. या कार्यक्रमात सुमारे पाच लाख
नागरिकांचा सहभाग असणार आहे.
दरम्यान, जागतिक
योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी दररोज आपल्या श्रोत्यांसाठी एका आसनाविषयी माहिती
देत आहे. आज आपण योगशिक्षक डॉ मनिषा चर्जन यांनी शलभासनाविषयी दिलेली माहिती आपण जाणून
घेऊ या –
बाईट - डॉ
मनिषा चर्जन,
योगशिक्षक
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या शेगाव इथल्या संत श्री
गजानन महाराजांच्या पालखीचं आज परभणी शहरात आगमन झालं. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी
पालखीचं दर्शन घेतलं. वारी विठोबाची, साथ आरोग्याची या अभिनव उपक्रमातर्गत परभणीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पालखी
सोहळ्यातल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून उपचार देण्यात येत आहेत. पालखीच्या मार्गावर
ठिकठकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. राज्य शासनाच्या
शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं अनेक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांचं पहिल्या दिवशी अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्याच्या उद्देशाने अनेक
शाळांनी विविध उपक्रम राबवले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर जिल्ह्यातल्या दुर्वेस
इथल्या पीएम श्री जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव सोहळ्यात ते सहभागी झाले होते. यावेळी
त्यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. शाळेतली शिक्षण पद्धती आणि शिक्षणाबाबत
विद्यार्थ्यांची जिज्ञासा याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी
वृक्षारोपण करण्यात आलं. पालघर इथं प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय
ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचं आणि विविध विकास कामांचं उद्घाटनही
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.
****
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साताऱ्यातील कोडोली
इथल्या जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेश दिन साजरा करण्यात आला. उपमुख्यमंत्री शिंदे
यांनी विद्यार्थ्यांना गुलाबाचं फूल देऊन स्वागत केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दौंड तालुक्यातल्या आलेगाव
पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध शाळांमध्ये आज शाळा प्रवेशोत्सव
सोहळा उत्साहात साजरा झाला. नवीन विद्यार्थ्यांचं पुष्प, भेटवस्तू, मिठाई देत वाजत गाजत स्वागत
करण्यात आलं. शहरालगतच्या सातारा जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत पालकमंत्री
संजय शिरसाट यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. महानगरपालिकेच्या अशोक नगर आणि ब्रिजवाडी
इथल्या शाळेत इतर मागास वर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत शाळा
प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना
शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्यात सिंगणापूर जिल्हा परिषद शाळेत जिल्हाधिकारी
रघुनाथ गावडे यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत करून त्यांना गणवेश आणि पुस्तके भेट दिली.
गंगाखेड तालुक्यातही विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी वह्या पुस्तक आणि दप्तराचे वाटप
करण्यात आलं. सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर नगरपरिषद प्राथमिक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचं
फेटे बांधून, फुले आणि पेढे देऊन तसंच पावलांचे
ठसे घेऊन स्वागत करण्यात आलं. हैदराबाद इथल्या सत्य शिवम फाउंडेशनच्या वतीनं विद्यार्थ्यांना
शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं.
नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री अतुल सावे यांनी जिल्हा परिषद
शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधत शुभेच्छा दिल्या.
बीड इथं शालेय विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात
आलं. विविध शाळांमध्ये फुग्यांची
कमान लावून, ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं
स्वागत करण्यात आलं.
****
राज्याच्या बहुतांश भागात आजही पाऊस सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात
सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संगमेश्वर तालुक्यात धामणी-गोळवलीत
भूस्खलन होऊन डोंगराचा काही भाग कोसळल्याची घटना घडली.
राजापूरमध्ये अर्जुना-कोदवली नद्यांना पूर आला आहे तर काही ठिकाणी
दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातल्या आंबा आणि कुंडलिका नद्यांनी इशारा पातळी
ओलांडली आहे.
येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आज
रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट
तर पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, आणि
सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या जावर इथं आज प्रधानमंत्री
धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाला सुरूवात झाली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे
प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चन्द्रा दोन्तुला यांच्या हस्ते या
अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत बियाणांचं आणि
प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment