Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
• ७६वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा, दिल्लीत कर्तव्य पथावर देशाच्या सामरिक सज्जतेचं, आणि सांस्कृतिक परंपरेचं समृद्ध दर्शन.
• राज्यातही प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम.
• आपला जिल्हा राज्यात अग्रेसर करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचं आवाहन.
• नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या किवळा इथं कोंबड्यांमध्ये 'बर्ड फ्लू' चा प्रादुर्भाव, दहा किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित.
आणि
• १९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांग्लादेशवर आठ खेळाडू राखून विजय.
****
७६वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा होत आहे. नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. देशाच्या सामरिक सज्जतेचं, आणि सांस्कृतिक परंपरेचं समृद्ध दर्शन घडवणाऱ्या संचलनाची मानवंदना राष्ट्रपतींनी स्वीकारली. देशाची तीनही सेनादलं, सीमासुरक्षा तसंच तटरक्षक दल, सशस्त्र पोलीस दलं, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, गृहरक्षक दल अशी अनेक पथकं संचलनात सहभागी झाली होती. देशाची विविधता आणि सांस्कृतिक एकात्मता दाखवणारे १६ विविध राज्यांचे तसंच इतर मंत्रालयांचे मिळून ३१ चित्ररथही संचलनात सहभागी झाले होते. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियंतो या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इंडोनेशियाच्या सेनादलांचं ३५२ जणांचं पथकही संचलनात सहभागी झालं होतं. स्वर्णिम भारत विकास, विरासत ही यंदाच्या संचलनाची संकल्पना होती. या सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.
****
प्रजासत्ताक दिनाचा राज्याचा मुख्य सोहळा मुंबईत शिवाजी पार्क इथं झाला. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी प्रजासत्ताक दिन संचलनाचं निरीक्षण केलं तसंच विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली.
राज्याची सर्वांगीण प्रगती आणि लोककल्याणासाठी राज्य सरकार करत असलेल्या कामांची राज्यपालांनी आपल्या भाषणातून माहिती दिली. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून, राज्य सरकारच्या वतीनं राबवल्या जात असलेल्या उपक्रमांना गती देण्याकरता सर्वच विभागांना आराखडा तयार करायचे निर्देश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन केलं. यावेळी पोलीस दलाच्या पथकानं राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम झाला.
****
मराठवाड्यात सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.
छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात शिरसाट यांनी, आपला जिल्हा राज्यात अग्रेसर करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं आवाहन केलं.
त्यागातून मिळालेले आपले स्वातंत्र्य आणि आपले प्रजासत्ताक, आपण या देशाचे नागरिक म्हणून लोकशाही मुल्याची जपवणूक करणे, संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य निभावत असतो. लोकशाही बळकट करत असतो. या संविधानाचे महतीही आपण घरोघरी पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. आपण साऱ्यांनी योगदान द्यावे असे नम्र आवाहन मी करतो.
यावेळी राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, सहायक फौजदार एकनाथ गायकवाड, तुकाराम आव्हाळे, तसंच जीवन रक्षा पदक मिळालेले पोलीस उपनिरीक्षक नजीर नासिर शेख, आणि हवालदार दादासाहेब पवार यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
जालना इथं पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, बीड इथं पोलिस मुख्यालय मैदानावर मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते, धाराशिव इथं पोलिस मुख्यालय मैदानावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, तर हिंगोली इथं संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.
****
परभणी इथं प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. खासदार संजय जाधव, आमदार डॉ राहुल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना बोर्डीकर यांनी शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं , त्या म्हणाल्या...
पालकमंत्री म्हणून माझ्यावरती दिलेली आहे, त्या जबाबदारीचं भान राखत जिल्हावासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रण केलेला आहे. चांगलं काम जिल्ह्यामध्ये उभ करणार. आणि जेवढ्याकाही केंद्रातल्या आणि राज्यातल्या योजना आहेत त्या आपल्या जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या योजनांचा लाभ सगळ्यांना मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळेजण मिळून करु.
****
लातूर इथं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं. संविधानाच्या मार्गदर्शक तत्वावर चालत एक भारत श्रेष्ठ भारत घडवूया, असं आवाहन पालकमंत्री भोसले यांनी यावेळी केलं. ते म्हणाले...
आपल्या जिल्ह्याचा आणि देशाचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे. संविधानाची शिकवण, स्वातंत्र्य लढ्याचे बळ आणि लोकशाहीची शक्ती याच्या आधारे आपण एक भारत, श्रेष्ठ भारत घडवू शकतो. संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांचा आदर करत भारताला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवुया.
****
नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं. राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक संजय जोशी आणि पोलीस हवालदार दिलीप राठोड यांचा सावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस आणि अन्य विभागाचे पथसंचलन, विविध विभागाचे चित्ररथ तसंच अन्य सादरीकरणाने हा सोहळा साजरा झाला.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वरिष्ठ न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते, नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते तर परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्र मणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विभागात विविध शैक्षणिक संस्था सामाजिक संघटनांच्या वतीनं तिरंगा फेरी, देशभक्ती गीत गायनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी आज प्रजासत्ताक दिन साजरा झाला.
****
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प म्हणजेच कोस्टल रोडवरून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. ही मार्गिका उद्यापासून सकाळी सात ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुली करून देण्यात येणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या किवळा इथं कोंबड्यांमध्ये 'बर्ड फ्लू' चा प्रादुर्भाव आढळून आला आहे. २० जानेवारी रोजी अनेक कोंबड्या मृत आवस्थेत आढळून आल्याने पशुसंवर्धन विभागाने मृत कोबंड्यांचे नमुने पुणे इथल्या राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा आणि भोपाळ इथल्या कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्या नमुन्यांच्या तपासणीत 'बर्ड फ्लू' लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये म्हणून लोहा तालुक्यातल्या किवळा जवळचा दहा किलोमीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
****
पद्म पुरस्कार काल जाहिर झाले. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
प्रतिक्रिया माझी आनंदाची आहे. महाराष्ट्रभूषण मिळालं आणि त्याची वरची पायरी म्हणजे पद्मश्री आहे. त्यामुळे आनंद हा माझा आणखी वाढलेला आहे, एक पायरी वरती चढल्यामुळे. हा जो एक पायरी वरती चढल्याचा जो प्रसंग आहे, तो तुम्ही लोकांनी माझ्यावर आणलेला आहे. माझ्या लोकांनी, माझ्या ऑडीयंसनी आणलेला आहे. त्यामुळे मला त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे. Thank You Very Much म्हणून.
****
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज जिल्ह्यात विविध विभागांमार्फत होत असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. जनहित हा प्राधान्यक्रमाचा निकष असायला हवा त्यानुसार विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवा, असं त्यांनी सांगितलं. जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात आलेल्या निधीतून होणाऱ्या कामांचा देखील शिरसाट यांनी आढावा घेतला.
****
धाराशिव इथं जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आज झाली. या बैठकीत २०२५-२६ साठी ४३५ कोटी ६१ लाख रुपयांचा प्रस्तावित आराखडा मांडण्यात आला.
दरम्यान, महा आवास योजनेच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचं प्रकाशन आज सरनाईक यांच्या हस्ते झालं.
****
आयसीसी १९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज क्वालालंपूर इथं झालेल्या साखळी सामन्यात भारताने बांग्लादेशवर आठ खेळाडू राखून विजय मिळवला. बांग्लादेशच्या महिलांनी प्रथम फलंदाजी करत अवघ्या ६४ धावा केल्या. भारताने आठव्या षटकात दोन गडी गमावत हे लक्ष्य पूर्ण केलं. भारत या स्पर्धेत अ गटात पहिल्या स्थानावर आहे.
****
नाशिक इथं झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्राने बडोद्याचा ४२९ धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्या डावात मिळालेल्या आघाडीच्या बळावर महाराष्ट्राने बडोद्यासमोर विजयासाठी तब्बल ६१६ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करतांना बडोद्याचा संघ अवघ्या १८७ धावाच करु शकला.
****
No comments:
Post a Comment