Friday, 31 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.01.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 January 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      केंद्र सरकारच्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा मिळाल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन;संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ

·      आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; सकल घरेलु उत्पादन दरात सहा पूर्णांक आठ टक्के वाढीचा अंदाज

·      देवस्थानांची व्हीआयपी दर्शन व्यवस्था मनमानी स्वरूपाची असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण

·      तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

आणि

·      १९ वर्षाखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा पराभव करत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल

****

केंद्र सरकारच्या गेल्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा दिल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला, त्यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी विकसित भारत संकल्पनेत लोकसहभागाचं अधिक महत्त्व असल्याचं सांगितलं, त्या म्हणाल्या

मेरी सरकार के एक दशक के कार्यकाल ने विकसित भारत की यात्रा को नई ऊर्जा दी है। विकसित भारत के विजन में जनभागीदारी का सामूहिक सामर्थ्य हैदेश की आर्थिक उन्नति का रोडमैप हैडिजिटल क्रांति के रूप में टेक्नॉलाजी की ताकत हैऔर आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर का आधार है। मेरी सरकार के प्रयासों के बल पर भारत, दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने जा रहा है। सरकार ने सेवा, सुशासन, समृद्धि और स्वाभिमान, इन प्रमुख सिद्धांतों को गवर्नेंस के केंद्र में रखा है। सरकार reform, perform और transform के अपने संकल्प को तेज गति से आगे बढ़ा रही है।

 

इस्रोचं शंभरावं उपग्रह प्रक्षेपण, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला चालना देणारा इंडिया ए आय’ कार्यक्रम, दळणवळण आणि इतर पायाभूत सुविधा, मराठीसह विविध भाषांना अभिजात दर्जा, स्टार्टअप योजना, लखपती दिदी योजना, अन्नपूर्णा योजना तसंच केंद्र सरकारच्या इतर समाजाभिमुख योजनांकडे राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून लक्ष वेधलं. देशाच्या विकासाचा लाभ समाजातल्या अखेरच्या घटकापर्यंत पोहोचतो, तेव्हाच विकास सार्थक ठरत असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्या म्हणाल्या

जब देश के विकास का लाभ अंतिम पायदान पर खड़े व्यक्ति को भी मिलने लगता है तभी विकास सार्थक होता है। गरीब को गरिमापूर्ण जीवन मिलने से उसमें जो सशक्तिकरण का भाव पैदा होता है, वो गरीबी से लड़ने में उसकी मदद करता है। अनेक योजनाओं ने गरीब को ये भरोसा दिया है कि वो सम्मान के साथ जी सकते हैं। ऐसे ही प्रयासों की वजह से देश के 25 करोड़ लोग गरीबी को परास्त करके आज अपने जीवन में आगे बढ़ रहे हैं। इन्होंने नियो मिडिल क्लास का एक ऐसा समूह तैयार किया है, जो भारत की ग्रोथ को नई ऊर्जा से भर रहा है।

 

दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून देशाच्या प्रगतीचं सर्वसमावेशक चित्र स्पष्ट होत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या अभिभाषणातून युवकांच्या समग्र विकासाबाबत भारताचा दृष्टिकोन दिसून येत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देतांना, त्या फार थकल्याचं तसंच त्यांना बोलणं कठीण जात असल्याची टिप्पणी केली, राष्ट्रपती भवनाकडून गांधी यांच्या या टिप्पणीचं खंडन करण्यात आलं आहे. अशी टीका ही राष्ट्रपती पदाच्या मर्यादेचा भंग करत असल्यानं, गांधी यांची ही टिप्पणी राष्ट्रपती भवनानं अस्वीकार केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

उपेक्षित घटक, महिला आणि शेतकऱ्यांवर बोलण्याने कधीही थकवा येऊ शकत नाही, असं राष्ट्रपतींचं ठाम मत आहे, भारतीय भाषांमधल्या म्हणी तसंच वाक्प्रचाराबाबत काँग्रेस नेते अनभिज्ञ असल्यानं, त्यांच्याकडून अशी टिप्पणी आली असावी, असंही राष्ट्रपती भवनाकडून जारी पत्रकात नमूद असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राष्ट्रपतींच्या अभिभषणानंतर संसदेच्या दोन्ही सदनांत कामकाजाला प्रारंभ झाला. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माजी पंतप्रधान दिवंगत डॉ मनमोहन सिंग, ओमप्रकाश चौटाला आणि तीन माजी खासदारांना आदरांजली वाहिली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदनात सादर केला. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

राज्यसभेतही दिवंगत संसद सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल राज्यसभेत सादर करण्यात आला आणि सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

२०२५ या आर्थिक वर्षात भारताच्या सकल घरेलू उत्पादनात सहा पूर्णांक चार दशांश टक्के वृद्धी होण्याचा तर २०२६ च्या आर्थिक वर्षात ही वृद्धी सहा पूर्णांक तीन ते सहा पूर्णांक आठ दशांश टक्के इतकी राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२५च्या शेवटच्या तिमाहीत अन्नधान्याच्या किमती कमी होण्याची शक्यता या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये सहा टक्क्यांवर असलेला बेरोजगारीचा दर कमी होऊन, २०२३-२४ या वर्षामध्ये तो तीन पूर्णांक दोन टक्क्यांवर आल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.

दरम्यान, अर्थमंत्री उद्या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील, या अर्थसंकल्पावर सोमवारी चर्चेची शक्यता आहे.

****

देशातल्या मंदिरांमधलं व्हीआयपी दर्शन, अर्थात महत्त्वाच्या व्यक्तींसाठी देवदर्शनाची वेगळी सुविधा मनमानी स्वरूपाची असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. अशा व्यवस्थेला आव्हान देणारी याचिका मात्र सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. याचिकेतल्या मुद्यांशी सहमत असलो तरी याप्रकरणी कोणताही निर्णय अथवा निर्देश देऊ शकत नसल्याचं सांगत, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं, या प्रकरणी सरकारी यंत्रणांनी लक्ष घालावं, असंही म्हटलं आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मराठी भाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात केली, त्या मराठी भाषेची परंपरा टिकवण्यासाठी आपण या संमेलनाच्या माध्यमातून साद घालत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे इथं तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. या सोहळ्यात प्रसिद्ध मराठी साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक तसंच ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांचा सत्कार करण्यात आला. कौशल्य विकास आणि उद्योगजकता विकास मंत्रालयाच्या सिद्ध या संकेतस्थळाचं उद्घाटन आणि लोकार्पण यावेळी करण्यात आलं.

पुस्तकं आणि पुस्तकांचे निर्माते यांचा महाकुंभमेळा या संमेलनात भरला असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं. तर, मराठी विश्व संमेलन आता परदेशातही व्हावं, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

****

उत्तराखंड इथं सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात पुरुष गटात महाराष्ट्राच्या पार्थ माने यानं सुवर्ण तर रुद्रांक्ष पाटीलनं रौप्य पदक मिळवलं आहे. या स्पर्धेत ५ सुवर्ण, १२ रौप्य आणि ८ कांस्य पदकांसह एकूण २५ पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.

****

भारत आणि इंग्लड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज पुण्यात होणार आहे. संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. मालिकेत भारत दोन एकने आघाडीवर आहे.

****

१९ वर्षाखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं इंग्लंडचा नऊ विकेट राखून पराभव केला. इंग्लंडनं दिलेलं ११४ धावांचं आव्हान भारतीय संघानं पंधराव्या षटकांत साध्य केलं. २१ धावांत तीन बळी घेणारी पारुनिका सिसोदिया प्लेयर ऑफ द मॅच ठरली. या विजयामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला असून, दोन फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे.

****

रस्ता सुरक्षा अभियानामुळे गेल्या वर्षभरात अपघातांच्या संख्येत घट झाल्याचं, छत्रपती संभाजीनगर इथल्या महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलिस अधीक्षक रुपाली दरेकर यांनी सांगितलं आहे. आकाशवाणीशी बोलतांना त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली

सदर अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांच्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. १४ महामार्ग पोलीस केंद्रांच्या हद्दीमध्ये वाहनचालकांसाठी व नागरिकांसाठी आरोग्य तपासणी तसेच नेत्र तपासणी शिबीरांगचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात महामार्गांवर होणाऱ्या अपघातांमध्ये २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये दहा पॉईंट तीस टक्क्यांनी घट झालेली आहे.

****

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी आज ही घोषणा केली. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या उद्यानातील दोन सिंह शेलार यांनी वर्षभरासाठी दत्तक घेतले.

****

No comments: