Wednesday, 23 July 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.07.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 July 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधल्या मतदार याद्यांच्या मुद्यांवरुन संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज दुसऱ्या दिवशीही बाधित

·      अपाचे हेलिकॉप्टरची पहिली खेप भारतात दाखल-वायूदलाच्या क्षमतेत मोठी वाढ 

·      मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

·      राज्यातल्या शेतकऱ्यांसाठीकृषी समृद्धी योजनाजाहीर

आणि

·      मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात पाऊस, परभणी जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टीची नोंद

****

विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल सलग दुसऱ्या दिवशी बाधित झालं. लोकसभेत काम सुरू झाल्यावर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र, ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधल्या मतदार याद्यांचं विशेष पुनरीक्षण, या मुद्द्यांवर चर्चेची मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. वारंवार विनंती करूनही गदारोळ न थांबल्यामुळे अध्यक्षांनी सदनाचं कामकाज आधी दोन वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.

राज्यसभेतही विरोधकांनी याच मागण्यांसाठी गदारोळ केल्यामुळे सभापतींनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.

****

अमेरिकेच्या अपाचे हेलिकॉप्टरची पहिली खेप काल भारतात पोहोचली. या टप्प्यात तीन हेलिकॉप्टर्स वायूसेनेच्या ताफ्यात सामील झाले. शस्त्रांचा मारा करण्याची प्रचंड क्षमता आणि अत्यंत प्रगत युद्ध क्षमतांमुळे या हेलिकॉप्टर्सना हवेतले रणगाडे असं म्हटलं जातं. या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय वायुदलाच्या ताकदीत भर पडणार आहे. 

****

मुंबईत उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात उद्या २४ तारखेला सुनावणी होणार आहे. या आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं परवा आपल्या निकालात नोंदवलं होतं.

****

सरकारने राज्यातल्या शेतकऱ्यांसाठीकृषी समृद्धी योजनाजाहीर केली. या योजनेचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या योजनेत शेती क्षेत्रात दरवर्षी तब्बल पाच हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक होणार असल्याचं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. याबाबत अधिक माहिती देतांना कोकाटे म्हणाले...

बाईट- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल गडचिरोली इथं विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन झालं. यात एम टी पी ए स्टील प्रकल्प, कोनसरी इथलं शंभर खाटांचं रुग्णालय, सी बी एस ई शाळेची पायाभरणी, सोमनपल्ली इथं लॉयड्स टाऊनशिप, हेडरी ते कोनसरी स्लरी पाईपलाईन आदी उपक्रमांचा समावेश आहे. गडचिरोलीच्या जल, जमीन आणि जंगलाच्या संगोपनाचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस काल विविध सामाजिक उपक्रमातून साजरा झाला. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत भारतीय जनता पक्षातर्फे काल राज्यातल्या सर्व मंडलांमध्ये महारक्तदानाचा उपक्रम राबवण्यात आला.

****

मराठवाड्याच्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातल्या पाथरी, सोनपेठ तसंच मानवत तालुक्यात काल अतिवृष्टी झाली. आमदार राजेश विटेकर तसंच प्रांताधिकारी संगीता चव्हाण यांच्यासह तालुका प्रशासनानं अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देऊन पाहणी केली. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर... 

पाथरी तालुक्यातल्या चारही महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, कासापुरी महसूल मंडळात सर्वाधिक २१५ मिलीमीटर पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात विसर्ग केल्याने, नदी-नाल्यांना पूर आला. हदगाव इथे काही घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालं, या घरांचीही तालुका प्रशासनानं पाहणी केली. सुदर्शन चापके, आकाशवाणी बातम्यांसाठी परभणी.

हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या बेरडा इथल्या मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. या मंदिरात अडकलेल्या तीन जणांची प्रशासनाच्या पथकाने सुटका केली.

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात काल संध्याकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यात सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात काल १७ पूर्णांक ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धाराशिव जिल्ह्यात इटकळ आणि भूम मंडळात, तर जालना जिल्ह्यातल्या आठ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

****

९८ वा भारतीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. २३ जुलै १९२७ रोजी मुंबई केंद्राची स्थापना होऊन प्रसारण सुरू झालं. तेव्हापासून हा प्रसारण दिवस म्हणून साजरा केला जातो. याबाबत संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत...

रेडिओ निर्मितीच्या प्रयत्नात १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात मार्कोनीला यश मिळालं, आणि २० वं शतक उजाडता उजाडता, जगभरात रेडिओचा आवाज घुमू लागला. भारतातही रेडिओचा प्रवेश झाला, आणि जून १९२३ मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबस इतर रेडिओ क्लबच्या कार्यक्रमांचं प्रसारण सुरू झालं. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीला मुंबई आणि कोलकाता इथं रेडिओ केंद्र चालवण्याची परवानगी मिळाली, आणि २३ जुलै १९२७ रोजी भारतात सर्वप्रथम मुंबईत रेडिओ केंद्राची स्थापना झाली. तेव्हापासून आजतागायत हे केंद्र माहिती आणि मनोरंजन क्षेत्रात अव्याहतपणे मोलाचं योगदान देतंय. बहुजन हिताय-बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य अंगीकारून अस्मिता, एफ एम रेडियो, एफ एम गोल्ड आणि सर्वांच्या मनामनात स्थान मिळवलेलं विविध भारती, अशा चार वाहिन्यांवरून अनेकविध कार्यक्रमांचं प्रसारण या केंद्रावरून दररोज सुरू आहे.

मुंबई केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त आज विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. त्यामुळे आमच्या केंद्रावरचं संध्याकाळचं बातमीपत्र आज सहा वाजून दहा मिनिटांऐवजी, चार वाजून वीस मिनिटांनी प्रसारित होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये देशात २५ वा क्रमांक मिळवला आहे. उघड्यावर शौचमुक्त शहरे या श्रेणीमध्ये वॉटर प्लस, हे सर्वोच्च मानांकन तर कचरामुक्त शहर या श्रेणीमध्ये शहराला एक स्टार प्राप्त झाला आहे. या स्पर्धेत, देशात पहिल्या दहा शहरात येण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येईल, असं महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी.श्रीकांत यांनी म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय आणि पशुधन प्रक्षेत्र उभारणीसाठी राज्य शासनाने मौजे लोणी इथं २२ एकर, तर मौजे परळी इथं ५० एकर, अशी एकूण ७२ एकर शासकीय गायरान जमीन उपलब्ध करून दिली आहे. नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत हे महाविद्यालय उभारलं जाणार आहे.

****

महिला क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने दोन - एक अशी जिकंली आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिलांनी १३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारताने दिलेलं ३१९ धावांचं लक्ष्य पार करताना इंग्लंडचा संघ ३०५ धावाच करु शकला. हरमनप्रीत कौर ला प्लेयर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द सिरीज या पुरस्काराची मानकरी ठरली.

****

पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंडदरम्यान चौथा कसोटी सामना आजपासून मँचेस्टर इथं खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या एक - दोननं पिछाडीवर आहे.

****

धाराशिव इथल्या एस टीच्या विभागीय कार्यालयातला स्थापत्य अभियंता शशिकांत उबाळे याला पाच हजार रुपये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं अटक केली. वाहनतळाच्या जागेचा ताबा देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

छत्रपती संभाजीनगर इथं काल पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात विविध नामांकीत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेऊन १७६ उमेदवारांची निवड केली.

****

No comments: