Wednesday, 30 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.07.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 July 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सैन्यदलानं सामर्थ्य सिद्ध केल्याचं पंतप्रधानांचं लोकसभेत प्रतिपादन

·      युद्धबंदीच्या मुद्यावरुन विरोधी पक्षांची सरकारवर टीका, युद्धबंदीसाठी तिसऱ्या देशानं मध्यस्थी केली नसल्याचं पंतप्रधानांचं स्पष्टीकरण

·      ऑपरेशन महादेवमध्ये पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवादी ठार, अमित शहा यांची माहिती

·      मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

·      स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडाव्यात-राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश

आणि

·      जायकवाडी धरणात सुमारे ८९ टक्के पाणीसाठा

****

ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्यदलानं अचूक लक्ष्यभेद करून आपलं सामर्थ्य सिद्ध केल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेला उत्तर देताना, हे ऑपरेशन सुरू असून, पाकिस्तानने दुस्साहस केल्यास, भारत सडेतोड उत्तर देईल, असा सज्जड इशारा दिला. या कारवाईत भारताने दहशतवादी तळ उध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांसोबत उभं राहिलं, त्यावर भारतीय सैन्याने दिलेलं उत्तर पुढची अनेक दशकं पाकिस्तान विसरू शकणार नाही, असं त्यांनी नमूद केलं. सैन्यदलाच्या या कारवाईला जगभरातून समर्थन मिळाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

भारताने केलेली ही कारवाई विस्तारासाठी नसल्याचं, आपण पहिल्या दिवसापासून सांगत आहोत, त्यामुळे आपण युद्ध थांबवलं, मात्र यामध्ये कोणीही मध्यस्थी केलेली नसल्याचं मोदी यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले...

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

दहशतवादाबाबत आपल्या सरकारचं झिरो टॉलरन्स धोरण असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेत बोलत होते. ऑपरेशन महादेव अंतर्गत काश्मीरमध्ये मारले गेलेले तीन दहशतवादी, पहलगाम हल्ल्यात सामील असल्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणांकडे असल्याचं त्यांनी सांगितलं,

बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

 

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावेळी बोलतांना, युद्ध थांबवण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले...

बाईट - विरोधी पक्षनेते राहुल गांधी

**

राज्यसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ऑपरेशन सिंदूरविषयी चर्चेला सुरुवात केली. मल्लिकार्जुन खरगे यांनी चर्चेत सहभाग घेत, पाकिस्तानची अवस्था वाईट असतांनाही युद्धविरामावर सहमती का झाली, याबाबतही सरकारने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.

****

राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या अंतर्गत एकंदर एक हजार ९०२ पुरस्कार देण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियानांतर्गत १० जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्यास, तसंच ई-नाम योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन करण्यासाठी कृषी उत्पन्न पणन विकास आणि विनियमन अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.

****

राज्यातल्या महापालिका रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम राबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. महिलांमध्ये स्तनाचा तसंच गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत जागृती वाढावी आणि उपचारापेक्षा प्रतिबंधावर भर देण्यासाठी ही तपासणी मोहिम घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

****

महसूल विभागाने कृत्रिम वाळू धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती निश्चित केली असून, याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार, सार्वजनिक तसंच खाजगी जमिनींवर एम-सँड युनिट्स सुरू करण्यासाठी माहिती एकत्रित करुन 'महाखनिज' प्रणालीवर लिलावासाठी योग्य जमिनींची माहिती देण्यात येईल. पाच एकरांपर्यंतच्या क्षेत्रासाठी लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे. पर्यावरणाचं रक्षण आणि संरक्षण या दृष्टीकोनातून वाळूला पर्याय देणं आवश्यक होतं, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

****

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन काल साजरा झाला. देशामध्ये व्याघ्र संवर्धनात महाराष्ट्राने सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं. व्याघ्र दिनानिमित्त वाईल्ड ताडोबा या माहितीपटाच्या ट्रेलरचं प्रकाशन तसंच एशियाटिक बिग कॅट सोसायटी नॅशनल अवॉर्ड २०२५ या कार्यक्रमात दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री काल बोलत होते. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी -बारावी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल काल जाहीर करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकन करायचं असेल त्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे.

****

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडाव्यात असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात सर्व जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या निवडणुकांमध्ये एक जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असून, याप्रमाणे मतदान केंद्राची संख्या असावी, अशा सूचना वाघमारे यांनी दिल्या.

****

राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरियाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात १५ ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. प्रयोगशाळेसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या आणि इच्छुकांनी आठ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असं आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केलं आहे.

****

परभणी जिल्ह्यातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी काल आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी वरपुडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत केलं.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष तथा जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. आपल्या वैयक्तिक अडचणींमुळे आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जालना दौऱ्यावर आलेले प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी याबाबत बोलताना, भाजपकडे सक्षम नेतृत्व नसल्याने कॉँग्रेसच्या नेत्यांना तसंच कार्यकर्त्यांना आमीष दाखवून भाजपात घेतलं जात असल्याची टीका केली.

****

रासायनिक खतांच्या सर्व किरकोळ विक्रेत्यांना अनुदानित रासायनिक खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणं बंधनकारक असल्याचं, कृषी विभागाने सांगितलं आहे. याबाबतच्या सूचना जारी करण्यात आल्या असून, ई-पॉस प्रणालीवरील खत साठा आणि प्रत्यक्ष गोदामातला साठा यामध्ये कोणतीही तफावत असू नये, असं यात नमूद करण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथलं जायकवाडी धरण सुमारे ८९ टक्के भरलं आहे. धरणात काल सायंकाळी २३ हजार २७३ दशलक्ष घनफूट प्रति सेकंद वेगाने पाण्याची आवक सुरु होती, त्यामुळे धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याची शक्यता असल्याने, गोदाकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

No comments: