Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 27 June 2022
Time - 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ जून २०२२ सायंकाळी
६.१०
****
· शिवसेनेच्या बंडखोर गटाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा;१६ बंडखोर आमदारांना नोटीसला
उत्तर देण्यासाठी ११ जुलैपर्यंत मुदत; विधानसभा उपाध्यक्षांना पाच दिवसांत प्रतिज्ञापत्र
देण्याचे निर्देश.
· महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचं एकनाथ शिंदे यांच्याकडून याचिकेत नमूद.
· राज्य सरकारमधले सध्या अनुपस्थित असलेले पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील
खाती इतर मंत्र्यांना सोपवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय.
आणि
· राज्यात मराठवाडा वगळता इतरत्र आतापर्यंत सरासरीपेक्षा ३० ते ४५ टक्के कमी पाऊस.
****
शिवसेनेच्या बंडखोर एकनाथ शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्रतेची नोटीस बजावलेल्या १६ बंडखोर आमदारांना
या नोटीसला उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. १२
जुलैपर्यंत या आमदारांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही. झिरवाळ यांनी या आमदारांना
दिलेली मुदत आज संपणार होती. दरम्यान, झिरवाळ यांच्याविरोधात दाखल अविश्वास प्रस्तावासंदर्भात
सर्वोच्च न्यायालयाने झिरवाळ यांना नोटीस बजावत, पाच दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे
निर्देश दिले आहेत.
१६ आमदारांना अपात्रतेची नोटीस, तसंच गटनेता आणि प्रतोद नियुक्तीला आव्हान देणाऱ्या
याचिका बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत, त्यासंदर्भात
आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने नवनियुक्त गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभू
यांनाही नोटीस बजावत, पाच दिवसांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आहे.
महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत बहुमत गमावल्याचा दावाही एकनाथ शिंदे यांनी या
याचिकेत केला आहे. महाविकास आघाडी सरकारचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या ५५ पैकी आपल्या
गटात असलेल्या ३८ आमदारांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचं, शिंदे यांनी या
याचिकेत स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात आपली घरं आणि इतर मालमत्तांचं नुकसान करण्याची
धमकी मिळत असल्याचंही शिंदे यांनी या याचिकेतून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं.
त्यावर हे सर्व आमदार, त्यांचे कुटुंबीय आणि मालमत्ता यांची हानी होणार नाही याची
काळजी घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्या आहेत. या प्रकरणी
पुढची सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे.
****
दरम्यान, बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांना एक खुलं पत्र लिहून भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याचं आवाहन केलं
आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नाराज आमदारांमध्ये
दुरावा निर्माण केल्याचा आरोपही केसरकर यांनी केला आहे. ही पक्षाविरोधात बंडखोरी नसून,
स्वाभिमानाची लढाई असल्याचं, केसरकर यांनी म्हटलं आहे.
****
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालय ईडीने समन्स
बजावले आहे. राऊत यांना उद्या ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.
मुंबईतल्या १ हजार ३९ कोटी रूपयांच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले प्रविण
राऊत यांच्या ईडीने केलेल्या चौकशीच्या आधारे हे समन्स बजावण्यात आले आहे.
****
राज्य सरकारमधले सध्या अनुपस्थित असलेले पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील
खाती इतर मंत्र्यांना सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडचं नगर विकास, सार्वजनिक बांधकाम तसंच सार्वजनिक उपक्रम खाती
सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव पाटील यांच्याकडचं पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग
अनिल परब यांच्याकडे, दादाजी भुसे यांच्याकडचं कृषी आणि माजी सैनिक कल्याण खाते तसंच
संदिपान भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकरराव गडाख यांच्याकडे तर
उदय सामंत यांच्याकडील उच्च आणि तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात
आलं आहे.
राज्यमंत्री शंभूराज देसाई, राजेंद्र पाटील यड्रावकर, अब्दुल नबी सत्तार आणि बच्चू
कडू या चार मंत्र्यांकडील खाती संजय बनसोडे, विश्वजित कदम, प्राजक्त तनपूरे, सतेज पाटील,
आदिती तटकरे, दत्तात्रय भरणे यांच्याकडे विभागून देण्यात आली आहेत.
****
प्लास्टर ऑफ पॅरिस -पीओपीच्या मूर्ती बनवण्यावर आणि त्या वापरण्यावर राष्ट्रीय
हरित लवाद तसंच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बंदीविरोधात दाखल याचिका मुंबई
उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हरित लवादाचा निर्णय योग्य
ठरवलेला आहे, त्यामुळे आपण हे प्रकरण नव्याने ऐकू शकत नाही, असं उच्च न्यायालयाने स्पष्ट
केलं आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१० मध्ये पीओपीचा वापर न करण्याबाबत
मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली होती. २०२० मध्ये सुधारित मार्गदर्शक तत्त्वं जाहीर
करत गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात पीओपीच्या मूर्ती बनवण्यावर आणि त्या वापरण्यावर
बंदी घालण्यात आली आहे.
****
अग्निपथ योजनेला देशभरातून
तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत वायुसेनेसाठी नोंदणी सुरू झाली
आहे, यासाठी आतापर्यंत एक लाख ११ हजारांहून जास्त अर्ज प्राप्त झाले असल्याचं वृत्त
आहे.
****
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणी संदर्भातल्या शैक्षणिक आणि
प्रशासकीय बाबींवर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनानं शालेय शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली
समितीची स्थापना केली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील अंतिम
करण्यात आलेली २९७ कार्ये वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि कार्यवाहीवर नियंत्रण ठेवण्यासाठी
ही समिती स्थापन करण्यात आली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा वगळता
मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे हवामान विभागाच्या
आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मराठवाडा वगळता इतर भागात आतापर्यंत सरासरीपेक्षा ३० ते
४५ टक्के कमी पाऊस पडला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस ११ जूनला राज्यात दाखल झाला. त्यानंतर
१६ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापून मोसमी पावसाने पुढील वाटचालीस सुरुवात केली. गेल्या
चार ते पाच दिवसांपासून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. पुणे, सातारा आणि नाशिक घाट
परिसरात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
****
भारत श्रीलंका यांच्यात झालेल्या टी-ट्वेंटी महिला क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि
अंतिम सामना आज श्रीलंकेनं ७ गडी राखून जिंकला. भारतानं प्रथम फलंदाजी करत २० षटकांत
१३८ धावा केल्या. श्रीलंकेच्या संघानं १७ षटकांत ३ गडी बाद करत १४१ धावा केल्या. या
आधीचे दोनही सामने जिंकून भारतानं ही मालिका २-१ अशी जिंकली आहे. या दौऱ्यातल्या पुढील
तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेला १ जुलै पासून सुरूवात होणार आहे.
****
राज्य शासनाच्या “सर्वंकष माहितीकोश २०२१” या पुरस्कारासाठी केलेल्या उल्लेखनीय
कामगिरीबद्दल औरंगाबाद पोलीस उप आयुक्त अपर्णा गिते यांचा परवा २९ जून रोजी सांख्यिकी
दिनी गौरव करण्यात येणार आहे. गिते यांनी नियत प्रशासन शाखा, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे
शाखा, विशेष शाखा, शहर वाहतूक शाखा, पारपत्र शाखा, महिला तक्रार निवारण शाखा, दामिनी
पथक, अति शीघ्र दल, अशा लहान मोठ्या ४० जबाबदाऱ्या पार पाडताना अतिरिक्त जिल्हा समादेशक,
होमगार्ड औरंगाबाद हि सुध्दा जबाबदारी तितक्याच ताकदीने आणि सक्षमपणे सांभाळून केलेल्या
उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनाच्या वतीनं त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार
आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज हे श्रीमान योगी तर छत्रपती शाहू महाराज हे राजर्षी म्हणून
ओळखले जातात. दोघांची बिरूदं जरी वेगळी असली तरी त्याचा अर्थ एक आहे. दोघांनी सत्तेचा उपयोग समाजहितासाठी केला असल्याचं
मत प्राध्यापक इंद्रजीत भालेराव यांनी व्यक्त केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्र द्वारा आयोजित छत्रपती राजर्षी
शाहू महाराज जयंतीनिमित्त शिवशाहूंचा वारसा या विषयावर व्याख्यान देतांना ते आज बोलत
होते. राजर्षी शाहू महाराजांनी जात, धर्म, संप्रदायाच्या पलिकडे जाऊन गुणवत्तेला महत्त्व
देत बहुजन समाजाला सत्तेच्या केंद्रस्थानी आणलं. प्रचलित असणारी राज्यसत्ता अभिजन केंद्री
होती, मात्र, शिवशाहूंनी सत्तेचं विकेंद्रीकरण करत बहुजनीकरण केले असल्याचं इंद्रजित
भालेराव यावेळी म्हणाले.
****
No comments:
Post a Comment