Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 November
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ नोव्हेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
· संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ-विरोधकांच्या गदारोळाने दोन्ही सदनांचं कामकाज
स्थगित
· महात्मा गांधींच्या ग्रामस्वराज्य अभियानामुळे सहकार क्षेत्राला नवी ऊर्जा-आंतराष्ट्रीय
सहकार परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन
· मुख्यमंत्रिपदाचा निर्णय एकमताने घेत, महायुती स्थिर सरकार देणार-अजित
पवार यांना विश्वास
आणि
· बॉर्डर-गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेत यजमानांचा २९५ धावांनी दणदणीत पराभव करत भारताची
विजयी सलामी
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं.
लोकसभेत कामकाज सुरु होताच माजी खासदार वसंतराव चव्हाण, हरिश्चंद्र
चव्हाण यांच्यासह सदनाच्या दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. राज्यसभेतही
कामकाज सुरु झाल्यावर दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
अदानी उद्योग समूहाविरोधातल्या कथित लाचखोरी
प्रकरणावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी
तहकूब करण्यात आलं. दरम्यान, संविधानदिनानिमित्त उद्या दोन्ही सभागृहांची
बैठक होणार नाही.
****
उद्याच्या संविधानदिनानिमित्त आज नवी दिल्लीत
हमारा संविधान हमारा स्वाभिमान पदयात्रा काढण्यात आली. डॉ. मनसुख मांडवीय, पीयुष
गोयल, अर्जुन राम मेघवाल,
किरेन रिजिजू, गजेंद्रसिंग शेखावत, रक्षा
खडसे या केंद्रीय मंत्र्यांसह अनेक खासदार आणि ऑलिम्पिक मधे खेळलेले क्रीडापटू त्यात
सहभागी झाले होते. तसेच राष्ट्रीय छात्रसेनेचे, राष्ट्रीय सेवायोजनेचे विद्यार्थी
आणि इतर स्वयंसेवी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
महात्मा गांधींच्या ग्रामस्वराज्य अभियानामुळे
सहकार क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित आंतराष्ट्रीय सहकार परिषदेचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या
हस्ते झालं,
त्यावेळी ते बोलत होते. खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात सहकारातून
साधलेल्या यशाकडे लक्ष वेधतांना पंतप्रधान म्हणाले –
महात्मा गांधीजी के ग्राम
स्वराज ने सामुदायिक भागीदारी को .फिर से नई उर्जा दी। उन्होंने खादी और ग्रामोद्योग
जैसे क्षेत्र मे सहकारीता के माध्यम से एक नया आंदोलन खडा किया और आज खादी और ग्रामोद्योग
को हमारी को ऑपरेटीव्हज् ने बडे बडे ब्रांच से भी आगे पहोंचा दिया है।
ही परिषद सर्वांसाठी एकसंध, शांततापूर्ण
आणि समृद्ध भविष्य घडवण्यासाठी सहकारी संस्थांची भूमिका जाणून घेणार आहे. या सहा दिवसीय
परिषदेत भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे आणि फिजीचे उपपंतप्रधान मनोआ कामिकामिका
यांच्यासह जवळपास तीन हजार विदेशी आणि भारतीय प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा
यांनी या परिषदेत केलेल्या भाषणात, यंदा साजरं होत असलेलं सहकार
वर्ष हे महिला,
शेतकरी आणि गरीबांच्या सक्षमीकरणासाठी सहायक ठरेल, असा
विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले –
यू एन का धन्यवाद करना चाहतां
हूं, की इन्होंने 2025 के वर्ष को सहकारीता वर्ष के रूप में मनाने का एक फैसला लिया।
और मै ऐसा मानता हूं की ये फैसला समायोचित है। पुरी दुनिया के अंदर करोडो करोडो महिलायें,
किसान और गरीब के एम्पावरमेंट के लिये ये फैसला आशीर्वाद रूप होगा इसका मुझे पुरा भरोसा
है।
****
वक्फ सुधारणा विधेयक २०२४ च्या संयुक्त संसदीय
समितीमधल्या विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. संयुक्त संसदीय समितीचे प्रमुख, विरोधी
पक्षातल्या सदस्यांचं मत विचारात घेत नसून अहवाल तयार करण्याची घाई करू नये असं आपण
सभापतींना सांगितल्याची माहिती तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या बैठकीनंतर
माध्यमांना दिली. अध्यक्षांनी विरोधी पक्षांच्या खासदारांचं म्हणणं
ऐकून घेतलं आणि अहवाल सादर करण्याची मुदत वाढवण्याचं आश्वासन दिलं.
****
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर
विरोधक हतबल झाले असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी
केली आहे. संसदेबाहेर माध्यमांशी बोलतांना विरोधकांचे वर्तन अयोग्य असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी
आज माध्यमांशी बोलतांना,
एका विशिष्ट गटावर कथित लाचखोरीचे आरोप हा महत्त्वाचा मुद्दा
आहे. त्यावर संसदेत चर्चा व्हायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली.
****
मुख्यमंत्रिपदासंदर्भात महायुतीतले तिनही
पक्ष मिळून निर्णय घेऊ आणि राज्याला स्थिर सरकार देऊ, असा
विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. आधुनिक महाराष्ट्राचे
शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कराड
इथं प्रितीसंगम या त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर अजित पवार बोलत होते. ज्यांच्या
विचारधारा आणि आदर्शांवर आम्ही लोकसेवेचा वारसा पुढे नेत आहोत, चव्हाण
यांच्या दूरदृष्टीतील समृद्ध महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी लोकसेवेच्या माध्यमातून योगदान
देण्याचा दृढ संकल्प आपण केला असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या
विधिमंडळ गटनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली. विधानसभेच्या
गटनेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची तर प्रतोदपदी आमदार सुनील प्रभू यांची निवड झाल्याची
माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकारांना दिली. पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय
घेण्यात आल्याचे दानवे यांनी सांगितलं.
****
विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात बहुमताने
भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आले असून आम्ही पूर्ण ताकदीने उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या सोबत असल्याचं स्वाभिमानी पक्षाचे नेते रवी राणा यांनी म्हटलं आहे.
ते आज नागपूरममध्ये वार्ताहरांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस नेते
राहुल गांधी यांनी खोटी आश्वासनं दिल्यामुळे जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपाला कौल
दिल्याचं ते म्हणाले. रवि राणा बडनेरा मतदार संघातून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत.
****
येत्या १५ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या
लष्कर दिनाचं यजमानपद यंदा पुण्याकडे आहे. पुण्याच्या इतिहासातील हा एक मैलाचा दगड
ठरणार आहे. पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांची
१९४९ मध्ये नियुक्ती झाली. त्या घटनेच्या स्मरणार्थ लष्कर दिन संचलन आयोजित केलं जातं.
गेली अनेक वर्ष दिल्लीमध्ये होणारं हे संचलन आता २०२३ पासून वेगवेगळ्या शहरांमध्ये
आयोजित केलं जातं. या वर्षीचं संचलन पुण्याच्या बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप आणि सेंटर
इथं होणार आहे.
****
क्रिकेट
बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतला
पहिला सामना भारतानं २९५ धावांनी जिंकला आहे. भारतानं विजयासाठी दिलेलं ५३४ धावांचं
लक्ष्य गाठतांना यजमान संघ दुसऱ्या डावात अवघ्या २३८ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या
डावात कर्णधार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने तीन-तीन, वॉशिंग्टन
सुंदरने दोन तर हर्षित राणा आणि निशित रेड्डीने एक एक बळी घेतला. दोन्ही डावात मिळून
आठ बळी घेणारा बुमराह,
सामनावीर ठरला.
मालिकेत पुढचा सामना सहा डिसेंबरपासून ॲडलेड
इथं खेळवला जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर विभागात जल प्रकल्पातील
पाण्याचं सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली आहे.
आज विभागीय आयुक्त कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली, त्यावेळी
ते बोलत होते. विभागातल्या नऊ मोठ्या सिंचन प्रकल्पांचे अधिकारी उपस्थित होते. यंदा
पाऊस चांगला झाल्याने बहुतांश प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे. या पाण्याचं पिण्यासाठी, शेतीसाठी
तसेच उद्योगासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना त्यांनी दिली.
दरम्यान, जायकवाडी प्रकल्पाच्या
डाव्या कालव्यातून आज रब्बी हंगामासाठी पहिलं आवर्तन सोडण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड
तसंच परभणी या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
दरम्यान, या आवर्तनाच्या पार्श्वभूमीवर
कोणीही कालव्यात उतरू नये,
आपापली लहान मुले तसंच पशुधनाची काळजी घेण्याचं आवाहन जलसंपदा
विभागानं केलं आहे.
****
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेतल्या
जाणाऱ्या ६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आजपासून राज्यातील
जिल्हास्तरावरील विविध २४ केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. नांदेड केंद्रावर १३
संघ सहभागी होणार आहेत. नांदेड शहरासह परभणी जिल्ह्यातील विविध संघांचे प्रयोग या केंद्रावर
सादर होतील. ही स्पर्धा ६ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
****
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती
समितीच्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाला आजपासून सुरुवात होत आहे. या
महोत्सवात कवी संमेलन,
शालेय चित्रकला स्पर्धा, बाल आनंद मेळावा, गझल
गायन मैफल, शेतकरी परिषद आदी कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आलं असून,
विविध मान्यवरांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात
येणार आहेत. महोत्सवाचं हे ४० वं वर्ष आहे.
****
धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या
पथकाने एका तरुणाला जेरबंद करत त्याच्याकडून एक गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसं जप्त
केली. हा तरुण परभणी जिल्ह्यातला रहिवासी असल्याचं तपासात समोर आलं असून, पोलिसांनी
या तरुणाकडून जवळपास २८ हजार रुपयांचा मुद्देमाल
जप्त केला आहे.
****
No comments:
Post a Comment