Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 28 November 2024
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
·
सत्ता स्थापनेविषयी महायुतीतील प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत बैठक.
·
शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपच्या निर्णयाला पाठिंबा जाहीर, महायुतीत मतभेद नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा निर्वाळा.
·
निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेस पक्षाची स्वाक्षरी मोहीम
राबवण्याची घोषणा.
·
५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज गोव्यात समारोप.
आणि
·
राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात घट, शुक्रवारपर्यंत थंडीची
लाट कायम राहणार असल्याची हवामान विभागाची माहिती.
****
राज्यात
सत्तास्थापनेसंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ
शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज
दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्याला पाठिंबा असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. काल ठाणे इथं
वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,
भारतीय जनता पक्ष वरीष्ठ नेतृत्व जो निर्णय घेईल मुख्यमंत्री
बनवण्यासाठी त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे. तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय
जनता पक्षासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या
कार्यकाळात राज्यात केलेल्या विविध कामांचा यावेळी शिंदे यांनी आढावा घेतला.
दरम्यान, शिवसेना खासदारांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल अमित शहा यांचं अभिनंदन
आणि आभार व्यक्त करण्यासाठी ही भेट घेतल्याचं, शिवसेना खासदार प्रतापराव
जाधव यांनी सांगितलं.
****
दिल्लीतल्या
बैठकीत पुढील सरकार स्थापनेसंदर्भातील चर्चा होईल, असं राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर
विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होते. नवीन सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन
उपमुख्यमंत्री असतील, हे सरकार स्थिरतेने काम करेल आणि सर्व समाजाला सोबत
नेईल, असं पवार म्हणाले. ईव्हीएमवर तेव्हाच आरोप होतात, जेव्हा एखाद्याचा पराभव
होतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी ईव्हीएमबद्दल होत असलेल्या आरोपांवर दिली.
****
महायुतीमध्ये
एकमेकांबद्दल कधीही मतभेद नव्हते, आम्ही नेहमीच एकत्र निर्णय घेतले
असल्याचं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सत्तास्थापनेसंदर्भात लवकरच
निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं.
****
झारखंडचे
मुख्यमंत्री म्हणून झारखंड मुक्तिमोर्चाचे नेते हेमंत सोरेन आज शपथ घेणार आहेत.
रांचीमधे मोऱ्हाबादी मैदानावर होणाऱ्या सोहळ्यात राज्यपाल संतोषकुमार गंगवार
त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. ८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभेत इंडिया
आघाडीचं संख्याबळ ५६ असून, भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही
आघाडीचे २४ उमेदवार निवडून आले आहेत.
****
यापुढे
निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात या प्रमुख मागणीसाठी कॉंग्रेस पक्षाकडून दोन
दिवसांनी स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
नाना पाटोले यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात स्पष्ट
बहुमत मिळूनही अद्याप सरकार बनलं नाही, यावर त्यांनी टीका केली. माजी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह
कॉंग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यासंदर्भात
देशभरात आम्ही जनआंदोलन करणार असून, कोट्यवधी सह्या घेऊन मतपत्रिकेवर
मतदान घेण्याची मागणी राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे
न्यायमूर्ती आणि निवडणूक आयोग यांच्याकडे करणार असल्याचं, पटोले यांनी सांगितलं.
****
एका
खासगी उद्योग समूहाच्या लाचखोरी प्रकरण आणि विविध मुद्यांवरून विरोधकांच्या
गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल बाधित झालं.
लोकसभेत
अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना सदनाचं कामकाज चालवण्यासाठी सभागृहाचे
शिष्टाचार आणि प्रतिष्ठा राखण्याची वारंवार विनंती केली. प्रश्नोत्तराच्या
तासानंतर सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, असं आश्वासन त्यांनी
दिलं. मात्र, विरोधकांनी सभागृहाच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू ठेवली. राज्यसभेतही
कामकाज सुरु ठेवण्यासंदर्भात आवाहन करुनही विरोधकांचा गदारोळ सुरुच राहील्यानं
कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.
****
भारतीय
रेल्वेनं हायस्पीड रेल्वेच्या निर्मीती आणि उत्पादनाचं काम सुरू केलं असल्याचं
सरकारनं म्हटलं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही
माहिती दिली. इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या सहकार्यानं हाय स्पीड रेल्वेची रचना तयार
करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, समाज माध्यमावर प्रसारित होणारा अश्लील मजकूर रोखण्यासाठी सध्याचे कायदे आणखी
मजबूत करणं गरजेचं असल्याचं, वैष्णव यांनी पुरवणी प्रश्नांना उत्तर
देताना सांगितलं. समाज माध्यम हे आजघडीला वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचं मोठं माध्यम
असलं, तरी त्यावरच्या आशयाचं संपादन होत नसल्यामुळे अनेक प्रकारचे अश्लील मजकूर
देखील प्रकाशित केले जातात, असं ते म्हणाले.
****
विकसित
भारत २०४७ च्या संकल्पाला जोडूनच बालविवाहमुक्त भारताचं लक्ष्य असल्याचं, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे. नवी
दिल्लीत बालविवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात केल्यानंतर त्या काल बोलत होत्या.
गेल्या दहा वर्षात महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं लिंग समानतेसाठी जेंडर बजेटसारखी
विविध पावलं उचलली आहेत, असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात
बालविवाह मुक्त भारत पोर्टलची सुरुवात करण्यात आली.
****
पंचावन्नाव्या
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीचा आज समारोप होत आहे. गोवा इथं
दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ दिवस चाललेल्या
या महोत्सवात ७५ देशांमधले २०० हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले. सिनेसृष्टीतील
दिग्गजांचे मास्टरक्लास, आणि प्रेरणादायी पॅनेल चर्चेसह, अनेक उपक्रम राबवण्यात आले. समारोप सोहळ्यात विविध पुरस्कारांचं वितरण होणार
आहे.
****
पर्यावरण
आणि विकास यामध्ये समन्वय असला पाहिजे, पर्यावरणाबाबत दुराग्रही भूमिका नसावी, असं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल 'पर्यावरणासाठी
जीवनशैली : शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन' या विषयावरील
चर्चासत्राचं उद्घाटन काल राज्यपालांच्या उपस्थितीत झालं, त्यावेळी ते बोलत होते.
देशात जलसंवर्धन आणि नदीजोड प्रकल्पांचं काम झाल्यास अन्नधान्याचं उत्पादन अनेक
पटींनी वाढेल आणि भारत संपूर्ण जगासाठी अन्नधान्य उत्पादन करू शकेल, असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य
आपत्ती व्यवस्थापनाच्या बळकटीकरण कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर
महानगरपालिकेच्या वतीने खाम नदी पूर विश्लेषण अहवाल तयार करण्यात आला असून, या अहवालाचं काल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते
विमोचन झालं. पूर आराखडा तयार करण्यात निष्णात असलेल्या ॲल्यूबियम या संस्थेनं हा
अहवाल तयार केला असून, यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणासाठी मोठी मदत होणार
आहे. या संस्थेनं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतले अधिकारी आणि तज्ञ मंडळींशी
वेळोवेळी सल्लामसलत करून खाम नदीच्या सात किलोमीटर परिसराचा अभ्यास केला. तसंच खाम
नदीच्या पात्रात कसे बदल घडून येतात यावरही अहवालात नमूद करण्यात आलं असून, पूर व्यवस्थापनासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आलं आहे.
****
लष्कर
प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अहिल्यानगर इथल्या मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर
अँड स्कुल मध्ये काल एका समारंभात मेकॅनाइज्ड इन्फंट्रीच्या चार बटालियन्सना
प्रतिष्ठित राष्ट्रपती ध्वज प्रदान केले. हा कार्यक्रम त्यांच्या अनुकरणीय आणि
राष्ट्रासाठी केलेल्या गुणवत्तेचा गौरव होता. मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटच्या
सव्वीसाव्या आणि सत्तावीसाव्या बटालियनला आणि ब्रिगेड ऑफ द गार्ड्सच्या वीसाव्या
आणि बावीसाव्या बटालियनला प्रेसिडेंट कलर्स प्रदान करण्यात आला.
****
बीड
जिल्ह्यातल्या १४ प्राथमिक आरोग्य केंद्राकरता सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नवीन
रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य
जिवने यांचे हस्ते या केंद्रांना रुग्णवाहिका हस्तांतरीत करण्यात आल्या.
****
केंद्र
पुरस्कृत पंचवार्षिक २१ वी पशुगणना होत असून, ती २८ फेब्रुवारी २०२५
पर्यंत सुरु राहणार आहेत. पशुसंवर्धन विभागामार्फत नेमलेले प्रगणक घरी आल्यानंतर
पशुपालकांनी त्यांच्याकडील पशुधनांची अचूक माहिती प्रगणकांना द्यावी, असं आवाहन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने आणि
पशुसंवर्धन विभागामार्फत छत्रपती संभाजी नगरचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त गणेश
देशपांडे यांनी केलं आहे.
****
धाराशिव
जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या काही गावांमध्ये बिबट्या आढळून आला आहे. खबरदारीचा
उपाय म्हणून कपिलापुरी, सोनारी, खामसगाव, रुई, सोनगिरी, कारंजा, भोजा, वांगेगव्हाण, लोणी आणि खासगावासह इतरही गावात वन कर्मचारी तैनात
केले असून, ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन वन विभागाने केलं आहे.
****
महाराष्ट्र
लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२४ येत्या
एक डिसेंबर रोजी बीड जिल्हा केंद्रावरील एकूण १० उपकेंद्रामधून २ सत्रात घेण्यात
येणार आहे. परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
****
क्रीडा
आणि युवक सेवा संचालनालय आणि बीड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त
विद्यमाने बीड इथं येत्या चार आणि पाच डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं
आयोजन करण्यात आलं आहे. युवकांनी या महोत्सवात सहभागी होण्यासाठी दोन
डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं केलं आहे.
****
राज्यात
अनेक ठिकाणी तापमानाच लक्षणीय घट झाली आहे. नाशिकमध्ये काल दहा पूर्णांक सहा, तर निफाडला आठ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातही पारा बारा अंशांपर्यंत घसरला आहे. शुक्रवारपर्यंत थंडीची
लाट कायम राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं.
****
No comments:
Post a Comment