Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
• संविधान भारतीय लोकशाहीचा आधार - राष्ट्रपतींचं प्रतिपादन, वर्षभर चालणाऱ्या संविधान महोत्सवाला देशभरात सुरुवात.
• संविधान नागरिकांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक - पंतप्रधानांचं प्रतिपादन, देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणार असल्याची ग्वाही.
• विधानसभा निवडणुकीत मतदान आणि मतमोजणीत तफावत असल्याच्या वृत्ताचं निवडणूक आयोगाकडून खंडन.
• केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या बालविवाह मुक्त भारत अभियानाची आजपासून सुरुवात.
आणि
• केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आपत्ती व्यवस्थापनासाठी १०० कोटींचा निधी मंजूर.
****
आपल्या देशाचं संविधान लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. संविधान दिनानिमित्त काल राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहाला संबोधित केलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. भारतीय संविधान स्वीकारल्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हमारा संविधान हमारा स्वाभिमान’ या वर्षभर चालणाऱ्या ऐतिहासिक उत्सवाचं यावेळी उद्घाटन झालं. नागरिकांचा वैयक्तिक आणि सामाजिक स्वाभिमान सुनिश्चित करण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रगतीशील आणि सर्वसमावेशक विचारांची पेरणी केली, असं राष्ट्रपती मुर्मू यांनी नमूद केलं.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाखाली संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन यावेळी करण्यात आलं. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे.
****
भारताच्या संविधानानं देशाची प्रत्येक अपेक्षा आणि गरज पूर्ण केली असून, नागरिकांसाठी दीपस्तभांप्रमाणे मार्गदर्शक ठरलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आपलं संविधान देशाच्या वर्तमान आणि भविष्यासाठीही मार्गदर्शक आहे, गेल्या ७५ वर्षात देशापुढे जी आव्हानं उभी राहिली त्यावर मात करण्यासाठी संविधानानं योग्य मार्ग दाखवला, असं ते म्हणाले. देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या कोणत्याही दहशतवादी संघटनेला चोख प्रत्यूत्तर देण्याच्या भारताच्या संकल्पावर त्यांनी भर दिला. विकसित भारत निर्माण करणं, हाच प्रत्येक भारतीयाचा उद्देश असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले...
आज हर देशवासी का एक ही ध्येय है- विकसित भारत का निर्माण। विकसित भारत का मतलब है, जहां देश के हर नागरिक को एक quality of life मिल सके, dignity of life मिल सके। ये सामाजिक न्याय, सोशल जस्टिस का भी बहुत बड़ा माध्यम है। और ये संविधान की भी भावना है।
भारत एक चैतन्यशील लोकशाही आणि राजकीय नेतृत्व म्हणून उदयाला येत असून, देशाच्या परिवर्तनाला संविधानानं हातभार लावला आहे, असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमात भारतीय न्यायपालिकेचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
****
राज्यात सर्वत्र संविधान दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. मुंबई इथं मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं. राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये संविधान उद्देशिकेचं सामुहिक वाचन करण्यात आलं.
मराठवाड्यातही संविधान दिनानिमित्त रॅलीसह अनेक कार्यक्रम राबवण्यात आले. यासंदर्भातला हा आढावा...
छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकातून भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा, संवर्धन समितीतर्फे रॅली काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं.
धाराशिव इथं मतदार जनजागृती समितीच्या वतीने संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. जिजाऊ चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत निघालेल्या या रॅलीत नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं, तसंच संविधान रॅली काढण्यात आली.
नांदेडमध्ये घर घर संविधान प्रभात फेरी तसंच जिल्हा नेहरू युवा केंद्राच्या वतीनेही संविधान सन्मान रॅली, आणि हिंगोली जिल्ह्यात हिवरा फाटा ते कळमनुरी पर्यंत मोटर सायकल रॅली काढण्यात आली.
परभणी, जालना आणि बीड जिल्ह्यात अनेक शाळा, महाविद्यालयं, शासकीय, निमशासकीय कार्यालयं, तसंच सामाजिक संघटनांच्यावतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जालना शहरातल्या जेईएस महाविद्यालयात विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची शपथ देण्यात आली. बीड इथं 'जाणून घ्या आपले संविधान' या विषयावर निवडणूक उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांचं व्याख्यान झालं.
आकाशवाणी बातम्यांसाठी, विविध जिल्ह्यातल्या वार्ताहरांसह, समीर पाठक, छत्रपती संभाजीनगर
****
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान आणि मोजणीची मतं जुळत नसल्याचा आरोप करणारं ऑनलाइन न्यूज पोर्टलचं वृत्त, निवडणूक आयोगानं फेटाळलं आहे. यासंर्भात राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम यांनी या पोर्टलच्या संपादकांना पत्र लिहिलं असून, या अहवालात पाच लाखाहून अधिक मतं जुळत नसल्याचा आरोप, दिशाभूल करणारा असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. ईव्हीएमवर विरोधकांचे आरोप निवडणुका हरल्यावरच केले जातात, असं निरीक्षण न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पी बी वराळे यांच्या पीठानं नोंदवलं.
****
सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला काल १६ वर्ष पूर्ण झाले. मुंबई पोलिस मुख्यालयात, राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त केली. हुतात्म्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित आजी - माजी पोलिस अधिकाऱ्यांची राज्यपालांनी भेट घेतली.
छत्रपती संभाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या वतीने या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं, तसंच ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात या घटनेतील वीरमरण आलेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर घेण्यात आलं.
****
१४ व्या विधानसभेचा कार्यकाळ काल संपल्यानं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पहावं, असं राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं. आता नवनिर्वाचित आमदारांची १५ वी विधानसभा गठित करण्याची आणि नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल. नवीन सरकारस्थापनेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
****
देशभरात आजपासून बालविवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात होणार आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते नवी दिल्लीत या अभियानाची सुरुवात होणार असून, बालविवाहासारख्या प्रथा देशातून समूळ नष्ट करणं, हा याचा उद्देश आहे. या कार्यक्रमात बालविवाह मुक्त भारत पोर्टल देखील सुरु करण्यात येणार असून, या माध्यमातून जागरुकता वाढवणं, तसंच बालविवाहासारख्या घटनांची त्वरीत माहिती मिळण्यासाठी उपयोग होणार आहे.
****
केंद्र सरकारने महाराष्ट्रासह १५ राज्यांसाठी भूस्खलन जोखीम शमन आणि नागरी संरक्षण क्षमता बांधणीसाठी एकूण एक हजार ११५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने हा निर्णय घेतला असून, याअंतर्गत महाराष्ट्रासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच सर्व राज्यांतल्या नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीसाठी ११५ कोटी ६७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
****
केंद्र सरकारच्या ‘सहकार से समृद्धी’ योजनेंतर्गत ग्रामीण भागातल्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून ५०० ते एक हजार मेट्रिक टन क्षमतेचं धान्य गोदाम उभारलं जाणार आहे. केंद्रीय सहकार मंत्रालय, नाबार्ड आणि राज्य सहकार मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात राबवला जाईल. भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघटना - एससीसीएफचे प्रकल्प संचालक तपसकुमार राय यांच्या उपस्थितीत काल नाशिक जिल्ह्यात सात विविध कार्यकारी सोसायट्यांशी करार प्रक्रिया पार पडली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. हे गोदाम बांधणीसाठी ३३ टक्के अनुदान दिलं जाणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यात प्रायोगिक तत्वावर मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामासंदर्भात स्वच्छ भारत अभियानाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे यांनी आढावा घेतला. मानवत पंचायत समितीमध्ये तालुक्यातील निवडक ग्रामपंचायतींची केंद्रे यांनी संवाद बैठक घेतली. मैला गाळ व्यवस्थापन प्रक्रिया नेमकी कशी कार्यान्वित होणार आहे यासाठी या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रोटेगांव- परसोडा रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून, काहींच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नगरसोल - नरसापूर ही गाडी आजपासून २२ डिसेंबरपर्यंत नगरसोल ते लासूर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. ही गाडी लासूर इथून दुपारी दीड वाजता सुटेल. नांदेड - श्रीगंगानगर एक्सप्रेस २८ नोव्हेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत, नांदेड - जम्मू तावी एक्सप्रेस २९ नोव्हेंबर ते सहा डिसेंबर पर्यंत, आणि नांदेड - अंब अंदौरा एक्सप्रेस तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर पर्यंत ५५ मिनिटं उशिरा धावणार आहेत.
****
मुंबई- लातूर आणि मुंबई- बीदर या जलदगती गाड्यांचा कायमस्वरूपी विस्तार केला जाणार असून, या गाड्यांना एकूण २१ डबे जोडले जाणार आहेत. विस्तारित मुंबई-लातूर गाडी एक डिसेंबर रोजी मुंबईहून सुटेल.
****
No comments:
Post a Comment