Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
• पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी
• पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला भुवनेश्वर इथं प्रारंभ
• विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब
• गोंदिया जिल्ह्यात शिवशाही बसला भीषण अपघात-११ प्रवासी ठार तर २९ प्रवासी जखमी
• यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जाहीर
आणि
• आयसीसी अजिंक्यपद चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात न जाण्याच्या भूमिकेवर बीसीसीआय ठाम
****
देशातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी दिली आहे. २३ राज्यातल्या या योजनांसाठी देण्यात येणाऱ्या विशेष आर्थिक मदतीवर पुढची ५० वर्षं कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंग्रहालय तसंच कृत्रिम प्रवाळ निर्मिती प्रकल्पासाठी ४६ कोटी रुपये, तर नाशिक इथं रामकाल मार्गासाठी ९९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पर्यटनामध्ये अनेकांच्या जीवनात समृद्धी आणण्याची क्षमता असून, सरकार देशात पर्यटन पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देत राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला ओडिशात भुवनेश्वर इथं कालपासून प्रारंभ झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उदघाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आणि उद्या या परिषदेत सहभागी होत आहेत. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, एआय टूल्समुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. विशिष्ट सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलिस पदकंही या परिषदेत प्रदान करण्यात येणार आहेत.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज कालही बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच एका खासगी उद्योग समूहाच्या कथित लाचप्रकरणाच्या मुद्यावर काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, समाजवादी पक्षासह विरोधी पक्षाच्या इतर सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढतच गेल्यानं सदनाचं कामकाज आधी तासाभरासाठी, तर नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं.
राज्यसभेतही विरोधी पक्षांची चर्चेची मागणी फेटाळून लावत सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र गदारोळ वाढत गेल्यानं, राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी स्थगित झालं.
****
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात काल मुंबईत ईव्हीएम- इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाचं खापर विरोधक ईव्हीएमवर फोडत असल्याची प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली. काँग्रेस पक्षानंही ईव्हीएम आणि एकूणच मतदान प्रक्रियेवर शंका व्यक्त केली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे हे आरोप हास्यास्पद असल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ते काल मुंबई इथं माध्यमांशी बोलत होते. ईव्हीएमविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यापूर्वी महाराष्ट्रासह देशभरातील विविध निवडणुकांत विजयी झालेल्या काँग्रेस लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यायला हवा. त्यानंतरच, काँग्रेस नेते ईव्हीएमबाबत गंभीर असल्याचं मानलं जाईल, असं मुनगंटीवार म्हणाले. देशात ईव्हीएमवर निवडणुका घेण्याचा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळात झाला, ईव्हीएमची खरेदीही काँग्रेस सरकारच्या काळातच झाल्याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधलं.
दरम्यान, राज्यात नव्या सरकारचा शपथविधी लवकरात लवकरच होईल, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.
****
गोंदिया जिल्ह्यात काल शिवशाही बसला भीषण अपघात होऊन ११ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २९ प्रवासी जखमी झाले. भंडारा -गोंदिया मार्गावरच्या बिंद्रावन टोला गावाजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. दरम्यान, या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीने उपचार देण्यात यावेत, अशी सूचना गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. अपघातात मृतांच्या वारसाला प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत, त्यांनी जाहीर केली आहे.
****
गदिमा प्रतिष्ठानचे विविध पुरस्कार काल जाहीर झाले. कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी काल पुणे इथं पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार, तर अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगूळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रसिद्ध कथा, पटकथा, संवाद लेखक आणि गीतकार क्षितीज पटवर्धन यांना यंदाचा चैत्रबन पुरस्कार, तर प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार देण्यात येणार आहे, येत्या १४ डिसेंबरला पुण्यात टिळक स्मारक मंदिर सभागृहात समारंभपूर्वक या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
पुढच्या वर्षी होणाऱ्या आयसीसी अजिंक्यपद चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात न जाण्याच्या भूमिकेवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआय ठाम आहे. काल यासंदर्भात झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी, खेळाडूंची सुरक्षा सर्वोपरी असल्याचं नमूद केलं. या स्पर्धेसाठी भारताचे सामने तिसऱ्या कोणत्याही देशात खेळवण्याच्या हायब्रीड पद्धतीवर बीसीसीआय ठाम आहे, तर पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळानं या प्रकाराला विरोध दर्शवल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
५३ वी आंतरजिल्हा आणि ८६ वी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा परवा दोन ते सहा डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. या स्पर्धेत २५ जिल्ह्यांमधील एक हजाराहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत.
****
क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेचं काल धुळे इथं उदघाटन करण्यात आलं. या स्पर्धेसाठी १४, १७ आणि १९ वर्ष वयोगटातील मुलं आणि मुलींचे संघ धुळ्यात दाखल झाले आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, आणि क्रीडा अधिकाऱ्यांनी खेळाडूंना शपथ देत स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.
****
राज्याच्या वेगवेगळ्या शहरातून बेपत्ता झालेली मुले, तसंच महिलांच्या शोधासाठी पोलिसांकडून ‘ऑपरेशन मुस्कान - १३’ ही विशेष मोहीम १ ते ३० डिसेंबर या कालावधीत राबवली जाणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल ही माहिती दिली. बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी २४ तास आणि ३६५ दिवस प्राधान्य देण्यात येत असल्याचं, अमितेश कुमार यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारची ॲग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संकल्पनेनुसार शेतकऱ्यासाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. www.mhfr.ॲग्रीस्टॅक.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन नागरिकांनी स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक करावा, तसंच शेतकरी ओळख निर्माण करण्याची कार्यवाही मोठया प्रमाणात होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रचार तसंच प्रसार करावा, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, मरखेल अंतर्गत पेडपल्ली या गावात २३ नोव्हेंबर रोजी चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून आले होते. या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी या गावाला भेट दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष गृहभेटी देऊन, तात्काळ प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक बाबींची माहिती दिली तसच आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
****
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा इथल्या साबरमती द ग्लोबल स्कूल या शाळेत १०० विद्यार्थी तसच लातूर इथल्या स्वामी विवेकानंद इंटीग्रेशन इंग्लिश स्कूल या शाळेत १०० विद्यार्थांची प्रवेशासाठी निवड झालेली आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी ५ डिसेंबर २०२४ पर्यंत लातूर इथल्या इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक यांच्या कार्यालयात लेखी अर्ज करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे येत्या ९ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आलं आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी येत्या १६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या योजनेसाठी विकसित करण्यात आलेल्या एच एम ए एस डॉट एम ए एच ए आय टी डॉट ओ आर जी या नवीन पोर्टलवर अर्ज करण्याचं आवाहन लातूरचे समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी केलं आहे.
****
राज्यात थंडीची कडाका वाढत असून पुढचे तीन दिवसात काही जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात काल सर्वात कमी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागानं केली आहे.
****
No comments:
Post a Comment