Friday, 27 December 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.12.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 December 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

****

माजी पंतप्रधान पद्मविभुषण डॉ मनमोहनसिंग यांचं निधन-सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर.  

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान-महाराष्ट्रातल्या दोन मुलींचा गौरव. 

सुपोषित ग्राम पंचायत योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ. 

जलसंधारणाचं महत्त्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढच्या महिन्यात पाणलोट यात्रा काढण्यात येणार.

बीड जिल्ह्यात येत्या ३० आणि ३१ डिसेंबरला रेल्वेची जलदगती चाचणी.

आणि

बॉर्डर गावसकर मालिकेच्या चौथ्या कसोटीत पहिल्या डावावर यजमान संघाची पकड मजबूत. 

****

माजी पंतप्रधान पद्मविभुषण डॉ मनमोहनसिंग यांचं काल दिल्लीत निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. काल रात्री प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्समध्ये दाखल करण्यात आलं, मात्र रात्री नऊ वाजून ५० मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याचं, रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. २६ सप्टेंबर १९३२ रोजी अखंड भारतातल्या पंजाब प्रांतात जन्मलेले मनमोहनसिंग यांनी २००४ ते २०१४ असे दहा वर्ष देशाचे १३ वे पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली. डॉ सिंग यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा संक्षिप्त वृत्तांत...

अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीला प्रारंभ करणारे डॉ सिंग यांची १९७२ साली अर्थमंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली, अर्थखात्याचे सचिव, रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते अशी विविध पदं समर्थपणे सांभाळलेले डॉ सिंग यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून सुत्रं स्वीकारली. या काळात त्यांनी आर्थिक सुधारणांसाठी उल्लेखनीय काम केलं. २००४ साली संयुक्त पुरोगामी आघाडीने डॉ सिंग यांची पंतप्रधानपदी निवड केली. ही जबाबदारी त्यांनी सलग दहा वर्ष समर्थपणे सांभाळली. याच वर्षी एप्रिल महिन्यात त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. देशाच्या अर्थव्यवस्थेत दिलेल्या योगदानासाठी १९८७ साली त्यांना पद्मविभुषण सन्मान प्रदान करण्यात आला होता.  


डॉ मनमोहनसिंग यांच्या निधनाबद्दल देशभरातून दु:ख व्यक्त होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.  

केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. डॉ सिंग यांच्या पार्थिव देहावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

****

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रदान करण्यात आले. कला तसंच संस्कृती, धाडस, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, क्रीडा आणि पर्यावरण अशा विविध सात श्रेणींमध्ये १७ बालकांना असाधारण कामगिरीसाठी गौरवण्यात आलं, महाराष्ट्रातल्या दोन मुलींचा यावेळी गौरव करण्यात आला. यात मुंबईची १३ वर्षीय केया हटकर आणि अमरावतीच्या १७ वर्षीय करिना थापा हिचा समावेश आहे. केया हटकर, डान्सिंग ऑन माय व्हील्स आणि आय एम पॉसिबल या दोन बेस्टसेलर पुस्तकांची लेखिका आहे. तर करिना थापा हिने गॅस सिलिंडरच्या आगीतून स्थानिकांचे प्राण वाचवल्याबद्दल तिला गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर करिना थापा हिने आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं. 

आज जो मुझे अवार्ड मिला है, वो मेरे बहादुरी के कारण मिला है। मै सिर्फ इतना ही कहेना चाहती हूं की, हमे मुसीबत से घबराना नही चाहीये। मुसीबत से हमे पिछे नही हटना चाहीये। बल्की उसका सामना करना चाहीये, क्योंकी डर के आगे जीत है।

****

केया हटकर हिने आपलं मनोगत व्यक्त करतांना, दिव्यांग मुलांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. 

I feel really honored. For a child like me, who is differently able, children with rare deceases are talented. It is very hard to get into mainstream faces. People think that we are not talented and most parents keep them at home to feel that they are burden on family and even society think them as a curse. So I think that, that mindset should be changed and opportunities must be given. I think that getting this award, how government is actually telling that we do not exclude people, but we do include them.


दरम्यान, देशासाठी केलेलं प्रत्येक कार्य वीरता असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल वीर बाल दिनी, दिल्लीत झालेल्या विशेष कार्यक्रमात बोलत होते. शीख धर्मियांचे दहावे गुरू, गुरू गोविंदसिंह यांची दोन धाकटी मुलं, बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

सुपोषित ग्राम पंचायत योजनेचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. पोषण आहाराशी संबंधित सेवा सुविधा सामाजिक योगदानातून ग्रामपंचायत पातळीवर उपलब्ध करुन देणं हे या अभियानाचं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले...

ये अभियान पुरी तरह से जनभागिदारी से आगे बढेगा। कुपोषण मुक्त भारत के लिये,ग्रामपंचायतो के बीच एक हेल्दी कॉम्पिटिशन तंदुरुस्त स्पर्धा हो। कुपोषित ग्रामपंचायत विकसित भारत का आधार बने, ये हमारा लक्ष है।


यावेळी झालेल्या संचलनाला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला आणि मानवंदना स्वीकारली. विविध राज्यांच्या पारंपरिक समृद्धीचं दर्शन घडवणारी वेशभूषा केलेली सुमारे तीन हजाराहून अधिक मुलं आणि चित्ररथ या संचलनात सहभागी झाले होते. सांगली शिक्षण संस्थेच्या पथकानं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत लेझीम कलाप्रकाराचं प्रात्याक्षिक सादर केलं. 

****

अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं आपलं काम पारदर्शकपणे करावं अशा सूचना  अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत. ते काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. आपला विभाग स्मार्ट शिधापत्रिका आणि आधुनिक गोदाम व्यवस्था याला प्राथमिकता देणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.

****

जलसंधारणाचं महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जानेवारी महिन्यापासून पाणलोट यात्रा काढण्यात येणार असल्याचं, मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं, जल व भूमी व्यवस्थापन संस्था-वाल्मीत बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. वाल्मीला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी ५४६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, शासनस्तरावर पाठपुरावा, अधिक अनुदान मागणी तसंच पदभरतीचे प्रस्ताव मार्गी लावणार असल्याचं, राठोड यांनी सांगितलं. 

****

बीड जिल्ह्यात येत्या ३० आणि ३१ डिसेंबर रोजी विघनवाडी ते राजूरी या मार्गावरून रेल्वेची जलदगती चाचणी होणार आहे. या चाचणीदरम्यान रेल्वे मार्गाजवळ कोणीही येवू नये, असं आवाहन रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

बीडपासून काही अंतरावर असलेल्या राजुरीपर्यंत या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे विघनवाडीपासून राजूरीपर्यंतच्या या नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी येत्या सोमवार-मंगळवारी होणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत नियोजित असलेल्या या चाचणीदरम्यान, नागरिकांनी या रेल्वे मार्गापासून दुर राहावं, तसंच पाळीव प्राणी रूळावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. 

रवी उबाळे आकाशवाणी बातम्यांसाठी बीड 

****

जालना जिल्ह्यातल्या परतूर इथं एका कारखान्यात स्फोट होऊन दोन कामगार ठार तर अन्य काही कामगारी जखमी झाले. काल सायंकाळी बागेश्वरी सहकारी साखर कारखान्यात ही घटना घडली. सल्फर टाकीचा स्फोट होऊन या कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती परतूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी दिली.

****

कळंब इथल्या श्री साईराम तसंच ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या शाखेत ज्या ठेवीदारांना मुदत संपूनही ठेवीच्या रक्कमा परत मिळालेल्या नाहीत, अशा ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलिस निरीक्षक गणेश कानगुडे यांनी केलं आहे. बचत खात्यावरील रक्कम परत न मिळालेल्या खातेधारकांनीही संपर्क साधण्याचं आवाहन, कानगुडे यांनी केलं आहे.

****

क्रिकेट 

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावावर यजमान संघानं पकड मजबुत केली आहे. मेलबर्न इथं होत असलेल्या या सामन्यात, ऑस्ट्रेलिया संघानं कालच्या सहा बाद ३११ धावसंख्येवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ पुढे सुरू केला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा, ऑस्ट्रेलियाच्या सात बाद ४४० धावा झाल्या होत्या. या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.

****

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला हेलस तर्फे दरवर्षी साने गुरुजी जयंतीनिमित्त घेण्यात येणाऱ्या कथाकथन स्पर्धेत यंदा नांदेडच्या महात्मा फुले हायस्कूलची विद्यार्थिनी संचिता हिने विभागीय स्तरावर पहिला क्रमांक पटकावला आहे. परभणी इथं झालेल्या या विभागीय स्पर्धेत संचितानं उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम आणि इतर शिक्षकांनी संचिताचं कौतुक केलं आहे. 

****

राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प राबवण्यात येत आहे, परभणी जिल्ह्यात उद्या शनिवारी आणि रविवारी या दोन दिवशी ई-पीक पाहणीची विशेष मोहीम राबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत. 

****

बीड जिल्ह्यातील मानसिक आजारी आणि बौध्दिक दिव्यांग व्यक्तीकरता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीनं मनोन्याय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमुळे मानसिक आजारी आणि बौध्दिक दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळवणे सोपे जाईल, असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी.जी.सोनी यांनी व्यक्त केला आहे. 

****


No comments: