Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 November 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ नोव्हेंबर २०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ही उद्दीष्टपूर्ती
करण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा
सलाम. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. सणासुदीच्या
काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य
स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत
काँग्रेसचे जितेश अंतापूरकर ४१ हजार ९३३ मतांनी विजयी; दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या
कलाबेन डेलकर यांचा विजय
·
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयकर विभागाची नोटीस, नातेवाईकांच्या
नावावर महाराष्ट्रासह दिल्ली आणि गोव्यात असलेल्या शेकडो कोटी रूपयांच्या बेनामी मालमत्तेवर
टाच
·
माजी गृहमंत्री
अनिल देशमुख यांना सहा
नोव्हेंबरपर्यंत सक्तवसूली संचालनालयाची कोठडी
·
तीस
नोव्हेंबर पर्यंत राज्यात शंभर टक्के लसीकरण करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी दिलं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उद्दिष्ट
·
कोविडमुळे पती गमावलेल्या आणि उत्पन्नाचं साधन नसलेल्या महिलांसाठी राज्य सरकारची वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा
योजना
·
राज्यात नवे एक
हजार ७८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात
तीन जणांचा मृत्यू, ४० बाधित
आणि
·
औरंगाबाद पंचायत समितीच्या काँग्रेसच्या सभापती छाया घागरे यांचा
भारतीय जनता पक्षात प्रवेश
****
नांदेड जिल्ह्याच्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर
४१ हजार ९३३ मतांनी विजयी झाले. अंतापूरकर यांना एक लाख आठ हजार ८४० मतं मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुभाष साबणे यांना ६६ हजार ९०७ मतं मिळाली, वंचित बहुजन आघाडीचे उत्तम इंगोले यांना ११ हजार
३४८, तर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे विवेक
केरुरकर यांना ४६७ मतं मिळाली. अंतापूरकर यांना निवडणूक
निर्णय अधिकाऱ्यांनी निवडून आल्याचं प्रमाणपत्र काल प्रदान केलं. यावेळी
काँग्रेसचे नेते तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
दरम्यान, अंतापूरकर यांचा ४१
हजारांपेक्षा जास्त मतांनी झालेला विजय म्हणजे महाविकास
आघाडी सरकारच्या कामाला जनतेनं दिलेली पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
यासह
विधानसभेच्या २९ आणि लोकसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकालही काल जाहीर झाले.
दादरा
नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा विजय झाला. मध्य प्रदेशातल्या
खांडवा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपनं, तर हिमाचल प्रदेशातल्या मंडी लोकसभा पोटनिवडणुकीत
काँग्रेसनं विजय मिळवला.
आसाममध्ये
विधानसभेच्या पाचही जागांवर भाजप आणि मित्रपक्षांची विजय मिळवला. पश्चिम
बंगाल मध्ये चारही जागांवर तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांनी,
तर हिमाचल प्रदेशमधल्या तीनही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. मध्य प्रदेशातल्या
तीन विधानसभेच्या जागांपैकी दोन भाजपनं, तर एक जागा काँग्रेसनं जिंकली. मेघालय मध्ये
तीन जागांपैकी दोन जागा मेघालय लोकशाही आघाडीनं, तर एक जागा यूडीपीनं जिंकली. राजस्थानमधल्या
दोन्ही विधानसभेच्या जागांवर काँग्रेस पक्षानं विजय मिळवला.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयकर विभागानं नोटीस बजावली असून,
त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर महाराष्ट्रासह दिल्ली आणि गोव्यात असलेल्या शेकडो
कोटी रूपयांच्या बेनामी मालमत्तेवर, बेनामी मालमत्ता कायद्याअंतर्गत टाच आणली आहे.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आणि मुंबईतील नरीमन पॉईट इथल्या टॉवरचा यात समावेश असल्याचं,
अधिकृत सूत्रांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाचे नेते किरिट सोमय्या यांनी पवार यांच्याकडे
एक हजार कोटी रुपयांहून अधिक बेनामी संपत्ती असल्याचा आरोप केला होता, त्यानंतर काल
आयकर विभागानं ही नोटीस बजावली आहे. जरंडेश्वर
साखर कारखान्याच्या माध्यमातून पवारांच्या खात्यात शेकडो कोटी रुपये असून, ही सर्व रक्कम त्यांनी
कुटुंबियांच्या खात्यात वळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान,
अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर
विभागानं टाच आणलेली नाही,
किंवा त्यासंदर्भातली कोणतीही नोटीस त्यांना प्राप्त झालेली नाही, असं अजित पवार यांचे वकील
प्रशांत पाटील यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात प्रसिद्धी
माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत,
खोडसाळपणाचे आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
****
भ्रष्टाचार प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री
अनिल देशमुख यांना मुंबईच्या विशेष
न्यायालयानं, येत्या सहा नोव्हेंबरपर्यंत सक्तवसूली संचालनालय - ईडीची कोठडी
सुनावली आहे. ईडीने देशमुख यांना सोमवारी
रात्री उशीरा मुंबईत अटक केली, काल
त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. देशमुख यांना लाचखोरीच्या आरोपांमुळे यावर्षी
आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
****
तीस नोव्हेंबर पर्यंत राज्यात शंभर टक्के लसीकरण करण्याचं
उद्दीष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. विक्रमी संख्येनं दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी
आहे, आणि यापूर्वी तशा मात्रा
दिलेल्या आहेत, त्यामुळे लसीकरणाला आता अधिक गती देण्याची सूचना त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी
आज कोविड लसीकरण आढावा घेणार असून, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत काल दूरदृश्य प्रणालीद्वारे पूर्वतयारी आढावा बैठक झाली,
त्यावेळी ते बोलत होते. कोविड संसर्गाचं प्रमाण कमी होत असलं तरी चाचण्यांचं
प्रमाण कमी होता कामा नये, असं ते म्हणाले. सार्वजनिक आरोग्य
मंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीत बोलताना, लसीकरण मोहिमेत
स्थानिक पदाधिकारी यांचा सहभाग घ्यावा, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्यांना लसीच्या दोन्ही मात्रा
अनिवार्य कराव्यात, डोंगरी भागात मोबाईल युनिटच्या
माध्यमातून लसीकरण करण्यात यावं, असे निर्देश दिले.
****
कोविडमुळे पती गमावलेल्या आणि उत्पन्नाचं दुसरं
साधन नसणाऱ्या विधवांसाठी राज्य सरकारनं, वीरभ्रदकाली
ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या शासन
निर्णयान्वये जिल्हा स्तरावरून गावनिहाय माहिती प्राप्त करून, या महिलांना स्वयंसहाय्यता समुहामध्ये प्राधान्यानं समाविष्ट करण्यात येणार आहे. या समुहातल्या
सदस्यांना फिरता निधी आणि समुदाय गुंतवणूक निधीही अदा करायला प्राधान्य दिलं जाणार
आहे. या एकल-विधवा महिलांना प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, आणि प्रधानमंत्री
स्वच्छ भारत योजनेचे, ३४२ रूपये निधी
भरायला बिनव्याजी कर्जही उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तसंच या महिलांना आरोग्य विमा योजनेचाही
लाभ देण्यासाठी पात्र महिलांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट केलं जाणार
आहे.
****
राज्यात काल नवे एक हजार ७८ कोरोना विषाणू
बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची
एकूण संख्या ६६ लाख १२ हजार, ९६५ झाली
आहे. काल ४८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात
या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४०
हजार २७४ झाली असून, मृत्यूदर दोन
पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल एक हजार ९५
रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५३ हजार ५८१ रुग्ण, कोरोना
विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक
५९ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १५ हजार ४८५
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४० नवीन कोविडबाधितांची
नोंद झाली, तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद, परभणी
आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात १४ नवे रुग्ण आढळले.
बीड जिल्ह्यात नऊ, नांदेड पाच, परभणी चार, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी
तीन, तर जालना आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला.
****
[$AB89D14E-5308-429A-8A73-A9DB7B02155C$RAVIKUMAR MID BREAK NEW - RAVIKUMAR MID BREAK NEW - ]
****
देशभरात काल धनत्रयोदशी साजरी करण्यात आली. हा
दिवस आरोग्य आणि धनसंपदेचा संदेश देणारा दिवस असल्याचंही
मानलं जातं असल्यानं, यमदीपदान आणि धन्वंतरी पूजनही करण्यात
आलं. दिवाळीत अभ्यंगस्नानाचं महत्त्व असलेली नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाची
दिवाळीची अमावस्या उद्या साजरी होणार आहे.
****
औरंगाबाद पंचायत समितीच्या काँग्रेसच्या
सभापती छाया घागरे यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री
रावसाहेब दानवे, आमदार हरीभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत बनगाव इथं झालेल्या पक्षाच्या
कार्यकर्ता मेळाव्यात घागरे यांनी पक्षप्रवेश केला.
****
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या बारसवाडा फाट्यावर जैवइंधनाचा अवैध व्यवसाय उघडकीस आला आहे. पुरवठा
विभागानं काल केलेल्या कारवाईत सुमारे २१ हजार लीटर बायोडिझेल, डिझेल साठवण्यासाठी वापरण्यात
येणाऱ्या टाक्या, दोनशे लीटरचे १७ बॅरल, जनरेटर आणि अन्य साहित्य, असा
एकूण सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईदरम्यान दोन संशयित
घटनास्थळावरून पसार झाले, या प्रकरणी दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
****
नांदेड इथले ज्येष्ठ
साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांना, अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा,
२०२१ चा यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. समारोहाचे संयोजक दगडू लोमटे
यांनी ही माहिती दिली. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ
असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या २५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत अंबाजोगाई इथं
नियोजित यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या समारोप सत्रात, कदम यांना हा पुरस्कार
प्रदान करण्यात येणार आहे.
****
परभणी शहरातल्या नागरिकांनी माझी
वसुंधरा अभियानांतर्गत दिवाळी हरित आणि पर्यावरण पूरक साजरी
करण्याचं आवाहन, महापालिका आयुक्त
देविदास पवार यांनी केलं आहे. भारत सरकारच्या अधिसूचनेनुसार १२५ डेसिबल पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या
फटाक्यांची निर्मिती, विक्री, आणि वापर
करण्यास बंदी घालण्यात आली असल्याचं, त्यांनी सांगितलं. विविध
सण -उत्सवातलं निर्माल्य जलप्रदूषण होऊ नये यासाठी विहीर आणि
तलावात न टाकता, त्यांचा वापर आपल्याच
घरातल्या परसबागेत वृक्षांना खत करण्यासाठी करावा, असं
पवार यांनी सांगितलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात आजादी का
अमृत महोत्सवानिमित्त विविध गावांमध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिरं घेण्यात आली.
धुळे जिल्हा नेहरू युवा
केंद्र आणि प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेतर्फे शिरपूर तालुक्यातील
खर्दे बुद्रुक गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त विशेष स्वच्छता
अभियान जनजागृती फेरी काढण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यातल्या
मानवत बाजार समितीमध्ये येत्या आठ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीसाठी लिलाव
सुरु होणार आहे. समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांनी ही
माहिती दिली. कापूस हंगाम सुरु झाला असल्यानं जिनिंग संघटना,
व्यापारी तसंच संचालक मंडळाच्या यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
लातूर जिल्हयात आज आणि उद्या
तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला
आहे.
****
No comments:
Post a Comment