Saturday, 26 March 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 March 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 March 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ मार्च २०२ सायंकाळी ६.१०

**** 

कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन आम्ही श्रोत्यांना करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      वाहनांमधून होणारं ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा करणार - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा.

·      सीएनजी वरील व्हॅट कपातीची येत्या १ एप्रिलपासून अंमलबजावणी.

·      उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात औरंगाबादची स्वतंत्र ओळख - उद्योगमंत्री सुभाष देसाई.

आणि

·      वाढत्या महागाई विरोधात औरंगाबाद इथं महिला काँग्रेसचं आंदोलन.

****

वाहनांमधून होणारं ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा करणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यात दोन महामार्गांचं लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी हा फक्त अन्नदाताच नव्हे तर ऊर्जादाता बनावा असं मत त्यांनी व्यक्त केलं. या पुढे, बग्यास पासून तयार होणारं, बिटूमिन हे रस्त्यासाठी वापरलं जाणार आहे, ऊसापासून फक्त साखरे ऐवजी, इथनॉल बनवलं जावं अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. दुष्काळी भागात खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाचा खर्च शासन करेल, तसंच मोफत शेततळे बांधून दिले जातील आणि जो कच्चा माल निघेल तो रस्त्यासाठी वापरला जाईल असं गडकरी यावेळी म्हणाले.

पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ पेढीच्या १९० व्या वर्धापन दिनाच्या निमित्त गडकरी यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. वाहनांना पारंपारिक वाद्यांच्या आवाजातील हॉर्न बसवले, जातील असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्य सरकारनं नैसर्गिक वायू सीएनजी वरील मूल्य वर्धित कर-व्हॅट साडे तेरा टक्यांवरुन कमी करत तीन टक्के केला आहे. नवीन दर येत्या १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी यासंदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली.

****

उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात औरंगाबादनं स्वत:ची ओळख निर्माण केली असल्याचं, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथल्या ऑरीक औद्योगिक नगरीमध्ये विदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी आठ देशातील राजदुतांसमवेत आज ऑरिक सिटीत झालेल्या बैठकीत देसाई बोलत होते. आंतराष्ट्रीय उद्योग उभारणीसाठी संवाद आणि सहकार्य तसंच पायाभूत सुविधांच्या उपलब्धेतसह ‘मेक इन इंडिया,’ ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र या उपक्रमातून आंतराष्ट्रीय उद्योग उभारणीस सहकार्य आणि आवाहन करण्यात येत असल्याचं देसाई यांनी यावेळी सांगितलं. गुंतवणूकदारांना दर्जेदार उत्पादन निर्मितीसाठी ऑरिक सिटी शिवाय पर्याय नसून, ऑरीक औद्योगिक नगरीमध्ये उद्योजकांसाठी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती देसाई यांनी दिली.

दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिकेने अधिकारी वर्गासाठी पाच नवीन इलेक्ट्रॉनिक कार तसंच शहरातील नाले सफाई, मलबा उचलणे या कामासाठी तीन हायवा ट्रक खरेदी केले. या वाहनांचं आज पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.

****

अकोला जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील १०९ विधवांना नाम फाउंडेशनच्या वतीनं आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी २७ लाख २५ हजार रुपयांचे धनादेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या महिलांना मदतीचा हात देण्याचं कार्य उल्लेखनीय आहे अशा शब्दात जिल्हाधिकारी अरोरा यांनी नाम फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला

****

'परीक्षा पे चर्चा' हा कार्यक्रम या वर्षी येत्या एक एप्रिलला नवी दिल्लीतल्या तालकटोरा मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाचा हे पाचवं वर्ष असून या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षेतला ताणतणाव बाजूला ठेवून परीक्षेला सामोरे कसं जावं, याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. या कार्यक्रमासाठी इयत्ता नववी ते बारावीचे शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची निवड ऑनलाइन स्पर्धेद्वारे केली जाते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ८७वा भाग असेल.

****

देशभरात १०० नवीन सैनिकी शाळा स्थापन करण्यात येणार आहेत. सामाजिक संस्था, खाजगी शाळा, राज्य सरकारांच्या भागीदारीतून अशा २१ नवीन सैनिक शाळांच्या स्थापनेला सरकारने मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणं आणि त्यांना सशस्त्र दलात सामील होण्यासह करिअरच्या संधी उपलब्ध करून देणं, हा या मागचा उद्देश आहे.

****

देशातली आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा दोन वर्षांच्या कालावधीनंतर आज मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं मार्च २०२० मध्ये कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान सेवा स्थगित केली होती. आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचं कठोर पालन केलं जाईल. जगभरात झालेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीमुळे आणि योग्य त्या सल्लामसलतीनंतर अनुसूचित व्यावसायिक आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंत्रालयानं घेतला आहे.

****

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आय पी एल २०२२ आजपासून सुरु होत आहे. यामध्ये दहा संघ सहभागी होत आहेत. यंदा या स्पर्धेत 'लखनौ सुपर जायंट्स' आणि 'गुजरात टायटन्स' हे दोन नवे संघ खेळणार आहेत. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर आज पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.

****

वाढत्या महागाई विरोधात औरंगाबाद जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं आज शहरातल्या क्रांती चौक इथं आंदोलन करण्यात आलं. मागच्या आठवड्यापासून तीन वेळा इंधनाची दरवाढ झाली आहे, यामुळे जगणं कठीण झालं आहे. हे थांबवण्यासाठी, केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेल यांचा वस्तू आणि सेवाकर - जीएसटी मधे समावेश करावा अशी मागणी यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव सरोज मसलगे पाटील, जिल्ह्याध्यक्ष हेमा पाटील, शहराध्यक्षा अंजली वडजे यांनी केली. ७० वर्षात देशात एवढी महागाई कधीही वाढली नव्हती, अच्छे दिनचं स्वप्न दाखवून जनतेची घोर निराशा केली जात असल्याची टीका काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह चौक सुशोभिकरण कामास लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजित सिंह पाटील यांनी दिली आहे. तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत श्री क्षेत्र तुळजापूर मंदिर, मंदिर परिसर आणि शहर विकासाकरिता ३१५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.

****

एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत नांदेड इथं २१ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान पोषण आहार जनजागृती पंधरवडा अभियान राबवण्यात येत आहे. आज तरोडा बुद्रुक इथं अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी कार्यकर्तीचा मेळावा घेण्यात आला. या भागातील सामाजिक कार्यकर्त्या नंदा कल्याणकर, डॉ. प्रिती जोशी, यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केलं.

****

 

No comments: