Wednesday, 28 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 28 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २८ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      कोविडच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या रुग्णालयांमध्ये मॉक ड्रील;आरोग्य व्यवस्थेची सज्जता  

·      सीमा भागातली मराठी भाषिक गावं समाविष्ट करण्याचा ठराव विधीमंडळात एकमताने मंजूर

·      भ्रष्टाचाराच्या आरोपावरून जालना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर निलंबित

·      औरंगाबाद इथं पहिलं महिला कृषी महाविद्यालय स्थापन होणार; कृषीमंत्र्यांची घोषणा

·      माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

·      जल जीवन मिशनअंतर्गत औरंगाबाद परिक्षेत्रातल्या पस्तीस गावांसाठीच्या वॉटर ग्रीड योजनेला मान्यता

आणि

·      श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत हार्दिक पंड्या भारतीय संघाचा कर्णधार

 

 

सविस्तर बातम्या

कोविडच्या संभाव्य प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या शासकीय तसंच खासगी रुग्णालयांमध्ये आरोग्य व्यवस्था सज्ज केली जात असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीया यांनी म्हटलं आहे. काल देशभरात कोविड व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेचा सराव घेण्यात आला. दिल्लीत सफदरजंग रुग्णालयात आरोग्य मंत्र्यांनी या तयारीचं निरीक्षण केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले...

 

 

Byte ..

सारे देश में कोविड ट्रीटमेंट देनेवाली सभी अस्पताल मे मॉक ड्रील की जा रही है, ताकी हमारी सारी हॉस्पिटल कोविड केस देश मे बढे तो संपूर्ण तरीके से तयार रहे। सफदरगंज अस्पताल में आके कोविड वॉर्ड का निरीक्षण किया। जिस तरह से यहाँ व्यवस्था की गई है, वैसे ही व्यवस्था देश की सभी सरकारी अस्पताल मे और प्रायव्हेट अस्पताल मे भी तयारी की जा रही है। राज्य मे राज्य के हेल्थ मिनिस्टर उसको मार्गदर्शन कर रहे है। निरीक्षण कर रहे है।

 

देशभरात सर्वत्र आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेचा अशाच मॉकड्रील मधून आढावा घेण्यात आला. औरंगाबाद इथं मेल्ट्रॉन रुग्णालयात ही सराव चाचणी घेण्यात आली. वैद्यकीय प्राणवायू व्यवस्थापन तसंच औषधी साठा सुरळीत असल्याबाबत यावेळी खात्री करण्यात आली.

 

नांडेड जिल्ह्यातही काल बारा कोविड समर्पित रुग्णालयांमध्ये सराव चाचणी घेण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावेत आणि लसीकरण पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावं, असे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

 

परभणी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेची पूर्वतयारी झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. परभणी शहरात चार तर जिल्ह्यात चौदा रुग्णालयांमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आली आहेत. जिल्ह्यात कोविड लसींच्या ३७ हजार मात्रा उपलब्ध असल्याची माहिती गीते यांनी दिली.

 

दरम्यान, देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दोनशे वीस कोटींहून अधिक लसमात्रा देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. २२ कोटी २३ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.

****

नाकातून देण्यात येणाऱ्या भारत बायोटेकची इनकोव्हॅक लस कोविन ॲप वर उपलब्ध करण्यात आली असून, या लसीचं शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. खाजगी रूग्णालयात या लसीची किंमत ८०० रुपये, तर सरकारी रूग्णालयात ३२५ रूपये निश्चित करण्यात आले आहेत.

****

कर्नाटक - महाराष्ट्र सीमा भागातल्या आठशे पासष्ट मराठी भाषिक गावांची इंचन् इंच जागा महाराष्ट्राचीच आहे, आणि सीमा भागातल्या मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणे सर्व ताकदीनिशी उभं आहे, असा ठराव, काल विधानसभेत आणि त्या पाठोपाठ विधान परिषदेत एकमतानं मंजूर करण्यात आला. बेळगाव, बीदर, धारवाड, निपाणी, भालकी आणि कारवार या शहरांसह, आठशे पासष्ट मराठी भाषिक गावं महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी, कायदेशीर लढा देण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी हा ठराव मांडताना व्यक्त केला. कर्नाटकच्या मराठीविरोधी भूमिका आणि वर्तनाचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले....

 

Byte …

बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह ८६५ गावांतील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभा आहे. याबाबत केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्याच्या न्याय्य मागण्यांसाठी व मराठी भाषिक खेडे, घटक, भौगोलिक सलगता, मराठी भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्यता व महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठीची तेथील लोकेच्छा या तत्वानुसार महाराष्ट्राला साथ देण्यासाठी केंद्र शासनाला देखील विनंती करणे असा ठराव ही विधानसभा आज निर्धारपूर्वक एक मताने पारित करीत आहे.

****

 

दरम्यान सीमा भागातल्या या आठशे पासष्ट गावांचा मुख्यमंत्री सहायता देणगी योजनेत समावेश केला असून, तिथे महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सीमा भागातल्या मराठी संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेमार्फत अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या उपक्रमासाठी, २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरता एक कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

****

राज्य सरकारने सीमा प्रश्नासंदर्भात ठराव संमत केल्याबद्दल शिवसेना पक्ष्रप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचं अभिनंदन केलं आहे. मात्र कर्नाटक सरकार करत असलेल्या आगळिकीबद्दल सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

****

लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना विश्वासात घेऊनच पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार करणार असून, याबाबत कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत दिली. सदस्य अमोल मिटकरी यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा मार्गिकेबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

****

आपल्या पक्षनेत्यांची तुलना महापुरुषांशी करणं, हा महापुरुषांचा अवमान होत नाही का, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिदेत विचारला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी  नियम २८९ नुसार महापुरुषांचा अवमानासंदर्भात प्रस्ताव मांडला, मात्र उपसभापतींनी हा प्रस्ताव फेटाळून लावल्याने गदारोळ झाला, या गदारोळातच फडणवीस बोलत होते. देवदेवता, संत महात्मे तसंच महापुरुषांबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून होणारी वक्तव्य फडणवीस यांनी सदनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र गदारोळ वाढत गेल्यामुळे उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.

****

राज्यातल्या महानगरपालिका आणि इतर ठिकाणी प्रक्रिया करण्यात आलेलं पाणी औद्योगिक विकास महामंडळानं विकत घेऊन ते उद्योगांसाठी वापरावं, यासाठी आवश्यक सूचना देण्यात येतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं. यामुळे धरणातलं पाणी शिल्लक राहून ते पिण्यासाठी वापरता येईल, असं ते म्हणाले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तत्कालीन मराठा आरक्षित मात्र न्यायलायाच्या निर्णयामुळे नियुक्त होऊ न शकलेल्या सर्व उमेदवारांना आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गात नियुक्त्या दिल्या जातील, अशी ग्वाही देखील फडणवीस यांनी दिली. याबाबतचा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रसिद्ध केलेल्या, सरळसेवा भरतीच्या एकूण चारशे तीस जाहिरातींसाठी दिव्यांग आरक्षणानुसार भरती प्रक्रिया राबवली जाईल, असं मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितलं. उमेदवारांच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा विचार करता येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

जालन्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांना निलंबित करत असल्याची घोषणा, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काल विधानसभेत केली. भ्रष्टाचार आणि महिलांसोबत आक्षेपार्ह वर्तणूक या मुद्यावरून ही कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत करार तत्त्वावर असलेल्या डॉ. अर्चना पाटील आणि डॉ. सतीश पवार या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा संपुष्टात आणल्याची माहिती सावंत यांनी दिली.

राज्यातले गडकिल्ले, ऐतिहासिक वारसा स्थळांच्या जीर्णोद्धारासाठी येत्या तीन वर्षात एक हजार कोटी रुपये निधी उपलब्ध केला जाईल, असं सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितलं.

शेतकऱ्यांचं विविध प्रकारचं होणारं नुकसान मोजण्यासाठी एक ॲप विकसित करून ई- पंचनामे करण्याची प्रणाली विकसित केली जात असल्याची माहिती, मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

****

राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषधे आणि अन्य बाबींचा नियमित पुरवठा होण्यासाठी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर, महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याबाबत राज्य शासन विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलं असून, प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

महिलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी औरंगाबाद इथं पहिलं महिला कृषी महाविद्यालय सुरु केलं जाणार आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल विधान परिषदेत ही घोषणा केली. राज्यात ४८ शासकीय आणि अनेक खासगी कृषी महाविद्यालये आहेत. या प्रत्येक महाविद्यालयामध्ये महिला प्रवेशासाठी ३० टक्के जागा राखीव करण्यात आल्या आहेत. औरंगाबादमध्ये उप कृषी विद्यापीठ सुरु करण्याबाबत समिती गठित करण्यात आली असून, या समितीच्या अहवालानंतर निर्णय घेण्यात येईल असं सत्तार यांनी सांगितलं.

****

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या काल सातव्या दिवशी विधान भवनाच्या आवारात महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिंडीच्या टाळांच्या तालावर सरकारविरोधी घोषणा देत आंदोलन केलं. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या दिंडीत मंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली.

****

अनुसूचित जाती - जमाती तसंच ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात काल विधान भवनावर इशारा मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीनं मानधन वाढीच्या मागणीसाठी काल मोर्चा काढला. दिव्यांग शाळा आणि कर्मशाळा कर्मचारी कृती समितीच्या वतीनंही काल विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.

****

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाला आणखी स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन पीठानं नकार दिला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेल्या देशमुख यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची मागणी केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयनं या पीठाकडे केली होती, न्यायालयानं ती काल फेटाळून लावली. देशमुख यांची कारागृहातून जामिनावर मुक्तता होऊ शकते.

****

जल जीवन मिशन मोहिमेअंतर्गत औरंगाबाद परिक्षेत्रातल्या पस्तीस गावांसाठीच्या सुमारे एकशे चौतीस कोटी रुपये मूल्याच्या वॉटर ग्रीड अर्थात नळ पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या संदर्भातला शासन निर्णय जारी झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद तालुक्यातल्या पिसादेवी, झाल्टा, गांधेली, गेवराई तांडा, तीसगाव, दौलताबाद, शरणापूर, केसापुरी, जटवाडा यासह पस्तीस गावांना नळानं पाणी पुरवठा करता येणार आहे.

****

श्रीलंकेविरुद्ध टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेचा संघ काल जाहीर करण्यात आला. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातल्या या संघात सूर्यकुमार यादव उपकर्णधार, ईशान किशन यष्टीरक्षक, ऋतुराज गायकवाड, शुभमन गील, दीपक हुडा, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीपसिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, राहुल त्रिपाठी, शिवम मावी, मुकेश कुमार, यांचा समावेश करण्यात आला आहे. या मालिकेत तीन तारखेचा पहिला सामना मुंबईत, पाच तारखेचा दुसरा सामना पुण्यात तर अखेरचा तिसरा सामना ७ तारखेला राजकोट इथं होईल. त्यानंतर दोन्ही संघात तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका होणार आहे.

****

जालना शहरातल्या नथुमल वासुदेव या कापड विक्रीच्या दुकानातले एक कोटी ७० लाख रुपये चोरणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या चौघांकडून एक कोटी ६९ लाख रुपये हस्तगत करण्यात आले. दुकानात काम करणाऱ्या एका नोकरानेच तीन साथीदारांच्या मदतीनं ही चोरी केल्याचं तपासात समोर आलं आहे.

****

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राबवण्यात येणाऱ्या चला जाणूया नदीला याअभियाना अंतर्गत बीड जिल्ह्यातल्या मांजरा नदीची निवड करण्यात आली आहे. मांजरा नदीच्या उगमापासून काठालगतची गावं आणि तिथल्या नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी चार जानेवारीपासून सहा दिवस नदी संवाद यात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी ही माहिती दिली.

****

अंबाजोगाई पत्रकार संघाचे पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. पत्रकार संघाचे विश्वस्त नानासाहेब गाठाळ आणि अंबाजोगाई पत्रकार संघाचे विश्वस्त अशोकराव गुंजाळ यांना पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. भिकाभाऊ राखे स्मृती पत्रकारिता पुरस्कार बीडचे ज्येष्ठ पत्रकार डॉ लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांना, तर धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कार, बीडचे पत्रकार अभिजीत नखाते यांना जाहीर झाला आहे. येत्या दर्पण दिनी सहा जानेवारी २०२३ रोजी अंबाजोगाई इथं हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

****

नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात जवळा देशमुख इथं येत्या तीस तारखेला जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. सप्तरंगी साहित्य मंडळाच्या या साहित्य संमेलनाचं हे दुसरं वर्ष आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक - समीक्षक डॉक्टर राम वाघमारे यांची निवड झाली आहे.

****

No comments: