Thursday, 27 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 27.04.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 27 April 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २७ एप्रिल  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      देशभरात नवीन १५७ परिचर्या महाविद्यालय सुरू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

·      छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात, ११ पोलिस दलाच्या जवानांना वीरमरण

·      इफ्कोच्या द्रवरूप नॅनो डायमोनियम फॉस्फेट खताचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण

·      अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचं एक लाख मराठा उद्योजक तयार करण्याचं उद्दिष्ट

·      मराठवाडा आणि विदर्भात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट

आणि

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर २१ धावांनी विजय

सविस्तर बातम्या

देशभरात नवीन १५७ परिचर्या महाविद्यालय - नर्सिंग कॉलेज सुरू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत काल हा निर्णय झाल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसूख मांडवीय यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. या कामासाठी एक हजार ५७० कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार असून, प्रत्येक महाविद्यालयासाठी १० कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. बीएससी नर्सिंगचं प्रशिक्षण घेतलेल्यांसाठी जगभरात मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे येत्या दोन वर्षात ही महाविद्यालयं उभारण्याचा निर्णय घेतल्याचं मांडवीय यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली होती.

****

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात, ११ पोलिस दलाच्या जवानांना वीरमरण आलं. काल दुपारी अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, हा हल्ला झाला. नक्षलवाद्यांविरोधातल्या मोहिमेवरून, दंतेवाडा इथं परतत असलेल्या, पोलिसांच्या जिल्हा राखीव रक्षक दलाचं वाहन, नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट करून उडवलं. त्यात दहा पोलिस जवान आणि एक वाहन चालक, अशा ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी, या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या हल्ल्याची गंभीर दखल घेत तत्काळ मुख्यमंत्री बघेल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. नक्षलवाद्यांच्या विरोधात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही शाह यांनी दिली.

****

आकाशवाणी ही भारतीय जनतेच्या आत्म्याचा आवाज असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या शंभराच्या भागानिमित्त प्रसारभारतीनं काल नवी दिल्लीत 'मनकीबात@हंड्रेड' ही राष्ट्रीय परिषद घेतली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालेल्या या परिषदेचा सायंकाळी शाह यांच्या उपस्थितीत समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसंवादासाठी आकाशवाणीची निवड केली, ही आनंदाची बाब असल्याचं अमित शाह यांनी नमूद केलं. ते म्हणाले...

 

Byte…

लोकतंत्र के अंदर जनसंवाद के अनेक माध्यम होते हैं और मोदीजीने मेरे जैसे व्यक्ती के लिए बहोत आनंद की बात है, की आकाशवाणी को जनसंवाद के लिए चुना हैं. क्यौंकी मै बचपन से आकाशवाणी का बहोत बडा प्रशसंक रहा हूं. मै हमेशा मानता हुं के, आकाशवाणी भारत की जनता की आत्मा की आवाज हैं, और ए बात मैं इसलिए कहता हूं की ढेर सारी महत्वपूर्ण यादे मैने आकाशवाणी पर ही सुनी हैं

 

या परिषदेच्या उद्घाटन समारंभात उपराष्ट्रपतींच्या हस्ते मन की बातच्या कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन झालं, तर समारोप सोहळ्यात गृहमंत्र्यांच्या हस्ते, मन की बात च्या शताब्दीप्रित्यर्थ, १०० रुपये दर्शनी मूल्याचं विशेष नाणं तसंच एका टपाल तिकिटाचं प्रकाशन करण्यात आलं.

या परिषदेला माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंग ठाकूर, सचिव अपूर्व चंद्रा, पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवर तसंच मन की बातमध्ये पंतप्रधानांनी ज्यांचा उल्लेख केला असे शंभर जण उपस्थित होते. यामध्ये राज्यातील सात जणांचा समावेश होता.

मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग येत्या रविवारी ३० तारखेला प्रसारित होणार आहे.

****

इफ्कोनं तयार केलेल्या द्रवरूप नॅनो डायमोनियम फॉस्फेट खताचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्ली इथं लोकार्पण केलं. एक गोण खताऐवजी फक्त बाटलीभर नॅनो डिएपी खत वापरता येणार आहे, यामुळे खताच्या वाहतुकीवरचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. या खतामुळे सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन मिळेल तसंच खतांच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यात मदत होईल, असं ते म्हणाले.

****

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं देशातल्या जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेचं अभिनंदन केलं आहे. हे आपल्या सर्वांचं सामूहिक यश असून, आता जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा सुद्धा सर्वांनी यशस्वी करण्याचं आवाहनही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आदी योजना एकत्रितपणे राबवल्याचं हे यश आहे, असं फडणवीस यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. अन्य राज्यात तळी आणि जलसाठे अधिक असले तरी जलसंवर्धनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. २०१८-१९ या वर्षात ही गणना करण्यात आली होती, यापैकी बहुसंख्य जलसाठे हे जलसंवर्धन योजनांमधले असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

****

पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर इथंल्या, तापोळा - महाबळेश्वर रस्त्याचं भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या, बामणोली - दरे पुलाचं काम लवकरच सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, महाबळेश्वर, पाचगणी ही गिरिस्थानं प्लास्टिकमुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली ओह. महाबळेश्वर इथं महाबळेश्वर, पाचगणी आणि इतर परिसरातल्या पर्यटन विषयक कामांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. अस्तित्वात असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी, वन विभागाने परवानगी विचारू नये, असं त्यांनी सांगितलं.

****

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने एक लाख मराठा उद्योजक तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आघाडी सरकारने बंद केलेली ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज देण्याची योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महामंडळानं घेतला असून, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत असलेली १० लाखांची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवून, परतफेड कालावधी सात वर्षांपर्यंत करण्यात आल्याचं, पाटील यांनी सांगितलं. मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना सुरु करण्यात येणार असून, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित होणार असल्याचं ते म्हणाले.

****

रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाचं काम प्राथमिक स्तरावरही पोहोचलेलं नाही, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत खासदार शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. या प्रकल्पाबाबत सध्या माती परीक्षण सुरू असून, या परीक्षणाचा अहवाल आल्यानंतरच या ठिकाणी प्रकल्प होईल की नाही, हे निश्चित होईल, असं ते म्हणाले. खासदार शरद पवार यांच्याशी नाट्यपरिषदेसंदर्भात बैठक होती, मात्र बारसू संदर्भात पवार यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग सरकार नक्की करून घेईल, असं सामंत यांनी सांगितलं.

****

दरम्यान, एखादा प्रकल्प राबवताना स्थानिकांना विश्वासात घ्यावं, त्यांचा विरोध असेल, तर तो का आहे, हे समजून घेण्याची गरज खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. बारसू रिफायनरी संदर्भात काल मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रकल्पासंदर्भात अधिकारी आणि आंदोलकांची आज बैठक आहे. या बैठकीतून काही तोडगा निघाला नाही, तर एकत्र बसून चर्चेतून करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याची सूचना उद्योगमंत्री सामंत यांना केल्याचं, पवार यांनी सांगितलं.

****

शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण, प्रशिक्षण आणि आंतरवासिता सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. राज्य कौशल्य विद्यापीठाचे विविध उद्योगसमूहांशी काल लोढा यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सामंजस्य करार झाले, त्यावेळी ते बोलत होते. मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अशाप्रकारे प्रशिक्षित करून देशात आणि परदेशातही उत्तम पगाराच्या नोकरीच्या संधी मिळतील, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला .

****

सोलापूर जिल्ह्यात ५०० एकर परिसरात वनउद्यान अर्थात ऑक्सिजन पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा, वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ते काल सोलापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या संदर्भात शहर वासियांच्या आणि जिल्ह्यातल्या तज्ञांच्या काही सूचना असतील, तर त्या शासनाला तातडीने कळवाव्यात, असं आवाहनही मुनगंटीवार यांनी केलं आहे. पंढरपूर इथं उभारण्यात येत असलेल्या नामसंकीर्तन सभागृहासाठी, शासनानं ६५ कोटी रुपयांचा निधी खर्च केला असून, आणखी २० कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहितीही, त्यांनी दिली. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्यापर्यंत त्यांची ब्रिटनमध्ये असलेली भवानी तलवार आणि वाघ नखं भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

****

परभणी इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ प्रवेश प्रक्रियेला मान्यता मिळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत असून, या शैक्षणिक वर्षात निश्चितपणे प्रवेश होतील, असं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार मोरे यांनी सांगितलं आहे. ते काल परभणी इथं बोलत होते. या सर्व प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने महाविद्यालयाच्या सोयी सुविधांबाबत काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या असून, या त्रुटीबाबत शासन स्तरावरून लवकरात लवकर पूर्तता करण्यात येईल, अशी माहितीही मोरे यांनी दिली.

****

बी.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी काल प्रवेश परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत तारखा आणि परीक्षा केंद्राबाबत संभ्रम झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी याबाबत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांना निवेदन पाठवलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात सर्व शाळांमधून भारत माझा देश आहे, हा प्रतिज्ञा प्रबोधन उपक्रम राबवण्यासाठी, सर्व शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. लक्ष्यवेध फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातल्या सर्व मुख्याध्यापकांसाठी, नांदेड इथं एक दिवसीय प्रबोधन कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आपला देश बहुआयामी देश असून, प्रतिज्ञा हे महाकाव्य आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांना समजून सांगून हे अभियान गतिमान करावं, असं अवाहनही राऊत यांनी केलं.

****

लातूर जिल्ह्यात विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमाचं आयोजन करायचं असून, त्या दृष्टीने सर्व विभागाने तयारी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केली आहे. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. यासाठी तालुकापातळीपर्यंत नियोजन केलं जाणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं विद्यार्थीचं लैंगिक शोषण केलेल्या प्राध्यापकाला निलंबित केलं आहे. नाट्यशास्त्र विभागाचा सहाय्यक प्राध्यापक अशोक बंडगर याच्याविरुद्ध पिडीत विद्यार्थीनीने गुन्हा नोंदवल्यानंतर विद्यापीठानं ही कारवाई केली. बंडगर याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत.

****

मराठवाडा आणि विदर्भात काल सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली.

जालना तालुक्यात काही भागात काल दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. माळशेंद्रा गावात झालेल्या गारपीटीमुळे कांदा बियाणे, उन्हाळी बाजरी, आंबा फळबागांचं नुकसान झालं.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तसंच पैठण तालुक्यात अनेक गावात काल गारपिटीसह अवकाळी पाऊस झाल्याचं वृत्त आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातही संध्याकाळच्या सुमारास वादळी वारे आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. सोयगाव इथं काल दुपारी जोरदार वादळी वार्याने पोलिस ठाण्याच्या इमारतीवर झाड कोसळलं. तिथं कार्यरत कर्मचारी प्रसंगावधान राखून बाहेर आल्यानं मोठी हानी टळली.

परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या धनगर टाकळी इथं वीज पडून विठ्ठल कोकरे या शेतकर्याचा मृत्यू झाला. जिंतूर तालुक्यातल्या काही भागातही गारपीट झाली. मानवत तालुक्यात कोल्हा, मानवत रोड, रुढी, आटोळा परिसरात जोरदार पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यात कनेरगाव नाका आणि परिसरात काल गारांचा पाऊस झाला.

नांदेड शहर आणि परिसरात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या तलवाडा आणि पंचक्रोशीतल्या गावांमध्ये सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पाऊस झाला.

बुलडाणा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अनेक ठिकाणची झाडं उन्मळून पडली असून घरांवरील छपरं उडाली आहेत. खामगाव तालुक्यात दिवठाणा, रोहणा, काळेगाव या भागांमध्ये गारपीट होऊन वादळी वारा झाला असून, शेतातल्या कांदा, आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

वाशिम जिल्ह्यात मानोरा, मंगरुळपिर, रीसोड, वाशिम तालुक्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले, तर वणोजा इथल्या शाळेचा इमारतीची पडझड झाली.

****

लातूर जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वतर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास दुपारी १२ ते ४ या कालावधीत उन्हात जाणं टाळावं, या दरम्यान अंग मेहनतीची कामं करू नयेत, असं आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केलं आहे. संभाव्य उष्णतेच्या लाटेबाबत विविध शासकीय विभागांच्या कार्यवाहीचा आढावा त्यांनी घेतला, यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातली आरोग्य सेवा, विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उष्माघात विरोधी औषधांसह सर्व सज्जता ठेवावी, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल बंगळुरु इथं झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर २१ धावांनी विजय मिळवला. कोलकातानं प्रथम फलंदाजी करत दिलेल्या २०१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरुचा संघ निर्धारित षटकात १७९ धावाच करु शकला.

****

प्रधानमंत्री शहरी आवास योजना तसंच गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ -म्हाडाच्या वतीने मराठवाड्यातल्या घरांसाठी आज संगणकीय सोडत होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यांसाठी, ८४९ सदनिका आणि ८७ भूखंडांच्या विक्रीसाठी ही सोडत असेल.

****

No comments: