Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० एप्रिल २०२३ सायंकाळी
६.१०
****
·
मन की बात हा, मी पासून आम्हीपर्यंतचा प्रवास-शंभराव्या भागात
पंतप्रधानांचं प्रतिपादन.
·
मन की बातच्या शंभराव्या भागाचं ठिकठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमातून
श्रवण.
·
भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या सहा तर दहा जणांची
सुखरुप सुटका.
आणि
·
उद्या महाराष्ट्रदिनी, राज्यभरात आपला दवाखाना तसंच, शहरी आरोग्यवर्धिनी
केंद्रांचं उद्घाटन.
****
मन की बात हा, मी पासून आम्हीपर्यंतचा प्रवास असल्याचं, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवरच्या, मन की बात, या कार्यक्रम मालिकेच्या
शंभराव्या भागातून, देशवासियांना संबोधित करत होते. मन की बातने आपल्याला सर्वसामान्य
नागरिकांशी संपर्काचा एक मार्ग दिला, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. मन की बातच्या,
आतापर्यंतच्या भागात संवाद साधलेल्या काही नागरिकांशी, पंतप्रधानांनी या भागातही संवाद
साधत, सेल्फी विथ डॉटर, स्वच्छ भारत अभियान, हर घर तिरंगा, आदी विषयांवर चर्चा केली.
नागरिकांनी या कार्यक्रमात सुचवलेले अनेक विषय, लोकचळवळ झाल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष
वेधलं. मन की बातने शंभर भागांचा टप्पा गाठणं, हे श्रेय केवळ नागरिकांचं असल्याचं पंतप्रधान
म्हणाले. युनेस्को चे महासंचालक औद्रे ऑजुले, यांनी मन की बातच्या शंभराव्या भागासाठी
पाठवलेला, शुभेच्छा संदेशही यावेळी ऐकवण्यात आला.
मन की बातच्या प्रत्येक भागाचं ध्ननिमुद्रण करणारे, प्रादेशिक
भाषांमध्ये अनुवाद करणारे, तसंच प्रत्येक भागाचं प्रक्षेपण करणाऱ्या, प्रसारभारतीच्या
अधिकारी तसंच कर्मचारी वर्गाचं, पंतप्रधानांनी कौतुक केलं.
****
देशभरात ठिकठिकाणी सार्वजनिक स्वरुपात, लोकांनी मोठ्या संख्येनं
मन की बातचा, आजचा शंभरावा भाग ऐकला. मुंबईत विलेपार्ले इथं केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री
अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मन की
बातचा शंभरावा भाग ऐकला.
स्वामी विवेकानंद यांनी, अमेरिकेत शिकागो इथल्या, विश्वधर्म
संमेलनातल्या भाषणातून, जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता; त्याचप्रमाणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, असे गौरवोद्गार,
राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. मुंबईत राजभवनात झालेल्या, मन की बात सार्वजनिक श्रवण
कार्यक्रमात, राज्यपाल बोलत होते. या कार्यक्रमात हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव
पवार, ‘डिक्की’चे संस्थापक मिलिंद कांबळे, राज्यातले पद्म पुरस्कार विजेते, ‘मन की
बात’ कार्यक्रमांमध्ये, पंतप्रधानांनी उल्लेख केलेले राज्यभरातील युवक, विद्यार्थी
तसंच नागरिक हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.
भाजपचे विधान परिषदेचे गटनेते, आमदार प्रवीण दरेकर यांनी मुंबईत
कांदिवली इथे, घरकाम करणाऱ्या महिलांसोबत, पंतप्रधानांचे विचार ऐकले.
मुंबई सेंट्रल स्थानकावर, राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात
लोढा यांनी, हमाल बांधवांसोबत, मन की बात कार्यक्रमाचं प्रसारण ऎकलं.
छत्रपती संभाजीनगर इथं, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, तीनशे
एक्कावन्न ठिकाणी, हा शंभरावा भाग सार्वजनिकरित्या ऐकण्यात आला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री,
डॉ भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर, यावेळी उपस्थित होते. सहकारमंत्री अतुल सावे
यांनी, पूर्वांचल वसतीगृह इथं हा शंभरावा भाग ऐकला. गरवारे कम्युनिटी सेंटर इथं, अनेक
नागरिकांनी, मन की बातचा शंभरावा भाग सामुहिकपणे ऐकला.
जालना शहरात, गोपीकिशननगर आणि मुक्तेश्वरद्वार सभागृहात, मन
की बात कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या कार्यक्रमास, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री
रावसाहेब दानवे, उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान, मनमोकळेपणाने आपल्याशी संवाद साधतात,
ही भावना या कार्यक्रमाच्या माध्यमातून, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याचं,
दानवे म्हणाले. या निमित्ताने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतल्या विजेत्यांना, दानवे
यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं. चित्रकार अरविंद देशपांडे यांच्या, बेटी
बचाओ, शिक्षण, पर्यावरण आदी विषयांवर भरवण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनालाही दानवे यांनी
भेट दिली.
धाराशिव इथे, आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी, आकाशवाणी केंद्रात
उपस्थित राहून मन की बातचा शंभरावा भाग ऐकला.
अंबाजोगाई इथं, खोलेश्वर माध्यमिक शाळेत, आमदार नमिता मुंदडा,
भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या उपस्थितीत, मन की बातचा शंभरावा भाग ऐकण्यात
आला.
****
केंद्रीय
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हरियाणात कर्नाल इथल्या शासकीय विश्राम
गृहावर मन की बातचा शंभरावा भाग ऐकला. हा उपक्रम देशवासीयांना प्रेरणा देणारा असल्याचं
मत आठवले यांनी व्यक्त केलं.
****
दरम्यान, मन की बातचे १०० भाग प्रसारित झाल्याबद्दल, मायक्रोसॉफ्टचे
सहसंस्थापक बिल गेट्स यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. मन की
बात कार्यक्रमात स्वच्छता, आरोग्य, महिलांचं आर्थिक सक्षमीकरण, यासारख्या सातत्यानं
विकास लक्ष्यांशी निगडीत मुद्यांवर, कार्य करण्यासाठी, समाजाला प्रेरणा मिळाल्याचं,
गेट्स यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
बांग्लादेश, श्रीलंका, संयुक्त अरब अमीरात, आदी देशांमध्येही,
मन की बातचा शंभरावा भाग, सामुहिकरित्या ऐकण्यात आला.
****
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त, आज सर्वत्र
त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी, ट्विट संदेशाच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांना अभिवादन केलं. पर्यटन
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी, मंत्रालयात, तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार
अर्पण करून, आदरांजली वाहिली.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत
यांनी, तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला, पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं
****
राज्यातल्या विविध कारागृहातून, कोविड काळात पॅरोल सुटीवर सोडलेले,
४०६ कैदी फरार झाले आहेत. कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, चार हजार दोनशे कैद्यांना,
आपत्कालीन पॅरोलवर, तुरुंगातून सोडण्यात आलं होतं. मात्र यापैकी ४०६ कैदी, कोविड प्रादुर्भाव
ओसरल्यावरही, तुरुंगात परतलेले नाहीत. यापैकी साडे तीनशे कैद्यांविरोधात, गुन्हे नोंदवण्यात
आले असून, त्यांचा कसून शोध घेतला जात असल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या, आता सहा झाली असून,
दहा जणांची सुखरुप सुटका केल्याची माहिती, पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली. या
दुर्घटनेस जबाबदार असलेल्या, तसंच प्रथमदर्शनी हलगर्जीजणा करणाऱ्या, इंद्रपाल पाटील
या बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याचंही, पोलिसांनी
सांगितलं. दरम्यान, घटनास्थळी अद्यापही ढिगारा उपसण्याचं काम, आणि बचावकार्य सुरु असल्याची
माहिती, जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
****
पंजाबमध्ये लुधियाना जवळ, एका टँकरमधून अमोनिया वायूची गळती
होऊन, अकरा नागरिकांचा मृत्यू झाला, तर सुमारे २०० हून अधिक लोकांची प्रकृती बिघडली
आहे. हा टँकर एका उड्डाणपुलावर धडकल्यानंतर, ही वायूगळती सुरू झाली. या भागात बचावकार्य
सुरू असून, रुग्णांवर लुधियानातल्या रुग्णालयांमध्ये, उपचार करण्यात येत आहेत.
****
राज्यात उद्या एक मे रोजी, महाराष्ट्रदिनी, मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांच्या हस्ते, ऑनलाईन पद्धतीने आपला दवाखाना तसंच, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचं
उद्घाटन होणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या, पाच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब
ठाकरे आपला दवाखाना, तसंच १२ आरोग्यवर्धिनी केंद्रांचा समावेश आहे.
****
हैद्राबाद मुक्तीसंग्रामात, बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचं स्मरण
करून, नव्या पिढीला मुक्तीसंग्रामाच्या लढ्याची माहिती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र
प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने, उद्या १ मे रोजी मराठवाड्यात, विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. उद्या सर्व जिल्ह्यात ध्वजारोहणानंतर, प्रभात फेरी काढून, मुक्तीसंग्राम
लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांना, अभिवादन करण्यात येणार आहे.
****
महाविकास आघाडीच्या वतीने उद्या १ मे रोजी मुंबईत वज्रमूठ सभा
होणार आहे. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बीकेसी मैदानाबर सायंकाळी साडेपाच
वाजता ही सभा होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या पुढाकाराने महाविकास
आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवासैनिक ह्या नियोजनात सहभागी झाल्याचं
या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे
त्यांचे तातडीने पंचनामे करून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश
महाजन यांनी धुळे जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत
झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका असल्याचं, महाजन यांनी म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment