Monday, 19 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.05.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 May 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ मे २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाण्यांची माहिती देण्यासाठी येत्या २९ मे पासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरु होणार

·      श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन

·      भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आशियाई क्रिकेट परिषदेच्या दोन स्पर्धांमधून बाहेर पडण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा निर्णय

आणि

·      मराठवाड्यात काही भागात आजही अवकाळी पावसाची हजेरी, जालना जिल्ह्यात अंगावर वीज पडून दोघांचा मृत्यू

****

शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाण्यांची माहिती देण्यासाठी येत्या २९ मे पासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरु होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशातल्या ७२३ जिल्ह्यांमधे ही मोहीम राबवण्यात येणार असून, सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे. सुमारे ६५ हजार गावात जाऊन वैज्ञानिकांचं पथक शेतकऱ्यांना यासंदर्भात प्रात्यक्षिकं आणि प्रशिक्षण देईल. जिल्हा पातळीवर या पथकाच्या दररोज तीन बैठका होतील, असं त्यांनी सांगितलं

बाईट – केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

****

श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचं उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मात्र कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश त्यांनी दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी आज बीड जिल्हा दौऱ्यावर परळी वैजनाथ ज्योर्तिंलिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. या विकास आराखड्यात २८६ कोटी ६८ लाख रूपयांच्या ९२ विकास कामांना मान्यता दिल्याचं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यावेळी सांगितलं.

परळी औष्णिक विद्युत केंद्राअंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा तसंच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या आवश्यक सोयीसुविधांचाही पवार यांनी आढावा घेतला.

****

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. ते आज नाशिक जिल्ह्याच्या खरीप हंगाम पूर्व बैठकीत बोलत होते. खत विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा कोकाटे यांनी दिला. तसंच खरीप पीकासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज द्यावं, असं आवाहन केलं.

****

सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि पारदर्शी करण्याच्या दृष्टीने राज्याच्या आरोग्य धोरणाबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आज मुंबईत यासंदर्भातल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा शासन सेवेत समावेश करणं, तसंच त्यांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव लवकर सादर करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई इथं वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन करण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचा सराव करण्यासाठी नोंदणी आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची संधी मिळेल. २० मे रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे सराव अर्ज उपलब्ध असतील. प्रवेशासाठी अंतिम अर्ज २१ मे ते २८ मे या कालावधीत भरता येतील. विद्यार्थी कमीतकमी एक आणि जास्तीतजास्त १० महाविद्यालयांच्या नावाचा पसंतीक्रम देऊ शकतात. तात्पुरती गुणवत्ता यादी ३० मे रोजी प्रसिद्ध केली जाईल. काही आक्षेप असल्यास विद्यार्थी एक जून पर्यंत तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार दाखल करू शकतात. अंतिम गुणवत्ता यादी तीन जून रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती संचालनालयानं दिली आहे.

****

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या संघांचा सहभाग असलेल्या दोन महत्त्वाच्या स्पर्धांमधून बाहेर पडायचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयनं घेतला आहे. श्रीलंकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या विमेन्स इमर्जिंग टीम्स एशिया कप आणि सप्टेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या पुरुषांच्या आशिया चषक स्पर्धेत भारत आता खेळणार नाही. या दोन्ही स्पर्धांचं आयोजन करणाऱ्या आशियाई क्रिकेट परिषदेचं नेतृत्व सध्या पाकिस्तानचे अंतर्गत विषयांचे मंत्री मोहसीन नक्वी यांच्याकडे आहे.

****

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ राज्यात ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत. धुळे शहरात एक हजार १११ फुट लांबीच्या तिरंगा ध्वजासह ही यांत्रा काढण्यात आली. शहरातल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ या यात्रेचा समारोप झाला. यावेळी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरातही आमदार काशिराम पवार यांच्या नेतृत्त्वाखाली, तिरंगा रॅली काढण्यात आली.

रायगड जिल्ह्यात पनवेल इथं काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत नागरिक मोठ्या संख्येनं हभागी झाले होते.

****

छत्रपती संभाजीनगर इथले पर्यटन व्यावसायिक जसवंतसिंह यांनी, ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगाने बोलतांना, दहशतवादाविरोधातल्या या कारवाईत पाकिस्तानच्या बाजूने उभ्या असलेल्या तुर्कीए आणि अजहरबैजान च्या बहिष्काराचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले

बाईट – जसवंतसिंह, पर्यटन व्यावसायिक

****

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज देगलूर तालुक्यातल्या तमलूर इथले हुतात्मा सचिन वनजे यांच्या कुटूंबियाची सात्वंनपर भेट घेतली. यावेळी शासनातर्फे योग्य ती मदत करण्याचं तसंच घरकुल योजनेतून पक्कं घर देण्याचं आश्वासन सावे यांनी दिलं. यावेळी त्यांनी त्यांचा एक महिन्याचा पगाराचा धनादेश वनजे यांच्या कुटूंबियांना सुर्पूद केला.

****

विधानपरिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कायार्लयात स्वयम पुनर्विकास कर्ज योजनेबाबत आढावा बैठक घेतली. या योजनेद्वारे जुन्या गृहनिर्माण सहकारी सोसायटीचा पुनर्विकास करण्यासाठी सभासदांना सहकारी बँकांमार्फत नाममात्र व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे सभासदांना स्वतःच सोसायटीचा पुनर्विकास करणं शक्य होणार असल्याचं दरेकर यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

****

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पंचसूत्री कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. याबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. बालकामगार निर्मूलन, बालभिक्षेकरी प्रतिबंध आणि शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण तसंच बालकांची आरोग्य तपासणी यासारखे उपक्रम घेऊन हा कार्यक्रम राबवावा, अशा सूचना स्वामी यांनी दिल्या.

****

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी तीन जून रोजी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत याप्रकरणातल्या तीन आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्जासह आपापल्या मागण्यांचे इतर अर्ज सादर केले.

****

जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज मेघगर्जनेसह पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातल्या पिंपळगाव रेणुकाई इथं अंगावर वीज पडून शेतात काम करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी आजही पाऊस झाला. वैजापूर तालुक्यात लोणी खुर्द परिसरातल्या नायगव्हाण इथं जोरदार वादळी वाऱ्यामुळे लिंबाचं झाड पडून गाय दगावल्याचं वृत्त आहे.

****

धुळे-सोलापूर महामार्गावर जालना जिल्ह्यातल्या सौंदलगाव शिवारात कारच्या धडकेत पायी जात असलेल्या माय - लेकीचा मृत्यू झाला. आज सकाळी हा अपघात झाला. रोहिणी चव्हाण आणि नुरवी चव्हाण अशी मृतांची नावं आहेत. छत्रपती संभाजीनगर इथले कारचालक अमरदीप चव्हाण हे बीडकडे जात असताना त्यांचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचं पोलीसांनी सांगितलं. यात कार चालकासह कुटुंबातले अन्य चार जण जखमी झाले असून, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

****

परभणी शहरात पाथरी रोड परिसरातल्या कॅफेमध्ये अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या २१ तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेनं आज ताब्यात घेतलं. याप्रकरणी पोलिसांनी कॅफे मालकाला ताब्यात घेऊन, एक लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या तरूणांवर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

No comments: