Tuesday, 27 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.05.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 May 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      नवीन भारत जनता आणि सार्वभौमत्वाविरुद्धच्या धोक्याला चोख प्रत्युत्तर देईल, असा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून संदेश - अमित शहा यांचं प्रतिपादन; वॉटरग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यात पुढील पाच वर्षात प्रत्येक गावाला पाणी मिळणार असल्याची ग्वाही

·      राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

·      मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, प्रशासन अलर्ट मोडवर

आणि

·      पुढील दोन दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नुकसानीचे घटनास्थळी जाऊन पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

****

नवीन भारत आपल्या जनतेला आणि सार्वभौमत्वाविरुद्धच्या कोणत्याही धोक्याला चोख प्रत्युत्तर देईल, असा संदेश ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगभरात पोहोचला असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नांदेड इथं काल शंखनाद या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी शहा यांनी, मोदी सरकारच्या दहशतवाद आणि नक्षलवादाविरोधातील अढळ भूमिकेचा पुनरुच्चार केला.

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या पाच वर्षात पाणी पोहोचेल, असंही शहा यावेळी म्हणाले. दुष्काळग्रस्त मराठवाडा प्रदेशात पाणीटंचाई दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामाचं त्यांनी कौतुक केलं. कोकण आणि कृष्णा खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यासाठी वळवण्याचं नियोजन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे, मंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना, ऑपरेशन सिंदूरबद्दल केंद्र सरकार तसंच भारतीय संरक्षण दलांचे आभार मानले. मराठवाड्याच्या विकासासाठीही महायुती सरकार मोठ्या प्रमाणावर कामं करत आहे, मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी एक लाख कोटी रुपये खर्चून नदीजोड प्रकल्प सुरू असल्याचं ते म्हणाले.

तत्पूर्वी शहा यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं.

दरम्यान, अमित शहा आज मुंबईला जाणार असून, माधवबाग लक्ष्मीनारायण मंदिराच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी ते होणार आहेत.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलै २०२५ मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २४ जून ते १६ जुलै तर दहावीची परीक्षा २४ जून ते ८ जुलै या कालावधीत होणार आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर परीक्षेचं वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला कालपासून सुरूवात झाली. प्रवेशासाठी अंतिम अर्ज तीन जून पर्यंत भरता येणार असून, अंतिम गुणवत्ता यादी आठ जून रोजी प्रसिद्ध होईल.

****

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या ११२ शिक्षणक्रमांच्या परीक्षांना आजपासून सुरूवात होत आहे. राज्यभराल्या ५८० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, चार लाख २५ हजार २०८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यात १२१ जेष्ठ नागरिक आणि राज्यातल्या विविध तुरुंगातील तीन हजार १६ कैद्यांचा समावेश आहे.

****

आषाढी वारीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणाऱ्या दिंडी सोहळ्यातल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी चोख व्यवस्था ठेवण्याची सूचना, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आषाढी वारी नियोजन बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यातून जाणाऱ्या २६० दिंड्यांच्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी प्रशासनातल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून, ‌प्रत्येक दिंडीत पुरेशी औषधं उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची ग्वाही विखे - पाटील यांनी यावेळी दिली.

****

राज्यात नैऋत्य मोसमी पावसानं १०७ वर्षांचा विक्रम मोडत वेळेआधीच प्रवेश केला आहे. मुंबई, ठाणे तसंच नवी मुंबईत काल मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. याबाबतचा हा वृत्तांत,

मुंबईत सखल भागांत, तसंच रेल्वेरुळांवर पाणी भरलं होतं, विमानांची उड्डाणंही उशिरानं सुरू होती. शहरातल्या ९६ धोकादायक इमारतींमधल्या तीन हजारापेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. मुंबईत परवा मध्यरात्रीपासून काल संध्याकाळपर्यंत १३५ पूर्णांक चार मिलिमीटर पाऊस झाला.

पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, या भागात काल अतिवृष्टीची नोंद झाली. दौंडमध्ये ११७ मिलिमीटर, बारामतीत १०४ पूर्णांक ७५, इंदापुरात ६३ पूर्णांक २५ मिलिमीटर इतका पाऊस झाला.

सोलापूरमध्ये ६७ पूर्णांक ७५ मिलिमीटर पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात सहा नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं.

रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या पावसाच्या स्थितीचा आढावा घेत, संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या. ज्या ठिकाणी नुकसान झालं. तिथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

मुंबई आणि परिसरात पावसामुळे बाधित झालेल्यांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पाण्याचा निचरा झाला असून वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

बारामतीमध्ये गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल निंबोडी, शेटफळगढे, मदनवाडी आणि भिगवण इथल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.   

मराठवाड्यातही अनेक भागात काल पावसाने हजेरी लावली. 

छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात काल हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. जिल्ह्यातल्या गंगापूर, फुलंब्री, बिडकीन परिसरात जोरदार पाऊस पडला.

धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले वाहत आहेत.

लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातल्या गोताळा या गावात वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली, तसंच योग्य ती मदत देण्याचं आश्वासन दिलं.

परभणी जिल्ह्यात काल सर्वत्र पाऊस झाला. कातनेश्वर शिवारात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील तसंच शेतातल्या झाडांचं नुकसान झालं. झिरो फाटा - पूर्णा मार्गावर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याने काही काळ हा मार्ग बंद होता.

****

राज्यात येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. आज परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपले शेतमाल आणि पशुधन सुरक्षित स्थळी ठेवण्याचं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी रधुनाथ गावडे यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तसंच अन्य मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीची यंत्रणेने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. यासंदर्भात त्यांनी काल सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांशी दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात ९८ गावं बाधित झाली, पाच जणांचा मृत्यू झाला, तर ६६ जनावरं दगावली. जिल्ह्यात एकूण एक हजार २४६ शेतकऱ्यांच्या ६१६ पूर्णांक तीन हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

बीड जिल्ह्यातल्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आर टी देशमुख यांचं काल अपघाती निधन झालं. अंबाजोगाई - लातूर महामार्गांवर बेळकुंड नजिक हा अपघात झाला. एका मोठ्या आजारातून बाहेर पडल्यानंतर देशमुख पुन्हा राजकारणात सक्रिय झाले होते. त्यांच्या निधनाबद्दल जिल्हाभरातून शोक व्यक्त होत आहे. 

****

जालना शहरातल्या मोती तलावात काल दोन भावांचा बुडून मृत्यू झाला. जुनेद आसेफ सय्यद आणि अयान आसेफ सय्यद अशी मृतांची नावं आहेत. पोहण्यासाठी तलावात उतरल्यानंतर खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाल्याचे स्थानिकांनी सांगितलं. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

****

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ८०व्या जयंतीनिमित्त काल लातूर शहरात बाभळगाव इथं त्यांना आदरांजली वाहण्यात आली. शहरातल्या विलासबाग इथं देशमुख कुटुंबियांसह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी पुष्प अर्पण करून विलासराव देशमुख यांना अभिवादन केलं.

****

No comments: