Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 24 May 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मे २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या
अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार - मुख्यमंत्र्यांची माहिती; अवकाळी पावसामुळे
झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई देण्याचं आश्वासन
·
मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग
आणि शिवडी - न्हावाशेवा अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना संपूर्ण टोलमाफी देण्याचा
शासन निर्णय जारी
·
राज्यात शेताच्या बांधावरचे पारंपरिक अरुंद शेतरस्ते जवळपास
१२ फूट रुंद करण्याचा निर्णय
·
१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महसूली
विभागांचे निकाल जाहीर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या चार कार्यालयांना पुरस्कार
आणि
·
राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम, नांदेड तसंच
लातूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट
****
राज्यात
आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली
जाणार आहे, त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने ४० हजार पोलीसांची भरती केली
असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या
वतीने बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचं उद्घाटन आणि निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजन
कार्यक्रमात ते काल बोलत होते. यापुढेही राज्यात
पोलीस भरतीला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलीस गृहनिर्माण महामंडळातर्फे
राज्यातले पोलीस कार्यालय आणि पोलीसांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करुन दिला असल्याचं
सांगून मुख्यमंत्र्यांनी, राज्यात गेल्या दहा वर्षात सातत्याने
पोलीस गृह निर्माणाचं काम केल्याचं सांगितलं.
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
दरम्यान, काल कोल्हापूर
जिल्ह्यात इचलकरंजी इथं देखील ७१३ कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचं उद्घाटन,
शुभारंभ आणि लोकार्पणासह शहापूर पोलीस ठाण्याच्या कोनशिलेचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते करण्यात आलं.
तत्पूर्वी, कोल्हापूर
इथं वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, राज्यात अवकाळी पावसामुळे
झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात येईल, असं सांगितलं. पुण्यातल्या वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलीस योग्य ती कारवाई करतील,
असंही त्यांनी आश्वस्त केलं.
****
मुंबई
- पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि शिवडी - न्हावाशेवा अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक
वाहनांना संपूर्ण टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचं इलेक्ट्रिक वाहन
धोरण गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आलं होतं, त्यासंदर्भातला
शासन आदेश काल जारी करण्यात आला. राज्यातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित
असलेल्या उर्वरित राज्य मार्गांवर टोल माफी देण्याचा निर्णय मुख्य सविचांच्या अध्यक्षतेखालील
सुकाणू समितीकडून घेण्यात येईल, असंही या आदेशात म्हटलं आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादन आणि वापराला चालना देऊन, पर्यावरणीय
शाश्वतता वाढवणं, हा या धोरणाचा उद्देश आहे. यासोबतच इलेक्ट्रिक
वाहनांच्या खरेदीवर प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.
****
महाराष्ट्रात
शेताच्या बांधावरचे पारंपरिक अरुंद शेतरस्ते आता तीन ते चार मीटर, म्हणजे जवळपास
१२ फूट रुंद करण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. याबाबतचा शासन आदेश जारी केला
असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. शेतरस्त्यांच्या जागांमध्ये
अतिक्रमण होऊ नये, तसंच भविष्यात खरेदी विक्रीच्यावेळी अन्य शेतीविषयक
वाद उद्भवू नयेत म्हणून या शेतरस्त्याची नोंद जमिनीच्या ७/१२मध्ये केली जाणार असल्याचं
बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
बाईट
- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
****
गडचिरोली
जिल्ह्यात भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातल्या जंगलात पोलिसांशी
झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. यामध्ये भामरागड दलमचा कमांडर सन्नू पुंगाटी
याचा समावेश असून, त्याच्यावर आठ लाख रुपयांचं बक्षिस होतं. मारलेल्या नक्षलवाद्यांमध्ये
एका महिलेचा समावेश असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी वार्ताहर परिषदेत
दिली. यावेळी पोलिसांनी एक स्वयंचलित रायफल, एक ३०३ रायफल,
वॉकीटॉकी आणि अन्य साहित्य जप्त केलं. मागील चार वर्षांत पोलिसांनी ८७
नक्षल्यांना ठार केलं, १२४ जणांना अटक करण्यात आली, तर ६३ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याचंही निलोत्पल यांनी सांगितलं.
****
१०० दिवसांच्या
कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महसूली विभागांमधल्या ४० विभागस्तरीय कार्यालयांच्या
आणि सर्व जिल्ह्यांमधल्या ४२ जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल मुख्यमंत्री
फडणवीस यांनी काल जाहीर केला. माहिती उपसंचालक कार्यालय आणि प्रादेशिक दुग्धव्यवसाय
विकास अधिकारी कार्यालय श्रेणीत छत्रपती संभाजीनगर कार्यालयानं प्रथम क्रमांक पटकावला
आहे. तर, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण विभागात छत्रपती
संभाजीनगरला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. याशिवाय अप्पर राज्यकर आयुक्त, राज्य वस्तू आणि सेवा कर कार्यालय तसंच विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय वर्गवारीत
छत्रपती संभाजीनगरचा द्वितीय क्रमांक आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात लातूर कार्यालयाला
द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
****
ऑपरेशन
सिंदूरच्या समर्थनात धाराशिव शहरात काल तिरंगा रॅली काढण्यात आली. नागरिक, महिला,
विद्यार्थी आणि माजी सैनिक या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
काळा मारुती चौकात मारुतीच्या आरतीने ही रॅली सुरु झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रगीताने या रॅलीची सांगता झाली. यावेळी
सहभागी झालेले भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी म्हणाले,
बाईट
- दत्ता कुलकर्णी
परभणी इथल्या
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातही काल अधिकारी कर्मचार्यांनी तिरंगा रॅली काढून
भारतीय संरक्षण दलांचं अभिनंदन केलं.
****
अण्णासाहेब
पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातल्या सहा हजार ६० लाभार्थ्यांना
४९९ कोटी रुपयांची कर्ज बँकांनी वितरित केले असून, पाच हजार ३५९ लाभार्थींना
महामंडळाकडून ५२ कोटींचा व्याज परतावा करण्यात आला. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील
यांनी काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठवाड्यात महामंडळाचं काम
वाढवण्यासाठी बीड इथं उपकेंद्र सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
****
जालना शहरात
अंबड चौफुली परिसरात उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या
स्मारकाची, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी काल पाहणी केली. या स्मारकामुळे
जालना शहर पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखलं जाईल, या
स्मारकासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल, अशी ग्वाही
त्यांनी दिली.
****
राज्यभरात
अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. छत्रपती संभाजीनगर इथं रात्री पावसाच्या रिमझीम सरी पडत
होत्या, पहाटेनंतरही पाऊस सुरुच होता. नांदेड जिल्ह्यात काल दुपारी मध्यम
स्वरूपाच्या पाऊस झाल्याचं आमच्य वार्ताहरानं कळवलं आहे. जालना शहरासह जिल्यात बहुतांश
भागात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. हिंगोली जिल्ह्यातही काल संध्याकाळ नंतर
अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, येत्या दोन
दिवसांत केरळमध्ये मान्सून सक्रीय होण्यास अनुकुल परिस्थिती असल्याचं भारतीय हवामानशास्त्र
विभागातर्फे सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आज मराठवाड्यासह,
विदर्भ-कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने नांदेड
आणि लातूर जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी
खबरदारी बाळगावी, असं आवाहन नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश
वडदकर यांनी केलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यात अनधिकृत खत विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मौजे शिवनी इथं एक व्यक्ती विनापरवाना गावोगावी जाऊन सेंद्रिय आणि इतर खते विक्री करत
असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानंतर कृषी विभागाच्या भरारी
पथकाने सापळा रचून सदर व्यक्तीस अटक केली. या कारवाईत एकूण १४ लाख ६४ हजार किंमतीचा
मुद्देमाल जप्त झाला.
****
पोलंडमधल्या
चोरझो इथं झालेल्या जानूझ कुसोसिन्स्की मेमोरियल २०२५ भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज
चोप्रानं रौप्य पदक जिंकलं. नीरजने सहाव्या आणि अंतिम प्रयत्नात ८४ पूर्णांक १४ मीटर
अंतरावर भाला फेकला. जर्मनीच्या जूलियन बेवर यानं ८६ मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्ण
पदक पटकावलं. येत्या २४ जून रोजी झेक प्रजासत्ताक मध्ये होणार्या ओस्ट्रावा गोल्डन
स्पाईक स्पर्धेत नीरज सहभागी होत आहे.
****
No comments:
Post a Comment