Tuesday, 28 September 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.09.2021 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 September 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ सप्टेंबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-१९ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      जोरदार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती; मराठवाड्यात औरंगाबादसह सर्वच जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक मार्गांवरची वाहतुक ठप्प.

·      शारदीय नवरात्रोत्सवात तुळजापूर इथं दररोज ६० हजार भाविकांना दर्शनाची परवानगी.

आणि

·      नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरसह १४ राज्यांच्या विधानसभेच्या ३० जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर.

****

जोरदार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात औरंगाबादसह जवळपास सर्वच जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात आज ढगफुटीसदृष्य पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश लहान मोठे सगळेच जल प्रकल्प ओसांडून वाहत आहेत. शहरानजीक असलेला हर्सूल तलाव पूर्ण क्षमतेनं भरला असून औरंगाबाद शहरातली खाम नदी दुथडी भरून वाहत आहे. औरंगाबाद महानगपालिका मुख्यालय परिसरात जोरदार वाऱ्यांमुळे झाडं उन्मळून पडल्यानं, महापालिकेच्या संरक्षक भिंतीचं नुकसान झालं आहे.

कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी आणि वैजापूर तालुक्यातल्या नारंगी सारंगी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पैठण इथला जायकवाडी धरणाच्या नाथसागरातला पाणी साठा सुमारे ८७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

लासूर परिसरात शिवना नदीला पूर आल्यानं मुंबई महामार्गवर असलेला पूल पाण्याखाली गेला आहे. फुलंब्री तालुक्यात पावसानं थैमान घातलं असुन बाबरा गावातील अनेक दुकानं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. वाहून गेलेली दुकानं जेसीबी मशीनच्या साहाय्यानं नदीपात्रातून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. औरंगाबाद नजिक चिकलठाणा इथं रेल्वेमार्गावर आलेलं पाणी दूर करण्यात आलं असून, याचा रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं, रेल्वे स्थानक व्यवस्थापकांनी कळवलं आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सद्यस्थितीत येलदरी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. येलदरी धरण आणि धरणा समोरील नदी पात्राच्या ५०० मीटर परिसरात कलम १४४ नुसार मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी आंचल गोयल यांनी जारी केले आहेत

****

हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीनं रौद्ररूप धारण केलं असून परिसरातील सर्व शेती पुराच्या  पाण्याखाली गेली आहे. कळमनुरी तालुक्यात उमरा ते बोल्डा मार्गावरील कयाधू नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून या भागातील शेतातली पिकं खरडून गेली आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात वाकडी इथं १७ नागरिक पुराच्या वेढ्यात अडकले होते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल - एनडीआरएफला सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर या सर्वांची सुरक्षित सुटका करण्यात यश आलं. उस्मानाबाद जिल्ह्याच्या पूरस्थितीबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –

 

सौदाना - आंभा इथं आठ लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातही दौऊदपूर इथं एका कुटुंबातील सहा नागरिक अद्यापही पुराच्या पाण्यात अडकले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं आहे. तेर इथं तेरणा नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या चार नागरिकांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. इरला इथं दिडशे नागरिकांचं स्थलांतर जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आलं असून रामवाडी इथं सव्वाशे लोकांना ग्रामपंचायतच्या सभागृहात हलवण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे.देविदास पाठक आकाशवाणी औरंगाबाद  

****

नांदेड शहरातील सखल भागात पाणीच पाणी साचलं असून अनेक घरात पाणी शिरलं आहे. नांदेड शहर आणि सिडको भागाला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं, या वाहतुक बंद करण्यात आली आहे. अर्धापूर तालुक्यातील लोणार नदीला आलेल्या पुरामूळे शेकडो हेक्टर शेतजमिनीवरचं पिक वाहून गेलं आहे. जिल्ह्यात केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालं आहे.

 नांदेड शहरात लातूर फाटा रस्त्यावर पाणी साचल्यानं अनेक दुकानांचं नुकसान झालं. अर्धापूर तालुक्यात उमा नदीला पूर आला असून कापणीला आलेलं सोयाबीनचं पिक पाण्याखाली गेलं तर शेलगाव, बामणी या गावांचा संपर्क तुटला आहे.

डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे एकूण १२ दरवाजे आज उघडण्यात आले असून एक लाख ६५ हजार ६९३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात येत आहे.

****

जालना जिल्ह्यात १२ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. नदी - नाल्यांना पूर आल्यानं अनेक भागांमधली पिकं पाण्याखाली गेली आहेत. सकाळी शहरातल्या एका भागात घराची भिंत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तालुक्यात पूरजळ इथल्या आरोग्य उपकेंद्रातही पाणी शिरलं. जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना नदीला मोठा पूर आला आहे. तर भोकरदन तालुक्यातील केळना, अंबड तालुक्यातील दुधना, गल्हाटी या नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झालं असून, घरांची पडझड झाली आहे.

****

बीड जिल्ह्यात आवरगावचा पूल वाहून गेल्यानं धारूर - आडस रस्ता बंद झाला आहे. परळी ते बीड रस्त्यावर पांगरी नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यानं, पाचशे वाहनं अडकली आहेत. मांडवा पुलावरुनही पाणी वाहत असल्यामुळे औरंगाबादकडे येणारा रस्ता बंद झाला आहे.

'केज विधानसभा मतदारसंघातल्या गावांमध्ये शंभर टक्के नुकसान झालं असून, शेतीमध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे. हे नुकसान टक्केवारी मध्ये मोजता येणार नसल्यानं, पंचनामे न करता अगदी सरसकट शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे सीना नदीला पूर आला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी घरांची पडझड झाली, तर अनेक ठिकाणी रस्तेही वाहून गेले आहेत. पशुधनाचंही मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड पुसद रस्त्यावर दहेगाव नाल्यावरुन वाहणाऱ्या पाण्यात नागपूर आगाराची एसटी बस आज सकाळी वाहून गेली. बसमधल्या दोघांना वाचवण्यात आलं असून, तिघांचे मृतदेह सापडले आहेत, तर एक जण अद्याप बेपत्ता आहे.

****

गुलाब चक्रीवादामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढचे ४८ तास राज्यात राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे येत्या २४ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं औरंगाबाद, जालना, या जिल्ह्यांना रेड अॅलर्ट, तर बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड, जिल्ह्यांसाठी ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे.

****

तुळजापुरातील शारदीय नवरात्र महोत्सव साधेपणानं साजरा होणार आहे. नवरात्राच्या काळात दररोज ६० हजार भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार असून, कोजागरी पौर्णिमेदरम्यान तीन दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. ज्या भाविकांनी कोरोना लसीच्या दोन मात्रा पूर्ण केल्या आहेत, त्यांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे.

****

केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभेचे ३ मतदार संघ आणि नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरसह १४ राज्यातल्या विधानसभेच्या ३० जागांसाठी आज पोटनिवडणूक जाहीर केली. ८ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असून १३ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. ३० ऑक्टोबरला याठिकाणी मतदान होईल. देगलुरचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक घेतली जात आहे.

//***************//

 

 

 

No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 14 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 14 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...