आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ जुलै २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
देशात काल दिवसभरात ४३ लाख ६० हजार जणांना कोरोना विषाणू प्रतिबंधक लस
देण्यात आली. आतापर्यंत ३४ कोटीहून अधिक नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसी देण्यात
आल्या असल्याचं आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
गडकिल्ले जतन आणि संवर्धन योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यात
राज्यातल्या ६ किल्ल्यांचं संवर्धन केलं जाणार आहे. शिवनेरी, राजगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग,
सुधागड आणि तोरणा या सहा किल्ल्यांचं सर्वांगीण संवर्धन हाती घेण्यास शासनानं मान्यता
देण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत
निर्गमीत करण्यात आला. किल्ले संवर्धन आणि जतनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या
अध्यक्षतेखाली सुकाणू समितीचं गठण करण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे समितीचे
उपाध्यक्ष असून समितीमध्ये एकूण २४ सदस्यांचा समावेश आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातले कळसूबाई, हरिश्चंद्र, रतनवाडी, रतनगड या पर्यटन स्थळांच्या
परिसरात उद्या आणि परवा पर्यटक तसंच गिर्यारोहकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
बंदीचे नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कारवाई केली जाईल अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक गणेश
रणदिवे यांनी दिली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली
आहे.
****
आषाढी एकादशीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचं आज दुपारी
चार वाजता आळंदीहून पारंपरिक पद्धतीनं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यंदा सलग दुसऱ्या
वर्षी कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळं मोजक्याच वारकऱ्यांना या सोहोळ्यासाठी प्रत्यक्ष
अलंकापुरीत जाता येणार आहे.
****
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली जवळ बोरघाटात काल संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात एका बालकाचा समावेश आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनरने समोरच्या कारला पाठीमागून धडक दिली, त्यामुळे कार समोरच्या ट्रकवर जाऊन आदळली. त्यानंतर कारने पेट घेतला आणि तिघांचा यात अंत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment