Tuesday, 30 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  30 August  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० ऑगस्ट २०२२    सायंकाळी ६.१०

****

·      मुंबई मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी पूर्ण; सहा महिन्यात चाचण्या वेगानं पूर्ण करण्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास.

·      ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत एसटी प्रवास योजनेच्या अंमलबजावणीला सुरवात.

·      उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाची सगळीकडे जय्यत तयारी;बाजारपेठा फुलल्या.

आणि

·      जांबसमर्थ इथल्या मूर्ती चोरी प्रकरणी तपासातल्या दिरंगाईविरोधात ग्रामस्थांचं आंदोलन.

****

मुंबईत कुलाबा-वांद्रे-सिप्झ कॉरिडोर मेट्रो ३ या प्रकल्पाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पहिली चाचणी घेण्यात आली. राज्य सरकार सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या कामांना प्राधान्य देत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. येत्या सहा महिन्यात या मार्गावरच्या चाचण्या वेगानं पूर्ण करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चाचणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हा प्रकल्प म्हणजे मुंबईतल्या वाहतुक कोंडीवरचा रामबाण उपाय आहे. आता या प्रकल्पात कोणतंही विघ्न येणार नाही असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्याच्या विकासकामात कोणीही अडथळे आणू नयेत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

****

मागास भागांत रोजगार निर्मिती होण्यासाठी उद्योग वाढीकरिता आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. इंडोरामा कंपनीच्या शिष्टमंडळाने आज  मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. इंडोरामा कंपनी मार्फत राज्यात नव्याने साडेचार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या माध्यमातून सुमारे चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. इंडोरामा कंपनीचा सध्या नागपूर इथं वस्त्रोद्योग असून सुमारे दोन लाख कोटी रुपयांची उलाढाल आहे. आता नंदुरबार जिल्ह्यात नवापूर इथं वस्त्रोद्योगाशी निगडीत व्यवसायात नवी गुंतवणूक प्रस्तावित आहे. आगामी तीन ते चार वर्षांत टप्प्या-टप्प्याने ही गुंतवणूक केली जाणार आहे.

****

मद्यविक्रीच्या दुकानांना अनुकूल अबकारी धोरण बनवल्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली राज्य सरकारवर टीका केली आहे. याबाबत अण्णांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक पत्र लिहिलं आहे. ज्यावेळी आपण आमच्या आंदोलनाशी निगडीत होतात, त्यावेळी आपली भूमिका दारुच्या व्यसनाविरोधात होती, असं हजारे यांनी या पत्रात म्हटलं आहे. याबाबत अण्णांनी या शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली –

 

त्याने दारुबंदीची जी पॉलिसी केलीय, ती पॉलिसी अत्यंत चुकीची आहे. म्हणजे प्रत्येक वॉर्डमध्ये दारुचं दुकान उघडायचं. आणि दारू पिण्याऱ्यांना २५ वर्ष वय होतं, दारू पिण्याऱ्यांचं ते २१ वरती आणलं. म्हणजे तुम्ही दारुला प्रोत्साहन देताय. अरे ती बरबाद होतील ना. म्हणून मला ते फील झालं. आणि पहिल्यांदा मी अरविंदच्या विरोधात अशा प्रकारची नोट काढली.

****

एसटी महामंडळाकडून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे. ही सवलत फक्त महाराष्ट्राच्या सीमेपुरतीच आहे. पात्र नागरिकांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र, राज्य परिवहन महामंडळाद्वारे देण्यात येणारी स्मार्ट कार्ड, डीजी लॉकर, मोबाईल-आधारकार्ड यापैकी कोणतंही ओळखपत्रं दाखवून या सेवेचा लाभ घेता येणार आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन एसटी महामंडळाने केलं आहे.

****

उद्यापासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणरायाचे स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करू या. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानाची तमा न बाळगता प्रयत्न करू या, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव जोरदार साजरा करताना सामाजिक दायित्वाचं पालन करावं, पर्यावरणाची हानी होऊ नये याची काळजी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे.

दरम्यान, कोविड काळातल्या दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा गणेशोत्सव धामधुमीने साजरा करण्याचा उत्साह राज्यभरात दिसून येत आहे. कोविड प्रसाराला बऱ्यापैकी आळा बसल्यानं उत्सवावर गेली दोन वर्षं घातलेले निर्बंध राज्य सरकारने यंदा हटवले आहेत. अनेक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मोठ्या गणेशमूर्ती मंडपात आणल्या असून उद्या विधीवत त्यांची प्रतिस्थापना करण्यात येईल. गणेशमूर्ती, आकर्षक मखरं, पूजा, रोषणाई तसंच सजावटीचं सामान, इत्यादी साहित्याने बाजारपेठा फुलल्या आहेत.

घरगुती तसंच सार्वजनिक गणपतीच्या पूजा साहित्यासह इतर खरेदीसाठी गणेश भक्तांच्या गर्दीनं बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. गणपतीपाठोपाठ येणाऱ्या महालक्ष्मी अर्थात गौरीपूजनाची तयारी करण्यासाठी महिलावर्गाची बाजारपेठांमधून गर्दी होत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद इथं पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज शहरातल्या विसर्जन विहीरींची पाहणी केली.

पैठण इथं गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागच्या वतीनं आज पथ संचलन करण्यात आलं.

****

समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव असलेल्या जालना जिल्ह्यातल्या जांबसमर्थ इथल्या राम मंदिरातल्या पंचधातूच्या एैतिहासिक मूर्ती चोरी प्रकरणाचा दहा दिवस उलटूनही तपास लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आज मुख्य रस्त्यावर दोन तास ठिय्या आंदोलन केलं. समर्थ रामदासांचे अकरावे वंशज भूषण महारूद्र स्वामी यांनीही आंदोलनात सहभाग घेत, सातशे वर्षांपूर्वी समर्थ स्वत: पूजा करत असलेल्या राम, लक्ष्मण, सीता, हनुमंतांच्या मूर्तींची चोरी करणाऱ्यांचा पोलिसांनी तातडीनं शोध घेण्याची मागणी केली. यावेळी पोलीस अधीक्षकांनी आंदोलकांशी संवाद साधून मूर्ती चोरांना लवकरच पकडले जाईल, असं सांगितलं.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून ८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१२ कोटी २६ लाखांच्या वर गेली आहे. त्यात १५ कोटी ५५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लस मात्रा घेतली आहे. आज ६ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची मात्रा घेतली.

राज्यात आज सकाळपासून १९ हजार नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ५८ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८२ लाख ४३ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.

****

कीटकजन्य आजाराबाबत अद्यापही मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचं मत, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केलं आहे. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात लिम्फेटीक फायलेरीया अर्थात हत्तीपाय रोग कार्यशाळेत स्वामी बोलत होते. कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग रुग्णशोध मोहीम, रुग्णांची यादी तयार करणे, हत्तीरोगाबाबत जनजागृती करणं यावर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. प्रशिक्षण, तपासणी आणि जनजागृती या त्रिसूत्रीवर या कार्यशाळेत भर देण्यात आला. सोलापूर जिल्हा हत्तीरोग निर्मुलनाच्या टप्प्यावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

औरंगाबादच्या महिला कला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा साहित्यिक डॉ.रामकिशन दहिफळे यांना पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा माधुरी वैद्य पुरस्कृत श्रीवत्स प्रकाशन पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘परिवर्तनवादी साहित्य संकल्पना आणि स्वरुप’ या ग्रंथासाठी डॉ.दहिफळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे इथं एस.एम.जोशी सोशलिस्ट फांडेशन सभागृहात १२ सप्टेंबरला हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

****

No comments: