Saturday, 26 November 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.11.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  26 November    2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ नोव्हेंबर २०२२    सायंकाळी ६.१०

****

·      संविधान दिन आज देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा; सर्वोच्च न्यायालयात ‘संविधान दिन’ कार्यक्रमाचा राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप.

·      २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना सर्वत्र अभिवादन.

·      ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन.

आणि

·      गोवर संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज.

****

‘संविधान दिन’ आज देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात विशेष कार्यक्रमाचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत समारोप झाला. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या मुलभूत अधिकारांवर काम करण्याची गरज राष्ट्रपतींनी व्यक्त केली. न्यायपालिकेत महिलांचा सहभाग वाढवण्याच्या आवश्यकेतवरही राष्ट्रपतींनी भर दिला.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीही उपस्थितांना संबोधित केलं. भारत हा अशा देशांपैकी एक आहे, ज्याचं संविधान त्याच देशाच्या नागरिकांनी लिहिलं, असल्याचं सरन्यायाधीशांनी सांगितलं. केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी यावेळी केलेल्या भाषणात सर्वोच्च न्यायालयात ७० हजार तर उच्च न्यायालयांमध्ये ७० लाख प्रकरणं प्रलंबित असल्याकडे लक्ष वेधलं.

 

दरम्यान, आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. संविधानाच्या प्रस्तावनेतली ‘आम्ही लोक’ ही संकल्पना, वचनबद्धता, प्रतिज्ञा आणि विश्वास आहे, त्यामुळेच भारत हा लोकशाहीची जननी झाल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. राज्यघटना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तरुणांनी चर्चा आणि वादविवादांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. ई - न्यायालय प्रकल्पातल्या विविध उपक्रमांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झालं.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित होईल. आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेचा हा ९५वा भाग आहे.

****

मराठवाड्यात संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ इथल्या संत जर्नादन स्वामी महाराज आश्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं संविधान पूजन करण्यात आलं. औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आज पक्ष कार्यालयात संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. औरंगाबाद महानगरपालिकेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं.

जालना इथं समाजकल्याण विभागाच्या वतीनं शहरातून संविधान फेरी काढण्यात आली

परभणी शहरात राजगोपालचारी उद्यानातून संविधान फेरी काढण्यात आली. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामुहिक वाचन करण्यात आलं. हिंगोली इथंही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं.

नांदेड इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे महात्मा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत संविधान फेरी काढण्यात आली. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभाग नोंदवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आज १४ वा स्मृतिदिन. दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीरजवान, पोलीस अधिकारी, आणि मृत्युमुखी पडलेल्या सामान्य नागरिकांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे.

आपलं कर्तव्य बजावताना पराक्रमाची शर्थ करणाऱ्या आणि सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सुरक्षा रक्षकांना आज संपूर्ण राष्ट्र आदरांजली वाहत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६/११ हल्ल्यातल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली.

****

औरंगाबाद इथं काँग्रेस जिल्हा अध्यक्ष डॉ.कल्याण काळे आणि कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीनं २६/११ ला मुंबईत झालेल्या भ्याड आतंकवादी हल्यात मृत्युमुखी पडलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. हुतात्मा सैनिकांच्या स्मरणार्थ वाळूज पोलिस ठाण्यात रक्तदान शिबीर घेण्यात आलं. पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी यावेळी रक्तदान केलं.

****

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलडाणा इथं जाहीर सभा घेतली. भाजप हा आयात पक्ष असल्याची टीका ठाकरे यांनी यावेळी केली. राज्यपालांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचाही निषेध करत ठाकरे यांनी राज्यपालांना परत पाठवण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. मुख्यमंत्री आणि राज्यमंत्रिमंडळातल्या सदस्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरही ठाकरे यांनी टीका केली. २६/११ च्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हुतात्म्यांना यावेळी अभिवादन करण्यात आलं.

****

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं आज पुण्यात निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्यानंतर काल त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली होती, मात्र अंतर्गत अवयव निकामी झाल्यानं, त्यांचा मृत्यू झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

 

दुर्गाबाई कामत, कमला गोखले, चंद्रकांत गोखले असा पणजी, आजी आणि वडलांकडून आलेला अभिनयाचा वारसा पुढे नेणारे विक्रम गोखले यांनी कथा या मराठी नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. देखणे अभिनेते अशी ओळख असलेल्या विक्रम गोखले यांनी सुमारे पाच दशकांच्या कारकिर्दीत रंगभूमी, हिंदी-मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या.

 

कमला, बॅरिस्टर, नकळत सारे घडले, संकेत मिलनाचा, सरगम, आदी मराठी नाटकं, बाळा गाऊ कशी अंगाई, महानंदा, ज्योतिबाचा नवस, वजीर, कळत नकळत, दे दणादण, माहेरची साडी, नटसम्राट आदी मराठी तर थोडासा रुमानी हो जाये, खुदा गवाह, अकेला, अग्निपथ, हम दिल दे चुके सनम, हे राम, भुलभुलैय्या आदी हिंदी चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या. दूरदर्शनवरील उडान, अकबर बिरबल, जीवनसाथी, सिंहासन, या सुखांनो या, अग्निहोत्र आदी मालिकांमधून साकारलेल्या विविध भूमिकाही प्रेक्षकांचा स्मरणात आहेत. गोखले यांना २०१३ साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. विष्णुदास भावे जीवनगौरव पुरस्कार, बलराज साहनी पुरस्कार, पुलोत्सव सन्मान तसंच चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कारानेही गोखले यांना गौरवण्यात आलं होतं.

 

विक्रम गोखले यांच्या निधनानं अभिनय क्षेत्रासह समाजाच्या सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. गोखले यांनी अभिनयाचे मापदंड निर्माण केल्याचं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली, वैविध्यपूर्ण भूमिका करणारे गोखले यांच्या निधनानं कलाक्षेत्राची मोठी हानी झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे, तर गोखले यांच्या निधनानं अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं, या शब्दांत फडणवीस यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. औरंगाबाद इथले ज्येष्ठ सिने पत्रकार अशोक उजळंबकर यांनी गोखले यांना श्रद्धांजली अर्पण करताना, रंगभूमी, चित्रपट, दूरचित्रवाणी असा तिहेरी प्रवास आपल्या अभिनयाच्या बळावर यशस्वी करणारा अभिनयसम्राट पुन्हा होणे नाही, असं म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात गोवरचा संसर्ग सुरू असून शहरात महानगरपालिकेने या संसर्गाला तोंड देण्याची पूर्ण तयारी केली आहे. कोविड काळात लसीकरणात दुर्लक्षित राहिलेला भाग आणि जास्त संसर्ग होण्याची शक्यता असलेल्या भागात आरोग्य विभागातर्फे अतिरिक्त २० लसीकरण सत्रांचं नियोजन करण्यात आलं आहे. तसंच शहरातील मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये गोवर रुग्णांच्या उपचारासाठी विशेष विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांनी दिली आहे.

****

विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आज सोलापूर इथं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शाई फेकण्यात आली. मराठवाडा आणि विदर्भ या स्वतंत्र राज्यांच्या मागणीसाठी सदावर्ते हे पत्रकार परिषद घेत असताना ही घटना घडली. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

****

No comments: