Friday, 25 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.11.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 25 November 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २५ नोव्हेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जागतिक बँकेला आवाहन

·      राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरणाचे राज्याला सात पुरस्कार

·      शिवाजी महाराज अवमानकारक वक्तव्यप्रकरणी राज्यपालांना पदमुक्त करण्याच्या मोहिमेत सर्व पक्षीयांना सामील होण्याचं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं आवाहन

·      राज्यपालांच्या वक्तव्याची राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दखल घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मागणी

·      राज्याची एक इंचही भूमी कोणाला दिली जाणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·      उस्मानाबाद जिल्ह्यात खरीप २०२२ च्या पिक विम्यापोटी २४१ कोटी रुपयांचं शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात वाटप केलं जाणार

·      ५५ व्या राष्ट्रीय खो - खो स्पर्धेत महिलांमध्ये महाराष्ट्राच्या, तर पुरुषांमध्ये भारतीय रेल्वे संघाला विजेतेपद

आणि

·      न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याला ऑकलंडमध्ये सुरुवात, भारताची प्रथम फलंदाजी

सविस्तर बातम्या

मराठवाडा आणि विदर्भ भागातल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, कृषी प्रकल्पांसोबतच दुष्काळग्रस्त भागात पुराचं पाणी वळवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनानं तयार केला असून, त्यासाठी जागतिक बँकेनं अर्थसहाय्य करावं, असं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. जागतिक बँकेचे भारतातले प्रमुख ऑगस्ते तानो कौमे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या जवळपास पाच हजार गावांना फायदा होत आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेचं सहाय्य लाभलं असून प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वीतेनंतर दुसऱ्या टप्प्याला मान्यता देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

****

राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरणासाठीचे सात पुरस्कार राज्यानं पटकावले आहेत. ‘सुगम्य भारत अभियानची अंमलबजावणी करणारं सर्वश्रेष्ठ राज्य हा पुरस्कार दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांना घोषित झाला आहे. सन २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांचे हे पुरस्कार असून, केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय अंतर्गत, दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीनं यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवले होते. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांच्या हस्ते येत्या तीन डिसेंबरला नवी दिल्लीत या पुरस्कारांचं वितरण होणार आहे, अशी माहिती दिव्यांग आयुक्तालयानं प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वारंवार महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा अपमान करत असून, ते राज्याच्या अस्मितेबरोबर खेळत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुंबईत काल ते वार्ताहरांशी बोलत होते. राज्यपालांना महाराष्ट्रातून पदमुक्त करण्याची मोहीम आता शिवसेनेने सुरू केली असून, त्यांनी या मोहिमेत सर्व पक्षीयांना सामील होण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले –

 

 

 

Byte …

जर या राज्यपालांना हटवलं गेलं नाही तर या महाराष्ट्र द्रोह्यांचा विरोध तमाम महाराष्ट्र प्रेमींनी एकत्र येऊन केला पाहिजे. आणि मी तमाम महाराष्ट्र प्रेमींना आवाहन करतोय, आवाहन म्हणजे विनंती करतो आहे, म्हणून आत्ताच वेळ आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन एक खणखणीत आणि दणदणीत इंगा या महाराष्ट्र द्रोह्यांना हा दाखवलाच पाहिजे. मग मी पक्ष वगैरे बाजुला ठेवून सगळ्यांना आवाहन करतोय, अगदी भारतीय जनता पक्षातले महाराष्ट्रप्रेमी लोकं जरी सोबत आले तर त्यांना सुद्धा मी आमंत्रण देतोय. कारण पक्षीय राजकारणात जर आपली अस्मिता आणि राज्य चिरडलं जाणार असेल, तर आपण मात्र छत्रपतींच नाव घ्यायला नालायक आहोत.

शिंदे सरकार आल्यापासून राज्याची अवहेलना झाल्याची टीकाही ठाकरे यांनी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याचा निषेध देखील त्यांनर यावेळी केला.

****

शिवरायांचा अवमान करायचे धाडस काही लोक करत आहेत, स्वराज्य नसतं, तर आपण आज गुलामगिरीत असतो, असे सांगत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी, आता यापुढे कोणी अवमानकारक भाष्य केल्यास ठेचून काढण्याचा इशाराही दिला आहे. यासंदर्भात पुढची भूमिका येत्या २८ नोव्हेंबर रोजी जाहीर करणार असल्याचंही खासदार भोसले यांनी यावेळी स्पष्ट केलं. वयानं ज्येष्ठ असलेल्या राज्यपाल कोश्यारी यांच्या अवमानकारक वक्तव्याचा सर्वसामान्य माणसाला राग आला आहे असे सांगत खासदार भोसले म्हणाले...

 

Byte …

महाराष्ट्राच्या राजकारणात वयानं जर ज्येष्ठ कोणी असेल तर पवार साहेब आहेत. पवार साहेब त्या व्यासपीठावर होते. नितीन गडकरीही होते. त्या व्यासपीठावर आणि ही सगळी म्हणजे ज्येष्ठ लोकं आहेत. ज्यावेळेस असं जेंव्हा वक्तव्य होतं, निदान त्याचा कुठेतरी त्यांच्या भाषणात त्यांनी उल्लेख करायला हवा होता. का केला नाही?

****

राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीनं शिवाजी महाराजांबाबत केलेलं वक्तव्य योग्य नसल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल पत्रकारांशी ते बोलत होते. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी याची दखल घ्यायला हवी, असंही ते म्हणाले. आतापर्यंत राज्यपालांनी विविध वक्तव्ये केली होती, एक मर्यादा म्हणून त्यावर आपण कोणतेही भाष्य केलं नव्हतं. आता, मात्र राज्यपालांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या असल्याचं ते म्हणाले. सीमावादाच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाला आपली जबाबदारी टाळता येणार नसल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.

****

कर्नाटक - महाराष्ट्र सीमा प्रश्नासाठी आम्ही सर्व पुराव्यांसह सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत, न्यायालय यावर योग्य निर्णय घेईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल अक्कलकोट आणि सोलापूर कर्नाटकात विलीन करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीला विरोध करताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना राज्याची एक इंचही भूमी कोणाला दिली जाणार नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले

Byte …

आपली मागणी घेऊन आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. सगळे पुरावे आपण सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय घेईल, याची आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणीही मोठा नाही, कर्नाटकचे मुख्यमंत्रीही सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत, किंवा इतर कोणीही नाही. त्यामुळे त्यांनी काहीही दावा ठोकला तरी देखील महाराष्ट्रातलं एकही गाव जाणार नाही आणि आमचा सीमाभाग आम्हाला परत मिळेल ही मला अपेक्षा आहे.

****

महाराष्ट्र- कर्नाटक राज्य सीमा प्रकरणात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करणं गरजेचं असल्याचं मत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात काल त्या बोलत होत्या. दोन्ही राज्यांच्या सीमा प्रश्नावर गेली अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. बेळगाव, भालकी, बिदर सारख्या मराठी भाषिक जिल्ह्यातल्या जनतेची महाराष्ट्रात सहभागी होण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. यासाठी अनेकांनी आपले बलिदानही दिलं असल्याचं त्या म्हणाल्या.

****

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर येत्या ३० नोव्हेंबरला न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यावर कालची तारीख दिली होती, मात्र काल आदेश तयार नसल्यानं न्यायालयानं आता ३० नोव्हेंबर ही तारिख दिली आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात खरीप २०२२ च्या पिक विम्यापोटी २४१ कोटी रुपयांचं शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात वाटप केलं जाणार असल्याचं, तुळजापुरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं. अतिवृष्टी, सततचा पाऊस, गोगलगाय आणि एलोमोझॅक च्या प्रादुर्भावानं, जिल्ह्यात सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झाल्यानं उत्पादनात मोठी घट झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या सूचना विमा कंपनीला दिल्या होत्या, आणि ज्यांची पंचनाम्यासह इतर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, अशा पहिल्या टप्प्यातल्या शेतकऱ्यांना पुढील दोन दिवसात हे पैसे मिळणार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं.

****

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आपलं जलसमाधी आंदोलन स्थगित केलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली, यात आमच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, त्यामुळे हे आंदोलन थांबवल्याचं तुपकर यांनी सांगितलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा इथं शंभर खाटांच्या स्त्री रूग्णालयास राज्य सरकारने विशेष बाब म्हणून मंजुरी दिली असल्याचं, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितलं. परंडा इथं महाआरोग्य शिबिराच्या पूर्वसंध्येला काल मतदार संघातल्या जनतेशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. ही मंजूरी देताना या रूग्णालयासाठी लागणाऱ्या मनुष्यबळास देखील नियमानुसार मान्यता देण्यात असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

गोवर रोगाची लक्षणं आढळल्यास घाबरुन न जाता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधवा आणि काळजी घ्यावी, असं आवाहन औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे. गोवर झालेल्या रुग्णास लागोपाठ दोन दिवस ‘अ जीवनसत्वाची मात्रा दिल्यास आजाराची तीव्रता कमी होण्यास मदत होत असल्याचं ते म्हणाले.

****

जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्तानं उस्मानाबाद तालुक्यातल्या तेर इथं महाराष्ट्र शासनाचा पुरातत्त्व विभाग आणि उस्मानाबाद जिल्हा पर्यटन जनजागृती संस्था संचलित पर्यटन विकास समिती यांच्या वतीनं काल हेरिटेज वॉक घेण्यात आला. यामध्ये तेर इथलं बौद्ध स्तूप, त्रिविक्रम मंदिर, रामलिंग आप्पा लामतुरे वस्तूसंग्रहालयातली विविध शिल्पे, पाण्यावर तरंगणारी वीट यासह, पुरातत्त्व खात्याने केलेलं उत्खनन, याबद्दल माहिती देण्यात आली. हा ऐतिहासिक पुरातत्त्व वारसा जतन करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.

****

उस्मानाबादमध्ये झालेल्या ५५ व्या राष्ट्रीय खो - खो स्पर्धेत महिलांमध्ये महाराष्ट्राच्या संघानं, तर पुरुषांमध्ये भारतीय रेल्वे संघानं विजेतेपद पटकावलं.

यजमान महाराष्ट्राच्या महिला खो-खो संघानं काल अजिंक्यपद कायम राखत अंतिम फेरीत भारतीय विमान प्राधिकरणाच्या संघावर ११-९ असा विजय मिळवला. तर पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारतीय रेल्वेनं यजमान महाराष्ट्र संघाचा १४ - १२ असा पराभव करत विजय मिळवला.

अपेक्षा सुतार राणी लक्ष्मीबाई पुरस्काराची, तर अक्षय गणपुले एकलव्य पुरस्कारचा मानकरी ठरला. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेतर्फे पुरस्कारप्राप्त पुरुष आणि महिला खेळाडुंना प्रत्येकी पाच हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं.

****

कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल पोर्तुगालनं घानाचा तीन - दोन असा, तर ब्राझिलनं सर्बियाचा दोन - शून्य असा पराभव केला. अन्य सामन्यात स्वित्झर्लंडनं कॅमेरुनवर एक - शून्य असा विजय मिळवला, तर उरुग्वे आणि दक्षिण कोरिया यांच्यातला सामना एकही गोल न झाल्यामुळे अनिर्णित राहीला.

****

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिल्या सामन्याला काही वेळापूर्वी ऑकलंडमध्ये सुरुवात झाली. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

****

गायरानधारक आणि वनजमीन धारकांवरील हल्ले थांबवा, आजपर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित करा या मागणीसाठी लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या पैठण गेट पासून हा मोर्चा निघाला होता. संसदेवर हिंस्त्र सिंहाची मुद्रा बसवण्यात आली असून ती हटवण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

****

लातूर - नांदेड महामार्गावर लातूर तालुक्यातल्या भातखेडा गावाजवळ डिझेल टँकर आणि उसाच्या ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात सात वाहनं जळून खाक झाली. परवा मध्यरात्री हा अपघात झाला. यात टँकरच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल दोन वेगवेगळ्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.

औरंगाबाद- वाळूज औद्योगिक वसाहतीत काल सकाळी ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. कंपनीत कामासाठी चालेलल्या दुचाकीस्वार तिघा भावंडांना ट्रकनं धडक दिल्यानं ट्रकच्या चाकाखाली तिघे चिरडले गेल्याचं, वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सांगितलं. दीपक, अनिता आणि निकिता लोखंडे अशी त्यांची नावं असून, ते कमळापूर इथले रहीवाशी होते.

वैजापूर तालुक्यातल्या नेवरगाव इथं ट्रक आणि मोटरसायकलमध्ये झालेल्या अन्य एका अपघातात एकाचा मृत्यू झाला. किरण आल्हाट असं मयताचं नाव असून, तो महालगावचा रहीवाशी आहे .

****

नांदेड जिल्ह्यातल्या माहूर शहरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर धाड टाकून नऊ तंबाखू विक्रेत्यांविरुद्ध काल कारवाई करण्यात आली. या कारवाईत सदरील विक्रेत्यांकडून चार हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर आणि नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

****

मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मंजूर करण्यात यावं, अशी मागणी जालना आणि बीड जिल्ह्यातल्या गोदावरी नदीकाठच्या ५६ गावांमधल्या मराठा समाज बांधवांनी केली आहे. या संदर्भात काल शेकडो मराठा बांधवांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलं. येत्या दोन आठवड्यांमध्ये मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असं या निवेदनात म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं उद्घाटन प्रख्यात लेखक विश्वास पाटील यांच्या हस्ते आज होणार आहे. तीन दिवसीय या समारोहात कवी संमेलन, बाल आनंद मेळावा, शास्त्रीय गायन, जुगलबंदी, यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार वितरण, आदी कार्यक्रम होणार आहेत.

****

औरंगाबाद इथल्या उस्मानपुरा पोलिस ठाण्याचा हवालदार प्रकाश सोनवणे याला पाच हजार रुपये लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आलं. खाजगी वित्त सहाय कंपनीचे कर्जाचे हप्ते थकवल्यानं तक्रारदाराला मारहाण करुन ओढून नेलेल्या दुचाकीवाहनासंदर्भात तक्रार अर्जावर कारवाई करुन दुचाकी परत मिळवून देण्यासाठी, प्रकाश सोनवणे यानं ही लाच घेतली होती.

****

No comments: