आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०१ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गात उपप्रवर्ग पाडता येऊ शकतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठानं आज हा निर्णय दिला.
****
हिमाचल प्रदेश मधल्या मंडी जिल्ह्यात राजवान गावात ढगफुटी होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर ३६ जण बेपत्ता आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून मदत आणि बचावकार्य सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, केरळमधे वायनाड जिल्ह्यात काल दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या २५०च्या वर गेली आहे, तर १९१ लोक बेपत्ता आहेत. बचावकार्य आजही सुरू आहे.
****
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उज्ज्वला योजनेनं दहा कोटी ३३ लाखांच्या पुढचा टप्पा पार केला आहे. उज्ज्वला योजनेची ही आकडेवारी सरकारच्या गरीब कल्याणाची कटीबद्धता दर्शवणारी आहे, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे.
****
थोर स्वातंत्र्यसेनानी, लेखक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शतकोत्तर चौथ्या पुण्यतिथी निमित्त आणि मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवनात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
राज्यातल्या साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळानं एक हजार ९०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्यातल्या १३ सहकारी साखर कारखान्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्यातले सुमारे सोळाशे कोटी महामंडळानं काल राज्य सरकारला हस्तांतरित केले.
****
धुरंधर क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक तसंच निवडकर्ते अंशुमन गायकवाड यांचं दीर्घ आजारानं वडोदरा इथं निधन झालं. त्यांनी १९७५ ते १९८७ या काळात चाळीस कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गायकवाड यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. एक प्रतिभावान खेळाडू आणि उत्कृष्ट प्रशिक्षक असलेल्या अंशुमन गायकवाड यांचं क्रिकेटमधलं योगदान कायम स्मरणात राहील, असं पंतप्रधानांनी शोक संदेशात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment