Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27 August
2024
Time: 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं
आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पॅनिक बटन्स बसवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय
· बदलापूर बाललैंगिक अत्याचार घटनेचा प्राथमिक अहवाल
सरकारला सादर
· मालवण-राजकोट इथला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, नौदल आणि राज्य सरकारकडून
चौकशी समिती स्थापना
· परळी वैजनाथ इथं आयोजित कृषी महोत्सवाचा समारोप, तीन कोटी पेक्षा अधिक आर्थिक
उलाढाल झाल्याची विभागाची माहिती
आणि
· जायकवाडी धरणाची पाणीपातळी पोहोचली ५३ टक्क्यांवर
सविस्तर बातम्या
राज्यातल्या
शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पॅनिक बटन्स
बसवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी
काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत या प्रस्तावावर चर्चा झाल्याचं
त्यांनी सांगितलं. नुकत्याच बदलापूरच्या शाळेत झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, शाळांच्या सुरक्षा व्यवस्थेत
सुधारणा करण्याची गरज असून, त्याचाच भाग म्हणून शाळांमधे त्वरित तक्रार पेट्या बसवल्या
जातील आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोरच या पेट्या उघडल्या जातील, असं केसरकर यांनी सांगितलं.
दरम्यान, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर
शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या शिक्षण उपसंचालक, आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष यांच्या
समितीचा प्राथमिक अहवाल काल शासनास सादर झाला आहे. या अहवालातली निरीक्षणं तपास यंत्रणांना
सादर करण्यात येणार असून, शिक्षण विभागाअंतर्गत स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात
येणार असल्याचंही केसरकर यांनी सांगितलं.
****
बदलापूर
अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात
आली आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानं त्याला काल न्यायालयात हजर करण्यात
आलं होतं. यावेळी सुरक्षेच्या कारणावरून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, कल्याण इथं एका अल्पवयीन
मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित आरोपीला कल्याण जिल्हा
सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
बीड
जिल्ह्यातल्या कडा इथं शाळकरी मुलींनी बदलापूर घटनेतल्या चिमुकलीला न्याय द्या या मागणीसाठी
काल निषेध मोर्चा काढला. मोर्चात सहभागी मुली आणि महिलांनी काळे कपडे परिधान केले होते.
****
सिंधुदुर्ग
जिल्ह्यात मालवण-राजकोट इथं उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा काल दुपारी वादळी
वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे कोसळला. या प्रकरणी पुतळ्याचे शिल्पकार, कन्सल्टंट आणि ठेकेदार यांच्यावर
गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी
आणि पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत. पालकमंत्री चव्हाण यांनी सायंकाळी राजकोट इथं
जात घटनास्थळाची पाहणी केली.
दरम्यान, हा पुतळा कोसळल्याप्रकरणी
नौदलानं खंत व्यक्त केली असून, याप्रकरणी राज्य सरकार आणि नौदलाची एक समिती नियुक्त केली
आहे. हा पुतळा पुन्हा एकदा उभारु असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सोसाट्याचा
वारा आणि वादळामुळे हा पुतळा कोसळला. मात्र, लवकरच अधिक भक्कम पुतळा उभारु असं त्यांनी सांगितलं
****
महाराष्ट्र
राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीने आज पुकारण्यात आलेला एकदिवसीय बंद मागे घेण्यात
आला आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
उपस्थितीत झालेल्या बैठकीत, व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत कायदेशीर निर्णय देण्यासाठी
एक उच्च स्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर व्यापारी कृती
समितीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ही माहिती दिली. येत्या महिनाभरात ही समिती आपला
अहवाल सादर करणार आहे.
****
बीड
जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथं कृषी विभागातर्फे आयोजित पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी
महोत्सवाचा काल समारोप झाला. परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ
इंद्रमणी यांच्यासह अनेक मान्यवर या समारोप सोहळ्याला उपस्थित होते. या महोत्सवामध्ये
मागील सहा दिवसात सुमारे साडेचार लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. विविध वस्तूंच्या
४३५ स्टॉल मधून सुमारे तीन कोटी पेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा
कृषी अधीक्षक अधिकारी सुभाष साळवे यांनी दिली.
****
आदिवासी
पाड्यांचं आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
यांनी केलं आहे. काल मुंबईत राजभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या गावांमध्ये
पायाभूत सुविधांसह व्यावसायिक प्रशिक्षण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावं, प्रस्तावित आदिवासी विद्यापीठांमध्ये
अधिकाधिक राखीव जागा द्याव्या, असंही राज्यपालांनी नमूद केलं.
****
नांदेडचे
खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर आज नायगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात
येणार आहेत. चव्हाण यांचं काल हैदराबाद इथं प्रदीर्घ आजाराने निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. नुकत्याच
झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर
यांचा पराभव केला होता. चव्हाण यांच्या निधानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे
अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शोक व्यक्त केला
आहे.
****
राज्यसभेच्या
राज्यातल्या दोन रिक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितिन पाटील आणि भाजपचे धैर्यशील
पाटील यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती, विधीमंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. केंद्रिय
वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणुकीत
विजयी झाल्याने राज्यसभेच्या महाराष्ट्र राज्यासाठीच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या.
****
कर्ज
व्यवहारांसाठी रिझर्व्ह बँकेकडून यूएलआय नावाची नवीन पद्धत सुरू करण्यात येणार आहे.
गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल बंगळुरू इथं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि
इमर्जिंग टेक्नोलॉजीच्या जागतिक परिषदेत ही माहिती दिली. या नव्या पद्धतीमुळे कर्जसंबंधित
व्यवहारही सुलभ होतील, असा विश्वास दास यांनी यावेळी व्यक्त केला. डिजिटल आर्थिक
व्यवहारांमध्ये सुलभता आणणाऱ्या यूपीआय पद्धतीचं त्यांनी कौतुक केलं.
****
मराठा
समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या मागणीचा, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे
अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पुनरूच्चार केला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार
परिषदेत बोलत होते. या जिल्हयात आतापर्यंत नऊ हजार सातशे बहात्तर लाभार्थींना महामंडळाकडून
कर्ज मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
श्रीकृष्ण
जन्माष्टमी काल साजरी झाली. श्रीकृष्ण जन्माष्टमी काल साजरी झाली. द्वारका, मथुरा आणि वृंदावनसह देशभरातल्या
मंदिरांमध्ये मध्यरात्री श्रीकृष्ण जन्म सोहळा
पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला.
छत्रपती
संभाजीनगर इथं पैठण रस्त्यावरच्या महानुभाव आश्रमात तसंच जालना रस्त्यावरच्या आंतरराष्ट्रीय
कृष्ण भावनामृत-इस्कॉन मंदिरासह शहरातल्या विविध श्रीकृष्ण मंदिरांमध्ये जन्माष्टमी
सोहळा पार पडला. शेकडो भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.
दरम्यान, दहीहंडी उत्सव आज साजरा
होत आहे, शहरात
अनेक चौकांमध्ये हंडी बांधण्याची तयारी सुरू झाली असून, गोविंदा पथकंही हंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत.
****
लाडक्या
बहिणीसोबतच सुरक्षित बहीण योजनेची गरज, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य
ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं पक्षाच्या
स्वाभिमान सभेत बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह
शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मुद्यांवरून
आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.
****
बीड
जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या रेवकी देवकी इथल्या सरपंच शशिकला भगवान मस्के यांच्यासह
त्यांच्या कुटुंबियांनी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.
ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या कामाची ९६ लाख रुपयांची देयक प्रशासनाकडून रोखण्यात आली, त्यामुळे मस्के कुटुंबियांनी
हे पाऊल उचलल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मात्र पोलिसांनी वेळीच
हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला. मस्के कुटुंबाला पोलीसांनी सध्या ताब्यात घेतलं आहे.
****
बीड
जिल्ह्यातल्या घाटनांदूर इथल्या वीज उपकेंद्रातील वीज यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या
कामामुळे घाटनांदूर आणि जवळगा उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या काही गावांचा वीजपुरवठा आज
सकाळी अकरा ते दुपारी पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात वीजग्राहकांनी सहकार्य
करावं असं आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलं आहे.
****
धाराशिव
जिल्ह्यात पोलिसांनी सव्वा सहा लाख रुपयाच्या गुटख्यासह सुमारे पावणे नऊ लाखाहून अधिक
रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस पथकानं उमरगा इथं औराद पाटी चौरस्ता भागात ही
कारवाई करत, एका
आरोपीस अटक केली असून, त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या”पात्र लाभार्थींचे अर्ज येत्या ३१
ऑगस्टपर्यंत भरुन घेण्याचे निर्देश समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त व्ही.एस.केंद्रे
यांनी दिले आहेत. काल नांदेड इथं यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अधिकारी
कर्मचारी यांनी पात्र लाभार्थ्यांची वैयक्तीक भेट घेऊन अर्ज भरून घ्यावेत अशा सूचना
त्यांनी यावेळी दिल्या.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी ५३ पूर्णांक ४१ टक्क्यांवर
पोहोचली आहे. धरणात सध्या ७१ हजार ११५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
दरम्यान, गेले दोन दिवस झालेल्या
जोरदार पावसामुळे बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या सांगवी पाटण गावातली सर्व शेती
पाण्याखाली गेल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
येत्या
दोन दिवसात, मध्य
महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान
विभागानं व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment