Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 30 August 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ३० ऑगस्ट २०२४
सायंकाळी ६.१०
****
· महायुती सरकार महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध-वाढवण बंदर भूमिपूजन
सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन
· छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी पंतप्रधानांकडून क्षमायाचना-विरोधकांची
टीका
· देगलूरचे काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा
आणि
· पॅरिस पॅरालम्पिक स्पर्धेत भारताला चार पदकं-नेमबाज अवनी लेखराचा सुवर्णवेध
****
केंद्रातील एनडीए सरकार तसंच राज्यातील महायुती सरकार महाराष्ट्राला
नव्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केलं आहे. पालघर जिल्ह्यात वाढवण इथं ७६ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या
बंदराचं,
पंतप्रधानांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय बंदर-नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री
राजीवरंजन सिंह,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक
मान्यवर उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी सर्वप्रथम, सिंधुदूर्ग जिल्ह्यात राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी
शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत क्षमा मागितली –
सिंधुदुर्ग मे जो हुआ मेरे
लिये, मेरे सभी साथियों के लिये छत्रपती शिवाजी महाराज आराध्य देव है। और मै आज सर
झुका कर के, छत्रपती शिवाजी महाराज की उनके चरणों मे सर रखके माफी मांगता हूं। और इतना
ही नही, जो जो लोग छत्रपती शिवाजी महाराज को अपने आराध्य देव मानते है, उनके दिल को
जो गहरी चोट पहुंची है, मै उनकी भी सर झुका करके क्षमा मांगता हूं।
वाढवण हे आशिया खंडातलं हे सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या
आघाडीच्या १० बंदरामध्ये याची गणना होईल. या बंदरामुळे किमान १२ लाख रोजगाराच्या संधी
निर्माण होतील. देशातील सर्व बंदरातून एकत्रित रीत्या होणाऱ्या कंटेनर वाहतुकीपेक्षा
अधिक कंटेनर वाहतूक या बंदरातून होणं अपेक्षित आहे. रायगड
जिल्ह्यात नव्यानं विकसित होणारं दिघी औद्योगिक क्षेत्र छत्रपती
शिवाजी महाराजांच्या स्वप्नांचं प्रतीक ठरेल, असा
विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात विविध क्षेत्रात महिला करत असलेल्या
नेतृत्वाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. २१८ मत्स्यपालन विकास योजना तसंच विविध विकास
योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारत आज जगभरातला दुसरा
मोठा मत्स्य उत्पादक देश झाल्याचं सांगत पंतप्रधानांनी मच्छीमार बांधवांचं यात मोलाचं
योगदान असल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
साथियों, जब समुद्र
से जुडे अवसरों की बात होती है, तो इसमें सबसे अहम् भागीदार हमारे मछुआरे भाई बहन
है। मच्छिमार बंधु भगिनींना आपल्या पाचशे सव्वीस मच्छिमारांची गावे, कोळीवाडे आणि पंधरा
लाख मच्छिमारांच्या लोकसंख्येसह महाराष्ट्राच्या मत्स्यपालन क्षेत्राचे योगदान खूप
मोठे आहे.
मोदी यांनी स्थानिक मच्छीमारांना ट्रान्सपॉण्डर्सचं वाटप केले.
बोटीवर लावण्याच्या या यंत्रामुळे संपर्क व्यवस्था प्रस्थापित करणं सहज शक्य होणार
आहे. देशातल्या १ लाख बोटीवर इस्रोने विकसित केलेले हे ट्रान्सपॉण्डर्स लावले जाणार
आहेत. मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्डचं प्रातिनिधिक वाटपही यावेळी करण्यात आलं.
मुंबईतल्या जिओ कन्व्हेंशन सेंटरमध्ये आज ग्लोबल फिन्टेक फेस्टचं
उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, जगभरातले जवळपास पन्नास
टक्क्यांहून अधिक डिजिटल व्यवहार भारतात होत असून, भारताचं
युपीआय हे ॲप,
फिन्टेकचं जगभरातलं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधानांनी नमूद
केलं. फिन्टेक अर्थात वित्तीय तंत्रज्ञानामुळे भ्रष्टाचाराला आळा बसल्याचं पंतप्रधानांनी
सांगितलं.
****
दरम्यान, छत्रपती
शिवाजी महाराजांच्या पुतळा दुघर्टनेसंदर्भात माफी नसते, मात्र
ही माफी मागण्यासाठी सुद्धा बराच उशीर झाल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते
अंबादास दानवे यांनी केली आहे. पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर
दानवे यांनी एक ध्वनिचित्रफीत प्रसारित करून ही टीका केली. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी आज मालवण इथं संबंधित परिसराला भेट देऊन पाहणी केली, हे सरकार पुतळा कोसळण्याचं खापर फोडून आपली जबाबदारी झटकण्याचं काम करत असल्याची
टीका राऊत यांनी यावेळी केली.
****
देशातून पेट्रोल आणि डिझेलचा वापर संपवण्याचा संकल्प केंद्रीय
परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ते आज अमरावती इथं एका वाहन चालक
प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. चालकानं दिवसभरात फक्त आठ तास
वाहन चालवण्यासंबंधी नियम लवकरच करणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं.
****
निवृत्तीवेतन धारकांसाठी केंद्र सरकारने एकल सरलीकृत अर्ज जारी
केला आहे. भविष्य पोर्टलचंही ई-एचआरएमएस सोबत डिजिटली एकीकरण करण्यात आलं आहे. निवृत्तीवेतासंबंधीची
प्रक्रिया यामुळे अधिक सुलभ होणार आहे.
****
वक्फ घटनादुरुस्ती विधेयक २०२४ च्या अभ्यासाकरता नेमलेल्या संयुक्त
संसदीय समितीची बैठक आज नवी दिल्लीत होत आहे. यामध्ये मुंबईच्या ऑल इंडिया सुन्नी जमायुतुल
उलेमा संघटनांचे प्रतिनिधी समितीसमोर आपलं म्हणणं मांडत आहेत.
****
दहा हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांच्या नवीन ग्रंथालय
मान्यतेचा फेर प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा, अशा
सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. आज मंत्रालयात
झालेल्या बैठकीत ते बोलत होते. शासनमान्य ग्रंथालयाच्या अनुदान दरात ४० टक्के वाढ तसंच
प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सार्वजनिक ग्रंथालयाच्या
सहकार्याने डिजिटल ग्रंथालय उभारता येतील का यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे
आमदार जितेश अंतापूरकर यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष
राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी आज राजीनामा सोपवला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
यांचे निकटवर्तीय असलेले अंतापूरकर यांनी, गेल्या
विधान परिषद निवडणुकीत पक्षादेश झुगारून मतदान केल्याचा आरोप काँग्रेस पक्षातून केला
जात होता. काँग्रेसनं अशा आमदारांना पुन्हा तिकीट न देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
****
पॅरिस पॅरालम्पिक स्पर्धेत भारतानं आज एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकं मिळवत आपल्या अभियानाची शानदार सुरुवात केली. १० मीटर
एअर रायफल स्टँडिंग एस एच वन प्रकारात अवनी लेखरा हिने सुवर्णपदक तर मोना अग्रवालने
कांस्य पदक पटकावलं. अवनीने २४९ पूर्णांक ७ दशांश गुण मिळवत सुवर्ण तर मोनाने २२८ पूर्णांक
७ दशांश गुण मिळवत कांस्यपदकावर नाव कोरलं. महिलांच्या शंभर मीटर स्पर्धेत प्रीती पाल
हिनं कांस्यपदक पटकावलं. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल एस एच वन प्रकारात मनीष नारवालने
रौप्यपदक जिंकलं आहे.
****
परभणी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या
वतीने अमृत महा आवास अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्ती आणि संस्थांना
जिल्हास्तरीय पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर
यांच्या हस्ते या सर्वांना सन्मानित करण्यात आलं.
****
महिला बचत गटांना मॉल मध्ये स्टॉल उपलब्ध करुन दिल्यास बचत गटांनी
उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होईल. ग्राहकांना उत्तम वस्तू उपलब्ध होतील, असं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
यांनी म्हटलं आहे. लखपती दिदी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते
बोलत होते.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर
आज महसूल तसंच पोलीस प्रशासन यांची संयुक्त आढावा बैठक झाली. संवाद, समन्वय आणि प्रतिबंधात्मक कारवाई या त्रिसुत्रीचा अवलंब केल्यास गणेशोत्सव हा आनंददायी
आणि निर्विघ्न होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी स्वामी यांनी व्यक्त
केला.
****
लाडकी बहीण योजनेचा आगामी विधानसभा निवडणुकीत लाभ मिळवण्यासाठीच
निवडणुका पुढे ढकलण्याचं षडयंत्र रचलं
जात असल्याचा आरोप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी
यांनी केला आहे. ते आज लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रगतीशील शेतकऱ्यांना
पुरस्कार देण्यासाठी पैसे नसल्याचं सरकार सांगतं, मात्र लाडकी बहीण योजनेसाठी पैसे कुठून येतात असा सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित
केला.
****
धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या घटनादत्त आरक्षणाची अंमलबजावणी
करण्याच्या मागणीसाठी येत्या नऊ सप्टेंबरपासून राज्यव्यापी “आमरण उपोषण” पुकारण्यात
येणार आहे.
****
No comments:
Post a Comment