Tuesday, 1 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.09.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 September 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

देशभरात कोविड बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सुमारे ७७ टक्क्यांवर पोहोचलं आहे. गेल्या चोवीस तासात देशात ६५ हजारावर रुग्ण कोविड संसर्गातून मुक्त झाले. त्यामुळे या संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता २८ लाख ३९ हजार ८८२ झाली आहे. गेल्या चोवीस तासात देशात या संसर्गाच्या रुग्णांमध्ये ६९ हजार ९२१ नं वाढ झाली, त्यामुळे देशातली रुग्णसंख्या आता ३६ लाख ९१ हजार १६६ झाली आहे. गेल्या २४ तासात देशातल्या ८१९ रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला, या संसर्गाने आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ६५ हजार २८८ झाली आहे. मृत्यूचं हे प्रमाण १ पूर्णांक ७७ शतांश टक्के झालं असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

काल दिवसभरात देशात १० लाख १६ हजारावर लोकांची कोविड संसर्ग चाचणी करण्यात आली. आतापर्यत झालेल्या चाचण्यांची संख्या चार कोटी ३३ लाखावर पोहोचली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या २३ हजार ४६०वर पोहोचली आहे. यापैकी १८ हजार ३०२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर ६९९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ४ हजार ४५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

नाशिक जिल्हात आतापर्यंत २९ हजार ४२१ कोरोना विषाणू बाधितांना प्रकृती सुधारल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात ७ हजार ९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज पर्यंत ८७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिली आहे.

****

अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या आता ५ हजार ७५० झाली आहे. तर या संसर्गाने मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १३१ झाली आहे. आतापर्यंत चार हजार २८८ रुग्ण कोविड संसर्गातून मुक्त होऊन घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात १ हजार ३३१ रुग्ण उपचार घेत आहेत.

****

बुलडाणा जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यात मुदत संपलेल्या २२८ ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषद अंतर्गत अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या महिन्यात मुदत संपणाऱ्या २८९ ग्राम पंचायतीवर प्रशासक नेमणुकीचे आदेश शासनाकडून देण्यात आले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका लांबणीवर पडल्या असून उद्यापासुन हे नियुक्त प्रशासक आपापला पदभार स्वीकारुन कामकाजाला सुरुवात करणार आहेत.

****

दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचा आज समारोप होत आहे. आज सकाळपासूनच सर्वत्र गणेश विसर्जनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनासाठी गर्दी टाळण्याकरता ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या वतीनं विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

औरंगाबाद शहरात २५ ठिकाणी मूर्ती संकलन करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, तर अकरा ठिकाणी थेट विसर्जनाची व्यवस्था केली आहे. नागरिकांना थेट विसर्जन विहिरींवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

जालना शहरातल्या प्रत्येक प्रभागातून नगरपालिकेच्या वाहनातून सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तींचं संकलन केलं जाणार असून मोती तलावात विसर्जन केलं जाणार आहे. मोती तलाव परिसरात नागरिकांना येण्यास मनाई असून या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

नाशिक महापालिकेच्या वतीनं गणेश विसर्जनासाठी गोदावरी, नासर्दी, वाघाडी आणि वालदेवी नदी काठी ३३ अधिकृत विसर्जन स्थळं तयार करण्यात आली आहेत तर विविध प्रभागांमध्ये खुल्या जागांवर ३३ कृत्रिम कुंडं तयार करण्यात आली आहेत. शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं तसंच महापालिकेच्या वतीनं मूर्ती स्वीकारण्यात येत असून आतापर्यंत पाच हजाराहून अधिक मोठ्या मूर्तीं संकलित झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 

धुळे शहरात ३७ ठिकाणी गणपती विसर्जनासाठी पाण्याच्या टाक्या ठेवल्या आहेत. महापालिकेचे कर्मचारीही गणेश मूर्ती संकलित करुन त्यांचं विसर्जन करत आहेत.

सातारा जिल्ह्यातही सार्वजनिक तसेच घरगुती गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे.

****

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी नवी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते गुलाम नवी आझाद, अधीररंजन चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेकांनी मुखर्जी यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.

****

अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जेईई ही मुख्य परीक्षा स्थगित करण्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नकार दिला आहे. मात्र राज्यात विशेषत: विदर्भातल्या पूरग्रस्त भागातून एखादा उमेदवार परीक्षा केंद्रावर पोहोचू शकला नाही, किंवा उशीरा पोहोचला, तर तो राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडे पुनर्परीक्षेची मागणी करू शकतो, असं खंडपीठानं म्हटलं आहे. अशा अर्जांचा विचार करून त्याची सत्यता पडताळून परीक्षा संस्थेनं त्याबाबत १५ दिवसांत निर्णय घ्यावा, असंही खंडपीठानं, म्हटलं आहे.

जेईई परीक्षा आजपासून सुरू झाली असून, ६ सप्टेंबरपर्यंत होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...