Tuesday, 24 November 2020

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 November 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** कोरोना विषाणूचा धोका अद्यापही कायम असून, नागरीकांनी काळजी घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

** कोरोना विषाणूची लस आणि तीचं वितरण यासंदर्भात राज्यात एका कृती दलाची स्थापना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

** ४३ मोबाईल ॲप्लिकेशन बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

आणि

** जालना जिल्ह्यात दोन, तर औरंगाबाद जिल्ह्यात आज एका कोविड बाधित रुग्णाचा मृत्यू

****

कोरोना विषाणूचा धोका अद्यापही कायम असून, नागरीकांनी काळजी घेण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी आज कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह, गुजरात, हरियाणा, केरळ, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि राजस्थान, या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी झाले होते. लसीकरणाची प्रक्रिया अडथळे न येता आणि पारदर्शी पद्धतीनं राबवली पाहिजे, त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारनं आतापासूनच तयारी करणं आवश्यक असून, लसीच्या साठवणीसाठी शीतगृह उभारणीवर राज्यांनी आतापासूनच लक्ष द्यावं, असं पंतप्रधानांनी सांगितलं. कोरोना विषाणू प्रतिबंधाबाबत अधिक जनजागृतीची आवश्यकता असल्याचं सांगून, पंतप्रधान म्हणाले, 

 

लोगो कों कोरोना के गंभीरता के प्रती हमें फिरसे जागरुक करनाही होगा. हमें किसीभी हालत में ढिलाई नहीं बरतने देनी है. अब वॅक्सीन आने के बाद भी हमारी प्राथमिकता यही होगी की सब तक कोरोनाकी वॅक्सीन पहूंचे. उसमेंतो कोई विवाद हो ही नहीं सकता. कोरोना वॅक्सीन से जुडा भारत का अभियान अपने हर नागरिक के लिए एक प्रकारसे नॅशनल कमिटमेंट की तरह है. इतना बडा टीका करण अभियान स्मूद हो, सिस्टमॅटीक हो, और सस्टनेबल हो यह लंबा चलने वाला है. इस के लिए हम सभी को हर सरकार को, हर संघटन को एकजूट हो करके कॉरडीनेशन के साथ एक टीम के रुप में काम करना ही पडेगा.

 

करोना विषाणू बाधित रुग्णांचं प्रमाण पाच टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी आणि मृत्यूदर एक टक्क्यापेक्षा कमी करण्यासाठी राज्यांनी प्रयत्न करावे, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

****

या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, कोरोना विषाणूची लस आणि तीचं वितरण यासंदर्भात राज्यात एका कृती दलाची स्थापना करण्यात आली असल्याचं सांगितलं. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी पुढील काळात लस वितरण, राज्याराज्यांतून नागरिकांचा होणारा प्रवास तसंच प्रतिबंधित क्षेत्र निश्चिती, याबाबत देशव्यापी धोरण असेल तर अधिक नियोजनबद्ध रीतीने हा लढा देता येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करत आहेत, पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातल्या सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले. पुढील काळात संक्रमणाची साखळी तोडणं, पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटीव्हीटी दर आणणं, हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृती वाढवणं, एन्टीजेन चाचणीचा अहवाल नकारात्मक आलेल्या मात्र लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करणं, या गोष्टींवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिवांनी या बैठकीत केलेल्या सादरीकरणानुसार महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यात दररोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत घसरण झाली असून, आठ राज्यांच्या तक्त्यात आता राज्य सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.

****

केंद्र सरकारनं ४३ मोबाईल ॲप्लिकेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाची एकता आणि सार्वभौमत्वाला धोका असल्यानं ही ॲप्स बंद करत असल्याचं, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. अली सप्लायर्स, अलिबाबा वर्कबेंच, लालामूव्ह इंडिया, स्नॅक व्हिडिओ, कॅमकार्ड, फ्री डेटिंग ॲप, कॅशियर वॉलेट, मँगो टीव्ही, या ॲप्सचा यात समावेश आहे.

****

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन वाशिम इथले कर सल्लागार तथा समाज सेवक सुरेश टेकाळे यांनी केलं आहे.

****

राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असताना, केंद्र सरकारनं मदतीचा हात पुढे करणं गरजेचं होतं, केंद्राची ही भूमिका राज्याला सापत्नभावाची वागणूक देणारी असल्याचं, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. दोन महिने झाले तरी अद्याप नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक आलं नाही, असं ते म्हणाले. जीएसटी परतावा आणि राज्याच्या हक्काचे पैसेही दिले जात नाहीत, यावरुन विरोधी पक्षांच्या सरकारांची कोंडी करण्याचा केंद्रातल्या भाजप सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप थोरात यांनी केला. महाविकास आघाडी सरकारनं एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला असून, पुढील चार वर्षांचा कार्यकाळ ही पूर्ण करू, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

****

राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार हे बंदी सरकार असल्याची टिका, केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. ते आज लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या सरकारनं विना अनुदानित शाळांचं अनुदान रद्द केलं, वाढीव वीज बिलात सवलत दिली नाही, तीन पक्षांमध्ये एकवाक्यता नसून, त्यामुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचा आरोपही दानवे यांनी केला.

****

केंद्रानं केलेले कायदे आणि आदेश राज्य सरकार मानत नसेल तर ती बगावत असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते आज सांगली इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारने घटनाबाह्य भूमिका घेतल्यास केंद्र राष्ट्रपती राजवट लावू शकतं, असा इशारा त्यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाला न्यायालयातून स्थगिती आहे, मात्र मुस्लिम समाजाच्या पाच टक्के आरक्षणाला स्थगिती नाही. धर्मनिरपेक्षतेचा चेहरा सांगणारं महाविकास आघाडीचं सरकार मुस्लिमांना आरक्षण का देत नाही, असा प्रश्नही आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला.

****

जालना जिल्ह्यात आज दोन कोरोना विषाणू बाधित रुगणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ३०९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात आणखी ५० नवे रुग्ण आढळून आले. जालना जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता १२ हजार ६९ झाली आहे. तर आज ७९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जालना जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार ३७७ रुग्ण बरे झाले असून, सध्या ३८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या रांजणगाव शेणपुंजी इथल्या एका ७० वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा आज मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आाता एक हजार १३७ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या ४२ हजार ५०० झाली असून, ७६६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातल्या आठ जणांना आज उपचारानंतर सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ४० हजार ५९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

****

भंडारा जिल्ह्यात आज आणखी ६२, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२, तर धुळे जिल्ह्यात दहा कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले.

****

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना सक्तवसुली संचालनालय - ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ईडीनं आज सरनाईक यांच्या ठाण्यातल्या घर आणि कार्यालयावर छापे घातले. या छाप्यांमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कृती समितीनं औरंगाबाद इथल्या प्रादेशिक सह साखर संचालकांकडे केली आहे. गंगापूर तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबाबत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळानं आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोपही कृती समितीनं केला आहे. साखर कारखान्यासंदर्भात पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असं लेखी अश्वासन प्रशासनानं कृती समितीला दिलं आहे.

****

मराठा आरक्षण आणि समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं मराठा मशाल जागृती यात्रा काढण्यात येणार आहे. औरंगाबाद इथल्या क्रांती चौक इथून शनिवारी २८ नोव्हेंबरला या यात्रेला सुरुवात होणार असून मुंबईच्या आझाद मैदान इथं सात डिसेंबरला ही यात्रा दाखल होणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

//*************//

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...