Monday, 28 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 December 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 December 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि

****

** जगात सर्वोत्तम असलेली प्रत्येक वस्तू देशात उत्पादित करण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावं -  मन की बात मधून पंतप्रधानांचं आवाहन

** बांधकाम क्षेत्राला उभारी देण्याच्या नावाखाली मूठभर खागी लोकांचा फायदा - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

** करंज बियांपासून बायोडिझेल निर्मितीवर अधिक संशोधनाची गरज केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांच्याकडून व्यक्त 

** गॅस सिलिंडर दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचं काल राज्यभरात आंदोलन

** राज्यात तीन हजार ३१४ वे कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या १९३ रुग्णांची नोंद

** अतिवृष्टी बाधित सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी राज्य सरकारनं घ्यावी, - आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मागणी

 आणि

** ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या डावात भारताची १३१ धावांनी आघाडी

****

जगात सर्वोत्तम असलेली प्रत्येक वस्तू देशात उत्पादित करण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून, देशवासियांशी संवाद साधत होते.

आपल्या दैनंदिन आयुष्यात कळत-नकळत वापरल्या जाणाऱ्या परदेशी वस्तूंना स्वदेशी पर्याय शोधावेत, आणि आपल्या देशातल्या कष्टकरी लोकांनी बनवलेल्या, उत्पादनांचा वापर करण्याचा संकल्प करण्याचं आवाहनही, पंतप्रधानांनी यावेळी केलं. नव्या वर्षात संपूर्ण जगात भारताची ओळख निर्माण होईल, आणि त्याचं स्थान अधिक सशक्त व्हावं असं, ते म्हणाले. आपली उत्पादनं जागतिक दर्जाची असली पाहिजेत याची खात्री करण्याची वेळ आली असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. कोल्हापूरच्या अंजली तसंच मुंबईचे अभिषेक यांनी पाठवलेल्या पत्रांचा त्यांनी उल्लेख केला. कचरा करायचा नाही, तसंच एकदाच वापरायच्या प्लॅस्टिकपासून देशाला मुक्त करायचं, हा नव्या वर्षाच्या संकल्पांपैकी एक संकल्प ठेवण्याचं आवाहन, पंतप्रधानांनी या वेळी केलं. देशात बिबट्यांची संख्या वाढली असून, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात सर्वाधिक बिबटे असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख, त्यांनी केला. देशाच्या संस्कृती रक्षणासाठी प्राणांचं बलिदान देणारे गुरु गोविंदसिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांचं, पंतप्रधानांनी स्मरण केलं.

****

उत्तरप्रदेश सरकारने शीख धर्मगुरुंचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही माहिती दिली. शीख धर्मियांचे दहावे गुरु गोविंदसिंह यांच्या मुलांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ २७ डिसेंबर हा दिवस साहेबजादा दिवस म्हणून सर्व शाळांमध्ये पाळला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

संयुक्त जनता दलाच्या अध्यक्षपदी राज्यसभा खासदार आर सी पी सिंह यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष तथा बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी काल झालेल्या पक्षाच्या बैठकीत सिंह यांच्या नावाची शिफारस केली, त्याला सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमतानं पाठिंबा दिला.

****

कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्रालयानं वाहनाशी संबंधित कागदपत्रांच्या वैधतेला येत्या ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामध्ये वाहन चालवण्याचा परवाना, वाहन नोंदणी, आदी कागदपत्रांचा समावेश आहे. याबाबतच्या सूचना सर्व राज्य सरकारांना पाठवण्यात आल्या आहेत.

****

राज्यातल्या बांधकाम क्षेत्राला उभारी देण्याच्या नावाखाली मूठभर खाजगी लोकांचा फायदा केला जात असल्याचा आरोप, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी दीपक पारेख यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं, काही शिफारसी राज्य सरकारला केल्या होत्या, त्यातल्या काही निवडक आणि सोयीच्या शिफारशींची अंमलबजावणी केली जात असून, त्याचा राज्याच्या तिजोरीला फटका बसेल, तसंच काही निवडक लोकांनाच लाभ होणार असल्याचं, फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा निर्णय तत्काळ स्थगित करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीची विषय पत्रिका गोपनीय असते, पण याबाबतचे संबंधित संपूर्ण कागदपत्रं आणि शासन निर्णयाचा मसुदा, सर्व विकासकांकडे उपलब्ध आहेच, शिवाय समाजिक माध्यमांवरही दिसत असल्याकडे, फडणवीस यांनी लक्ष वेधलं.

दरम्यान, केंद्र सरकारनं शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत, त्यामुळेच पंजाब हरियाणा सोडल्यास इतर कोणत्याही प्रांतातले शेतकरी नव्या कृषी कायद्यांना विरोध करत नसल्याचं, फडणवीस यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं किसान आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते.

****

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या सह १० जणांना सांगली पोलिसांनी काल अटक केली. फडणवीस यांच्या इस्लामपूर इथल्या सभेत कडकनाथ कोंबड्या फेकण्याचा इशारा महेश खराडे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कडकनाथ संघर्ष यात्रा रोखत, पोलिसांनी महेश खराडे यांना अटक केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

करंज या झाडांच्या बियांपासून बायोडिझेल निर्मितीवर अधिक संशोधन व्हावं, अशी अपेक्षा केंद्रीय परिवहन तसंच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री, नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ग्रीक क्रूड अॅण्ड बायो फ्युएल फाऊंडेशन, या संस्थेच्या वतीनं काल नागपुरात करंज झाडाच्या रोपट्यांचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या बियांपासून शेतकऱ्यांसाठी कीटकनाशक कसं तयार करता येईल यावर संशोधन व्हावं, अशी सूचनाही गडकरी यांनी यावेळी केली. करंजपासून निर्माण झालेलं हे जैविक इंधन पारंपरिक डिझेलपेक्षा चांगलं, प्रदूषण न करणारं असल्याचं ते म्हणाले.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी केलं आहे.

****

राज्यात साडेबारा हजार पोलिस भरती मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पाच हजार २९५ पोलिस भरतीचे आदेश लवकरच देण्यात येणार आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही भरती प्रक्रीया लवकरच सुरू होईल, असंही त्यांनी सांगितलं.

****

गुजरात दहशतवाद विरोधी पथक - एटीएसनं मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी दाऊद इब्राहिम याच्या टोळीतला गुंड माजीद कुट्टी याला अटक केली आहे. माजीद कुट्टी हा गेल्या २४ वर्षांपासून फरार होता. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात २३ फेब्रुवारी १९९६ रोजी एका छापेमारीत, चार किलो आरडीएक्स, दहा डिटोनेटर, ११५ पिस्तुलं आणि शेकडो गोळ्या, असा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. पाकिस्तानी बनावटीची ही शस्त्रं राजस्थानच्या बाडमेर सीमेवरून गुजरातमध्ये पोहोचली होती, ती मुंबई आणि अहमदाबादेत पाठवली जाणार होती. या कारवाईनंतर माजीद कुट्टी मलेशियाला पळून गेला होता. तो पुन्हा भारतात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला अटक केली.

****

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं, काल राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. पुण्यात प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात चूल पेटवून दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला. सिलिंडरचे दर कमी झाले नाहीत, तर आमचं पुढचं लक्ष्य, हे पेट्रोल पंपावर लावलेले पंतप्रधानांचे फलक असतील, असा इशारा चाकणकर यांनी दिला. कोविड टाळेबंदीच्या काळात लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असताना, सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात गॅस आणि इंधन उपलब्ध करुन देण्याऐवजी दरवाढ केल्याचा आरोप या आंदोलकांनी यावेळी केला.

परभणी शहर तसंच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. आंदोलक महिलांनी चुलीवर स्वयंपाक करून गॅस दरवाढीचा निषेध नोंदवला. परभणी शहरात राष्ट्रवादी महिला आघाडीने मोर्चा काढला, अनेक महिला या मोर्चात खांद्यावर सिलिंडर घेऊन सहभागी झाल्या. आंदोलक महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या दोन दिवंगत योध्दयांच्या कुटुंबियांना, काल नागपूर इथं प्रत्येकी ५० लाख रुपये, विमा कवच सानुग्रह सहायता निधी देण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत तसंच क्रीडामंत्री सुनील केदार यावेळी उपस्थित होते.

****

राज्यात काल तीन हजार ३१४ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख १९ हजार ५५० झाली आहे. काल ६६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, हजार २५५ झाली असून, मृत्यू दर दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका आहे. काल दोन हजार १२४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख नऊ हजार ९४८ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक २९ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ५ हजार २१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल जालना जिल्ह्यात दोन कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या १९३ रुग्णांची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ६४ नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात ३०, जालना २४, नांदेड २३, लातूर १८, उस्मानाबाद १७, परभणी १५, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले दोन नवीन रुग्ण आढळले.

दरम्यान, इंग्लंडहून परतलेल्या नांदेड इथल्या दोन जणांना तर औरंगाबाद इथं आणखी एकाला कोविडची लागण झाल्याचं निदर्शनास आलं आहे. औरंगाबाद इथं गेल्या आठवड्यातही ब्रिटनहून आलेल्या एकाला कोविड संसर्ग झाला आहे.

****

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत समाविष्ट असलेल्या अतिवृष्टी बाधित सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी राज्य सरकारनं घ्यावी, असं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल उस्मानाबाद इथं बोलत होते. विमा कंपनीने नुकसान भरपाई देण्यात चालढकल केली तर या कंपन्यांसोबत करार करणाऱ्या राज्य सरकारला जबाबदारी घ्यावी लागेल, असं पाटील यांनी नमूद केलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तुटपुंजी मदत केली आणि, आता पिक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्याबाबत जबाबदारी झटकण्याचं काम सुरू असल्याची टीका, त्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यात तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी पाटील यांनी केली.

****

२०१५ ची ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या मात्र निवडणूक खर्च वेळेत सादर न केलेल्या उमेदवारांना, यंदाची ग्रामपंचायत निवडणूक लढवता येणार नाही. निवडणूक विभागानं याबाबतचे आदेश जारी केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या तीन हजार ८४० जणांना यंदाची निवडणूक लढवता येणार नसल्याची सूचना, निवडणूक आयोगानं  जिल्हा प्रशासनाला केली आहे. या व्यक्तींच्या नावाची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींनी उमेदवारी दाखल केल्यास त्यांचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद होण्याची शक्यता आहे

****

उस्मानाबाद जिल्ह्यात शेतरस्त्यांवरचं अतिक्रमण काढण्याची मोहीम जिल्हा प्रशासनानं हाती घेतली आहे. शेत रस्त्यावरून गावकऱ्यांमध्ये असलेले अंतर्गत वाद आणि संघर्ष टाळण्यासाठी, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर

ह्या मोहिमेला ११ डिसेंबर पासून आजपर्यंत २० पेक्षा अधिक शेत रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात यश आलं. गावागावात शिवार फेरी घेऊन गावकऱ्यांसोबत मंडळ अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याच्या सूचनाही यासंदर्भात देण्यात आल्या असून अतिक्रमण झालेले रस्ते मोकळे करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढे यावं, अन्यथा कायदेशीर तरतुदींचा अवलंब करण्यात येईल, मोकळे झालेल्या शेत रस्त्यांचं महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून मजबुतीकरण केले जाणार असून त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर होणार असल्याचं जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितल. 

देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद

****

अजिंक्य रहाणेच्या कर्णधाराला साजेशा शतकी खेळीच्या बळावर भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात ३२६ धावा केल्या. रविंद्र जडेजा ५७, शुभमन गील ४५, चेतेश्वर पुजारा १७, ऋषभ पंत २९, हनुमा विहारी २१, रविचंद्रन अश्विन १४, उमेश यादव ९ तर कर्णधार अजिंक्य रहाणेनं ११२ धावा केल्या. रहाणेचं कसोटी क्रिकेटमधलं हे बारावं शतक आहे. भारतानं पहिल्या डावात १३१ धावांची आघाडी घेतली आहे. चार सामन्यांच्या या मालिकेत पहिली कसोटी जिंकून ऑस्ट्रेलिया संघ एक शून्यनं आघाडीवर आहे.

****

मध्यप्रदेशात ग्वाल्हेर इथं तानसेन संगीत समारोह सध्या सुरू आहे. प्रसिद्ध संतूरवादक पंडित सतीश व्यास यांना या महोत्सवात तानसेन सन्मान प्रदान करण्यात आला. काल नांदेड इथले सूरमणी धनंजय जोशी यांचं या समारोहात गायन झालं.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन लातूरचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केलं आहे.

****

लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे गुरुजी यांच्या ‘निवडुंग ते बोधीवृक्ष’ या आत्मकथापर पुस्तकाचं, काल लातूर इथं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन झालं. ही आत्मकथा सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला

****////****

 

No comments: