Wednesday, 25 August 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.08.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 August 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

अर्थमंत्री निर्मला सीतारामन दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांच्या प्रमुखांबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वार्षिक कामगिरीचा आढावा त्यांनी घेतला. काल दौऱ्याच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्र्यांनी प्राप्तीकर विभाग, सीमाशुल्क विभाग तसंच अप्रत्यक्ष कर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

****

केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची आजपासून सुरु होणारी तळकोकणातली जनआशिर्वाद यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज कणकवली इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर राज्य सरकार बिथरलं असून, त्यामुळेच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली, असं तेली म्हणाले.

****

पुण्यातली जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स ही कंपनी विकसित करत असलेल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यासाठी भारतीय औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. या लसीच्या निर्मितीसाठी एम.आर.एन.ए. तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानावर आधारलेली ही भारतीय बनावटीची पहिलीच लस असणार आहे. एच.जी.को नाईनटीन असं या लसीचं नाव असेल. ही लस वापराच्या दृष्टीनं सुरक्षित आणि कोविडला प्रतिकार करण्याच्या दृष्टीनं प्रभावी आढळून आल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निवेदनात दिली आहे.

****

नागपूर इथल्या इकोनॉमिक इक्सप्लोजीव लिमिटेड - ईईएल या खाजगी कंपनीने तयार केलेल्या मल्टी मोड हँड ग्रेनेडचं काल नागपूर इथं भारतीय लष्कराकडे हस्तातंरण करण्यात आलं. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे, डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यावेळी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात राजनाथसिंह यांनी, भारतीय संरक्षण क्षेत्राच्या इतिहासातील हा दिवस अविस्मरणीय असल्याचं नमूद केलं. लष्करासाठी हातगोळे बनवणारी देशातली ही पहिलीच खाजगी कंपनी आहे. 

****

कंत्राटदार नागरिकांची कामं वेळेत करत नसल्याच्या तक्रारी वाढत असून, अशा कंत्राटदारांची माहिती घेऊन त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या विनंतीनुसार, पैठण विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या कामाची आढावा बैठक काल राऊत यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. पैठण तालुक्यातल्या दरकवाडी, औरंगपूरवाडी, रहाटगाव इथं ३३ के.व्ही.चे उपकेंद्र उभारण्याच्या मागणीच्या प्रस्तावाचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. पैठण तालुक्यातलं नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम त्वरित करण्यात यावं तसंच सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राऊत यांनी यावेळी दिले.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या पारगांव भातोडी या गावाला आदर्श गाव म्हणून विकसित करण्यासाठी राज्याच्या आणि केंद्राच्या योजनांचा लाभ घेऊन या गावाच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा, असे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातलं ऐतिहासिक महत्व असलेलं हे गाव ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी दत्तक घेतलं असून, या गावाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी मंत्रालयात काल बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

****

बंजाराबहुल ११ जिल्ह्यांत वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतंर्गत विकासकामांना तांडा लोकसंख्येवर आधारित निधी देण्यात येणार आहे. इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल ही माहिती दिली. यासाठी बंजारा समाजातील व्यक्तींच्या अध्यक्षतेखाली अशासकीय समिती स्थापन करण्यात येणार असून तांडा वस्ती सुधार योजनेतंर्गत संत श्रेष्ठ रामराव महाराज सभागृह या नावानं नवीन कामाचा समावेश करण्यात येईल असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

****

भारतीय स्टेट बँकेनं २८ ऑगस्टला बँक अदालत आयोजित केली आहे. या बँक अदालतीत, “ऋण बोझ से मुक्त हो जाओ चिंता ना रहेगी कोई शेष की”, या योजनेत थकीत कर्जदारांना व्याजात मोठी सूट देण्यात येणार आहे. थकीत कर्जदारांनी आपल्या शाखेत जाऊन या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन बँकेच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक शंकर येरावार यांनी केलं आहे.

****

अखिल भारतीय नाट्य परिषद आणि बालरंगभूमी शाखा बीड यांच्या वतीनं जिल्ह्यातल्या लोककलावंतांना आर्थिक मदत करण्यात आली. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण यांच्या हस्ते ७० कलावंतांना लोकसहभागातून जमावलेली साडेतीन लाख रूपये मदत देण्यात आली.

****

भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आजपासून लीड्सच्या हेडींग्ले मैदानावर सुरू होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सामना सुरु होईल. या मालिकेत भारत एक - शून्यनं आघाडीवर आहे.

****

No comments: