Thursday, 2 December 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.12.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 December 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

लोकसभेत आज कोविड-19 मुळे देशात उद्भवलेल्या स्थितीवर चर्चा सुरु आहे. सर्वांच्या प्रयत्नांमुळे कोविडवर मात करण्यात आपल्याला यश आलं असल्याचं, शिवसेना खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले. राजकारण बाजुला ठेऊन सर्वांनी एकत्र येत कोविडचा सामना केला असून, ही सकारात्मक बाब असल्याचं ते म्हणाले. कोविडसंबंधी राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजनांची राऊत यांनी सदनाला माहिती दिली.

राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे आजही कामकाज बाधित झालं. राज्यसभेत गेल्या तीन दिवसांत कोणतंही काम झालं नसल्याचं, सभापती एम व्यंकय्या नायडू म्हणाले. १२ खासदारांना निलंबित केल्याप्रकरणी विरोधी पक्ष नेत्यांना बोलू देण्याची विरोधी पक्षांची मागणी सभापतींनी फेटाळून लावली. त्यामुळे विरोधी पक्षांनी सदनाच्या मधोमध येऊन घोषणाबाजी केली. या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलं होतं.

****

परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारनं नियमात बदल केला आहे. परराज्यातून राज्यात येताना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र आणि राज्य सरकारनं घातलेल्या निर्बंधांमध्ये जी तफावत होती, ती दूर करण्यात आली असल्याचं पवार यांनी सांगितलं.

****

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार, उद्योजक चंद्रकांत जाधव यांचं आज निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद इथल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांचं पार्थिव कोल्हापूर इथं निवासस्थानी आणण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाधव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठीची आवेदन पत्रं सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नियमित शुल्कासह १२ डिसेंबर, तर विलंब शुल्कासह २० डिसेंबरपर्यंत आवेदनपत्रं सादर करता येतील.

****

राज्य मार्ग परिवहन-एस.टी. महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी आज धुळे आगारामध्ये कामगारांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. आगारातल्या दत्त मंदिरात श्रीफळ फोडून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

****

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी, सकाळी ११ वाजता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचं, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक तसंच युट्यूब या समाजमाध्यमांवर प्रसारण होणार आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी संयुक्तरित्या या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या गुंडा शिवारात हळदीच्या पिकांत असलेली गांजाची झाडं पोलिसांनी ताब्यात घेतली. शेतकरी उत्तम भालेराव यांच्या शेतात ही झाडं लावली असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ही झाडे जवळपास १०० किलोच्यावर असल्याचा अंदाज महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

****

परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल पाथरी तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी ढालेगाव इथं सीमा रेषेवर तपासणी नाक्याला भेट दिली. संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर ही भेट देण्यात आली.

****

राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस सुरु असल्यानं, जनजीवन विस्कळीत झालं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, बिडकीन, खुलताबाद परिसरात पाऊस सुरु आहे. औरंगाबाद शहरातही रिमझिम पाऊस सुरु असून, थंडीचा कडाका वाढला आहे. 

सांगली जिल्ह्यात रात्रीपासून पाऊस सुरू आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. समडोळी गावात ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांत पाणी शिरल असून, संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालं आहे.

धुळे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळे काढणीला आलेला कांदा, कापूस, तसंच मूग, उडीद, तूर, तीळ, बाजरी, मका या पीकांचं नुकसान होत आहे.

मुबंई उपनगरांसह, ठाणे, पालघर जिल्ह्यातही आज सकाळपासून पाऊस सुरु आहे.

****

हिमाचल प्रदेशमध्ये पार पडलेल्या ३१ व्या राष्ट्रीय किशोर-किशोरी अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने इतिहास रचला. दोन्ही गटात महाराष्ट्र दुहेरी मुकुटसह अजिंक्यपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत काल महाराष्ट्राच्या किशोर संघाने कर्नाटकवर, तर किशोरींनी पंजाबवर विजय मिळवला. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा भरत पुरस्कार आशिष गौतमला, तर ईला पुरस्कार सानिका चाफे या राज्यातल्या खेळाडूंना देऊन गौरवण्यात आलं.

****

No comments: