आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१८ जानेवारी २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात ९३ नगरपंचायतीतल्या
३३६ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात आज शांततेत मतदान सुरु आहे. या नगरपंचायतींमध्ये मराठवाड्यात
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी, बीड जिल्ह्यातल्या
केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, लातूर जिल्ह्यातल्या जळकोट, चाकूर, देवणी,
आणि शिरूर-अनंतपाळ, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी आणि लोहारा, नांदेड जिल्ह्यातल्या
नायगाव, अर्धापूर, तसंच माहूर, हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव, आणि औंढा-नागनाथ, औरंगाबाद
जिल्ह्यातल्या सोयगाव, तर परभणी जिल्ह्यातल्या पालम नगर पंचायतीचा समावेश आहे. पहिल्या
आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाची उद्या मोजणी होणार आहे.
****
देशात सध्या
गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम कालावधी असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आर्थिक
मंचासमोर सांगितलं आहे. या बैठकीला त्यांनी दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित
केलं. गेल्या काही वर्षात देशानं कंपनी कर कमी केला आहे. अनेक प्रकारच्या कालबाह्य
परवानग्या रद्द केल्या आहेत. अवकाश तंत्रज्ञानासारखी काही क्षेत्रं खासगी कंपन्यांना
खुली केली असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
देशात तीन जानेवारी
रोजी १५ ते १८ वयोगटाच्या युवकांचं लसीकरण सुरु झाल्यापासून आतापर्यंत साडे ३ कोटी
पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी कोविड लसीची पहिली मात्रा घेतल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री
मनसुख मांडवीया यांनी म्हटलं आहे. आपलं लसीकरण करून घेणाऱ्या युवकांचं त्यांनी अभिनंदन
केलं असून, त्यांच्या उत्साहाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
****
विद्यापीठ कायदा
सुधारणा विधेयक राज्य सरकारनं मागं घ्यावं या मागणीकरता भारतीय जनता युवा मोर्चानं
काल उस्मानाबाद इथं काळी रांगोळी काढून निषेधात्मक आंदोलन केलं. या विधेयकाच्या विरोधात
यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली.
****
शेतीमालावर लादलेली
वायदे बाजारावरील बंदी हटवावी तसंच जीएम तंत्रज्ञानाला परवानगी द्यावी, या मागण्यांसाठी,
शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष आंदोलन करणार आहे. स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय
अध्यक्ष अनिल घनवट यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment