Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 February
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०७ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत
आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५
ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस
घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या
उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात
तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य
स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर, शासकीय इतमामात साश्रूनयनपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार
· राष्ट्रपती, पंतप्रधानांसह राजकीय,
सामाजिक, चित्रपट, तसंच सांस्कृतिक क्षेत्राच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त
· लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारचा दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
· राज्यात कोविडचे
९ हजार ६६६ नवे
रुग्ण, मराठवाड्यात दहा रुग्णांचा मृत्यू तर ८९८ बाधित
· केंद्र सरकारची
सर्व कार्यालय आजपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होणार
· प्रसिद्ध चित्रकार दिलीप बडे यांचं निधन
आणि
· एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा वेस्ट इंडीजवर सहा गडी आणि २२ षटकं राखून विजय
****
गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर, काल मुंबईत शिवाजी पार्कवर शासकीय
इतमामात साश्रूनयनपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. लता दिदींचे धाकटे बंधू हृदयनाथ यांनी त्यांच्या पार्थिव
देहाला मुखाग्नी दिला. यावेळी त्यांच्या भगिनी मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर,
आणि अन्य कुटुंबीय उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे, राज्य मंत्रिमंडळातले अनेक मान्यवर मंत्री, खासदार शरद पवार, क्रिकेटपटू
सचिन तेंडुलकर, गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेता शाहरुख खान यांच्यासह संगीत, चित्रपटासह
सर्वच क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी, लतादिदींचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण
केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावतीनं लता दिदींना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली
वाहण्यात आली. लतादिदींना २१ तोफांची अखेरची मानवंदना देण्यात आली.
त्यापूर्वी काल सकाळी त्यांचा पार्थिव देह मुंबईतल्या प्रभुकुंज
या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. हजारोंच्या संख्येनं
चाहत्यांनी आपल्या लाडक्या लतादिदींचं अंत्यदर्शन घेतलं.
२८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्यप्रदेशात इंदूर इथं जन्मलेल्या लतादिदींनी
१९४२ साली गायनाला प्रारंभ केला. जवळपास सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ३० हून अधिक
भारतीय तसंच विदेशी भाषांमधून हजारो गाणी गायली. जगभरात गायनाचे शेकडो कार्यक्रम सादर
केले.
भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानासह देशोदेशींच्या अनेक पुरस्कारांनी
त्यांना गौरवण्यात आलं. त्यांच्या हयातीतच मध्यप्रदेश तसंच महाराष्ट्र राज्य सरकारनं
लता मंगेशकर पुरस्कार देण्यास प्रारंभ केला.
लता मंगेशकर यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा
संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत:
१९४२ साली मास्टर
विनायक यांच्या किती हसाल... या चित्रपटात सदाशिव नेवरेकर यांनी संगीतबद्ध केलेलं नाचू
या गडे हे लताबाईंचं चित्रपटासाठी ध्वनिमुद्रीत पहिलं गाणं. पण हे गाणं चित्रपटातून
वगळण्यात आलं.
त्यामुळे त्याच
वर्षी आलेल्या पहिली मंगळागौर या चित्रपटांतलं दादा चांदेकर यांचं संगीत असलेलं ‘नटली
चैत्राची नवलाई’ हे लताबाईंचं पहिलं मराठी चित्रपट गीत ठरलं.
१९४२ साली सुरू
झालेली ही गायनाची कारकीर्द २०१९ साली मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘सौगंध मुझे
इस मिट्टी की..’ या गाण्याशी येऊन पोहोचली. लताबाईंनी ध्वनिमुद्रीत केलेलं हे अखेरचं
गाणं.
संगीतकार, गीतकार
आणि अभिनेत्रींच्या अनेक पिढ्यांसाठी लताबाई गायल्या. चित्रगुप्त आणि आनंदमिलिंद किंवा
रोशन आणि राजेशरोशन हे संगीतकार पितापुत्र, अंजान आणि समीर किंवा जांनिसार अख्तर आणि
जावेद अख्तर हे गीतकार पितापुत्र तर, शोभना समर्थ-नूतन तनुजा - काजोल या एकाच घरातल्या
तीन पिढ्यांच्या अभिनेत्री.. ही त्यातली काही ठळक उदाहरणं.
लताबाईंनी आपल्या
भावंडासोबतही अनेक उत्तमोत्तम गाणी केली. पंडित हृदयनाथांनी चालीत बांधलेल्या ज्ञानेश्वरांच्या
विराण्या लताबाईंनी घराघरात पोहोचवल्या..
आनंदघन नावानं
लताबाईंनी संगीत दिलेली आणि आशाबाईंच्या आवाजातली ही ठसकेबाज लावणी....
राजा शिवछत्रपती
या गीतसंग्रहातली सावरकरांची ही रचना.. हृदयनाथांचं संगीत आणि लताबाईंचा आवाज यामुळे
हे शिवस्तोत्र अजरामर झालंय...
लताबाईंचं संगीत
आणि आवाज असलेल्या या गाण्याने त्यांच्या या भव्य कारकिर्दीला सलाम करूया. या गाण्यात
त्यांनी कोरसचा अप्रतिम वापर केलाय. कोरसमध्ये ऐकू येणारा प्रतिध्वनी आहे, लताबाईंच्याच
दोन भगिनी मीनाताई आणि उषाताई यांचा...
पार्श्वगायन क्षेत्रात मापदंड
असलेल्या लतादिदी, गाण्याइतक्याच क्रिकेट आणि फोटोग्राफीच्या चाहत्या लतादिदी, हयातीतच
दंतकथा झालेल्या लतादिदी,.. सदैव मनामनात रुंजी घालत असतात...
****
आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी ज्येष्ठ संगीतकार पंडित विश्वनाथ
ओक यांनी या शब्दांत लतादिदींना श्रद्धांजली अर्पण केली:
संगीतातले जे सात स्वर आहेत, ते सात
स्वरही ज्यांच्या नावात सामावलेले आहेत, अशी सात अक्षरं म्हणजे लता मंगेशकर. अखिल
संगीत विश्वाला या आवाजाने साधारण १९४२-४३ पासून उमेदी गाठवलेली आहे. भारतातल्या
असंख्य भाषांमधून त्यांनी रसिकांचे कान तृप्त केले. या प्रत्येक गाण्यात त्यांनी
जीव ओतला. आणि प्रत्येक गाणं त्यांनी अमर केलं.
****
प्रसिद्ध गायक संगीतकार कौशल इनामदार यांनी लतादिदींना या शब्दांत
श्रद्धांजली अर्पण केली:
लताबाईंनी इतक्या असंख्य गाण्यांमधे
त्यांनी आपला श्वासच तर सोडून गेल्यात. आणि तो श्वाससुद्धा त्यांच्या स्वराच्या
रूपाने सोडून गेल्यात. इतका निखालस, दैवी स्वर्गाच्या सुराने लताबाई आपल्याला
त्यांचा श्वास या पृथ्वीतलावर ठेवून गेलेल्या आहेत. त्यामुळे अशा माणसाला, अशा
व्यक्तीला ती गेली असं कसं म्हणता येईल आपल्याला. मला असं वाटतं की, एका अर्थाने
लताबाईंचं अमरत्व सिद्ध झालं.
****
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या औराद शाहजनी इथं शारदोपासक शिक्षण संस्थेचं मास्टर दीनानाथ
मंगेशकर महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या पायाभरणीसाठी लता मंगेशकर आल्या
होत्या. या महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वलांडे गुरुजी
यांनी लतादिदींच्या या भेटीला उजाळा
दिला...
२८ फेब्रुवारी १९७३ ला आमचा
या ठिकाणी इमरतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. पहिल्यांदा त्या या ठिकाणी आल्या.
आणि मग त्या कार्यक्रमात त्यांनी डिक्लियर केलं तुमच्या कॉलेजच्या मदतीसाठी मी कार्यक्रम
देते आहे, तो कार्यक्रम २८ फेब्रुवारी १९८१ ला झाला. त्यानंतर ज्या ज्या वेळी आम्ही
लताजींना शुभेच्छा देण्यासाठी एखादी चिठ्ठी पाठवायची. ताबडतोब माणूस खाली यायचा आणि
आम्हला वर बोलावयचा. असे हे ऋणानुबंध होते आमचे.
****
लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारनं दोन दिवसांचा
राष्ट्रीय दुखवटा
जाहीर केला असून, राज्य सरकारने आज राज्यात दुखवट्याची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली
आहे.
दरम्यान, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण
- म्हाडाची सरळसेवा भरतीअंतर्गत अतांत्रिक
पदासाठी आजची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, अशी माहिती 'म्हाडा'चे सचिव राजकुमार
सागर यांनी दिली आहे.
****
राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण
आढळला नाही. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या तीन हजार ३३४ एवढी
झालेली असून, यापैकी दोन हजार
१३ रुग्ण संसर्गातून मुक्त झाले आहेत.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ९ हजार ६६६ रुग्ण
आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ३ हजार ७०० झाली आहे. काल
६६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या
संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार
७४ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३
शतांश टक्के आहे. काल २५ हजार १७५
रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७५ लाख ३८ हजार ६११ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९६ पूर्णांक ४० शतांश टक्के
झाला आहे. राज्यात सध्या एक लाख १८ हजार ७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ८९८
कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळले, तर दहा रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये नांदेड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात
प्रत्येकी दोन, तर औरंगाबाद, बीड, परभणी आणि जालना जिल्ह्यातल्या
प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल १९८ नवे रुग्ण आढळले. लातूर
जिल्ह्यात १३४, हिंगोली १२९,
उस्मानाबाद १२८, नांदेड १२७, जालना ८८,
बीड ४८ तर परभणी जिल्ह्यात ४६ नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत घट होत असल्यामुळे केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांमधली उपस्थिती आजपासून
पूर्ण क्षमतेनं राहणार आहे. केंद्रीय आस्थापना राज्यमंत्री
डॉ जितेंद्र प्रसाद यांनी काल ही माहिती दिली. कर्मचारी
कोविड प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळतील, याची खबरदारी विभागप्रमुखांनी घेणं आवश्यक असल्याचं प्रसाद यांनी
सांगितलं.
****
प्रसिद्ध चित्रकार दिलीप बडे यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं,
ते ६८ वर्षांचे होते. पोट्रेट मास्टर अशी ख्याती असलेले बडे यांनी ३५हून अधिक वर्ष
अध्यापनाचं कार्य केलं. औरंगाबाद इथल्या शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे डीन या पदावरुन
ते निवृत्त झाले होते. राज्य शासनानं त्यांना राज्य शिक्षक पुरस्कारानं सन्मानित केलं
होतं. त्यांच्या पार्थिवावर काल औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
शिक्षण आणि सहकार चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते आणि
नाशिक मधील के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचं काल निधन झालं. बाळासाहेब
वाघ यांनी १९७० मध्ये के के
वाघ शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्याचबरोबर कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचं
२२ वषज्ञ त्यांनी अध्यक्षपद सांभाळलं. त्यांच्या पार्थिवावर आज नाशिक इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
अहमदाबाद इथं एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या काल झालेल्या पहिल्या
सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजवर सहा गडी आणि २२ षटकं राखून विजय
मिळवला. प्रथम फलंदाजी करताना, वेस्ट इंडीजनं भारतासमोर १७७ धावांचं लक्ष्य ठेवलं, भारतीय
संघानं चार गडी गमावत, अठ्ठाविसाव्या षटकांतच हे लक्ष्य पार करून विजय मिळवला. चार
बळी घेणारा यजुवेंद्र चहल सामनावीर ठरला. दरम्यान, हा सामना खेळून भारतानं हजारावा
एकदिवसीय सामना खेळण्याचा विक्रमही रचला आहे. कालच्या सामन्यात भारतीय संघानं काळी
फीत बांधून खेळत लतादिदींना श्रद्धांजली अर्पण केली.
****
No comments:
Post a Comment