Sunday, 1 May 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.05.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 May 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ मे २०२ सायंकाळी ६.१०

****

·      महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिन ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा.

·      राज्यात उद्योग स्नेही वातावरण निर्माण करण्याची गरज -केंद्रीय मंत्री नारायण राणे.

·      राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या हीरक महोत्सवाला प्रारंभ.

आणि

·      बीड पिक विमा पॅटर्न परभणीत राबवण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री धनंजय मुंडे.

****

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिन आज सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री असलम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना राज्यपाल कोश्यारी यांनी कोविड काळातही राज्यानं प्रगती आणि विकास कार्यात कुठेही खंड पडू दिला नसल्याचं सांगितलं.

 

नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त डॉ. निरूपमा डांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

****

औरंगाबाद इथं पोलीस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात पालकमंत्री देसाई यांनी प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत देशात महाराष्ट्र तर राज्यात औरंगाबाद जिल्हा प्रथम क्रमांकावर असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

Byte

औद्योगिकीकरणाच्या आघाडीवर ऑरिकसिटी ही एक जागतिक दर्जाची औद्योगिक वसाहत उभी राहिलेली असून आजपर्यंत या औद्योगिक वसाहतीमध्ये १५० कंपन्यांना भुखंडाचं वाटप करण्यात आलं असून पाच हजार कोटीहून अधिक गुंतवणूक झालेली आहे. रोजगार हमी योजनेमध्ये जिल्ह्यानं २५२ टक्के उद्दिष्ट साध्य करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत देशात महाराष्ट्र आणि राज्यात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.

दरम्यान, राज्य शासनानं राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती देणाऱ्या 'दोन वर्षे जनसेवेची: महाविकास आघाडीची' या सचित्र प्रदर्शनाचं उद्‍घाटन पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते झालं.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांच्या हस्ते तर नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

****

नांदेड इथं छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदानावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. चव्हाण यांनी पोलीस संचलनाचं निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. उत्तम कामगिरी करणारे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरवण्यात आलं. 

****

लातूरमध्ये पालकमंत्री अमित देशमुख यांनी ध्वजारोहण केलं. कोविड काळात आणि कोविड नंतर जिल्ह्यात पायाभूत सोयी सुविधा आणि लोक कल्याणकारी योजनांची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आली त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली असल्याचं पालकमंत्री देशमुख यांनी आपल्या भाषणात नमूद केलं. जिल्ह्यातील लसीकरणाला गती देण्याची आवश्यकता देशमुख यांनी व्यक्त केली

****

परभणीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्हा प्रशासनाच्या 'करू या जागर श्रमाचा' या घोषवाक्याचं आणि परभणी जिल्हा गौरव गीताचं अनावरण पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती प्रसिद्धी दालनाचं उद्घाटनही त्यांनी याप्रसंगी केल.

****

हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांना पालकमंत्री गायकवाड यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचं पदक प्रदान करून गौरव करण्यात आला.

****

जालना इथं आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतर केलेल्या भाषणात पालकमंत्री टोपे यांनी, महाराष्ट्र दिन तसंच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोविड लसीकरणाला गती देण्याची गरज आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केली.

‍Byte…

सर्वात महत्वाचं जर काही करणे अपेक्षित असेल तर ते आहे लसीकरण आणि त्यामुळे जे काही शालेय वयाचे गट आहेत, १२ ते १५ असेल किंवा १५ ते १७ असेल आणि १८ च्या पुढचे आहेत. आता नव्याने वय वर्ष ६ ते १२ हा सुद्धा नवीन गट लसीकरणाच्या दृष्टीकोनातून देशाच्या सरकारने आपल्याला सांगितला आहे. आणि या सगळ्या लसीकरणामध्ये आपण सक्रीय सहभाग घ्या असं आवाहन आणि विनंती मी या निमित्ताने करु इच्छितो.

****

बीड इथं राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. कोविडच्या चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी शासन आवश्यक सर्व उपाययोजना करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पोलिस दलाच्या वतीनं राज्यमंत्री बनसोडे यांना मानवंदना देण्यात आली.

****

उस्मानाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणा नंतर जिल्हाधिकारी यांनी मराठवाडा स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले, सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाच्या माहितीच्या कक्षाचं उद्‌घाटन तसंच माहिती रथाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हा रथ मार्गस्थ करण्यात आला.

****

कामगार दिनही आज पाळण्यात आला. कामगारांना त्यांच्या न्याय्य हक्कांबाबत माहिती देण्यासाठी विविध उपक्रम यावेळी राबवण्यात आले.

****

देशाच्या दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र १३व्या क्रमांकावर असून राज्यात उद्योग स्नेही वातावरण निर्माण करण्याची गरज, केंद्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई इथं, तीन दिवसीय उद्योग परिषद आणि व्यावसायिक प्रदर्शनाचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते आज करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. येत्या दोन वर्षात महाराष्ट्रात ३७ उद्योग समूह उभारण्याची घोषणा राणे यांनी यावेळी केली. राज्यातल्या शेवटच्या टोकावरच्या माणसाचं उत्पन्नही वाढायला हवं, असा मानस राणे यांनी व्यक्त केला.

****

समाजात वाढता उन्माद, भय आणि सामाजिक ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात मूक निदर्शनं करण्यात आली. राज्यात विविध शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात नागरिकांनी हातात पांढरा रुमाल किंवा पांढरा कागद घेऊन या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला. औरंगाबाद इथं क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी हे आंदोलन करण्यात आलं. आम्ही आमची अस्वस्थता फक्त शांतता आणि प्रेमाच्या मार्गानं व्यक्त करत असल्याचं प्राध्यापक कैलास अंभुरे यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या स्थापनेला आज १ मे रोजी ६० वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं राज्यातल्या जिल्हा परिषदांमध्ये हीरक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. नांदेड इथं पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या हीरक महोत्सवाचं उद्‌घाटन झालं. दुर्गम भागातल्या नागरिकांचे जिल्हा परिषदेसंदर्भातले प्रश्न सुटावेत यासाठी नांदेड जिल्हा परिषदेतर्फे स्वतंत्र तीन ॲप विकसित करण्यात आले आहेत. तक्रार निवारण प्रणाली ॲप, सुनोनेहा ॲप, पोषण श्रेणी ॲप, अशी या ॲपची नावं असूल, चव्हाण यांच्या हस्ते या ॲपचं लोकार्पण करण्यात आलं. झरी ग्राम पंचायतीला केंद्र शासनाचा पंडित दीनदयाळ पंचायत राज पुरस्कार मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला.

****

हिंगोली इथं पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते जिल्हा परिषद हीरक महोत्सवाचं उद्‌घाटन झालं. पंचायतराज समितीच्या माध्यमातून जनतेच्या हिताची कामे पूर्ण करण्याचं आवाहन पालकमंत्री गायकवाड यांनी प्रशासकीय यंत्रणेला केलं.

गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात खरीप हंगाम नियोजनासह विविध विभागांची आढावा बैठक घेतली.

****

बीड जिल्ह्यातील पिक विम्याचा पॅटर्न परभणी जिल्ह्यात राबवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं परभणीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बि-बियाणे आणि रासायनिक खते मिळतील याची संबंधीतांनी काळजी घ्यावी. तसेच नफेखोरांवर तातडीने कारवाई करावी अशा सूचनाही मुंडे यांनी यावेळी केल्या.

****

No comments: