Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ मार्च २०२३ सायंकाळी
६.१०
****
· विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज सलग बाराव्या दिवशी बाधित.
· भाजप नेते खासदार गिरीश बापट यांचं पुणे इथं दीर्घ आजारानं निधन.
· रोजगार हमी योजनेवरील रोजंदारी दरामध्ये प्रतिदिन २० रुपये वाढ.
· घनसावंगी इथं मॉडेल महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन.
आणि
· हिंगोली धान्य घोटाळा प्रकरणी २० जणांविरुध्द गुन्हा दाखल.
****
संसदेचं कामकाज आज सलग बाराव्या दिवशी विरोधकांच्या गदारोळामुळे बाधित झालं.
लोकसभेत कामकाज सुरू होताच, तालिका अध्यक्ष भर्तृहरी मेहताब यांनी प्रश्नोत्तराचा तास
पुकारला. त्यावेळी काळे कपडे घातलेले विरोधी पक्षांचे सदस्य हौद्यात उतरले आणि रोजच्याप्रमाणे
अदानी समूहाच्या कथित घोटाळ्यासंदर्भात संयुक्त संसदीय समितीच्या मागणीसाठी फलक झळकावत
घोषणाबाजी सुरू केली. यामुळे अध्यक्षांनी कामकाज तासाभरासाठी तहकूब केलं.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ सुरूच होता. तालिका अध्यक्ष
रमादेवी यांनी या गदारोळातच सदनाचं कामकाज सुरू ठेवलं. प्रतिस्पर्धा कायदा सुधारणा
विधेयक सदनानं विरोधकांच्या गदारोळातच संमत केलं. परवा शुक्रवारी ३१ मार्च रोजी कामकाज
होणार नसल्याचा निर्णय यावेळी एकमतानं घेण्यात आला. जैवविविधता सुधारणा विधेयक तसंच
वन सुधारणा विधेयकही सदनासमोर सादर करण्यात आलं. दरम्यान, वारंवार आवाहन करूनही विरोधकांनी
गदारोळ सुरूच ठेवल्यामुळे अध्यक्षांनी सदनाचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित केलं.
राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांनीही कामकाज पुकारताच विरोधकांनी गदारोळ सुरू
केला. त्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाज पुन्हा
सुरू झाल्यावरही गदारोळ कायम राहिल्यानं, सभापतींनी सदनाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब
केलं.
****
अनेक जागतिक आव्हानं असतांनाही भारत आज सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था
असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज लोकशाही शिखर परिषदेला संबोधित
करतांना बोलत होते. लोकशाही ही प्रत्येक व्यक्तीच्या गरजा आणि आकांक्षांएवढीच महत्वाची
आहे. लोकशाही ही केवळ रचना नसून ती एक आत्मा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सबका
साथ, सबका विकास हे मार्गदर्शक तत्वज्ञान असून याचा अर्थ, सर्वसमावेशक विकासासाठी एकत्र
प्रयत्न करणे असा असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
शासकीय योजना जलद आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी, शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राज्यभर
सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबत आज राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार
श्रीवास्तव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद साधला. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर आणि सातारा
जिल्ह्यात पथदर्शी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत ३६ विभागामार्फत ७५ शासकीय
योजनांची माहिती आणि लाभ प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थींना देण्यात येणार
असून यात आणखी योजना वाढवण्यात येणार आहेत.
****
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीष बापट यांचं आज पुणे
इथं दीर्घ आजारानं निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी
सात वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. १९७३ पासून राजकारणात सक्रिय
असलेले बापट हे १९९५ पासून कसबा पेठ मतदारसंघातून सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले
होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते पुण्यातून विक्रमी मताधिक्याने ते निवडून आले
होते. बापट यांच्या निधनानं सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात एक नम्र आणि कष्टाळू नेता म्हणून
ते सदैव स्मरणात राहतील असं म्हटलं आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी बापट यांना श्रद्धांजली
अर्पण केली. एक लोकप्रिय नेता आणि अनुभवी संसदपटू गमावला असं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात राजकारणातलं सर्व समावेशक नेतृत्व हरपलं, या शब्दात
दु:ख व्यक्त केलं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांना श्रद्धांजली
अर्पण करताना, जमिनीशी नाळ असलेलं राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून
गेल्याचं म्हटलं आहे. सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा असलेल्या गिरीश बापट यांच्या निधनानं
पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते
अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
****
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवरील मजुरांच्या रोजंदारी दरामध्ये
वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता रोजगार हमी योजनेवरीला
अकुशल मजुरांना प्रतिदिन २५३ रुपयांऐवजी आता २७३ रुपये मजुरी मिळणार आहे. हे दर येत्या
एक एप्रिलपासून लागू होणार आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत
ग्रामपंचायत, कृषी, वन विभाग, लघुपाटबंधारे, जलसंपदा आदी विभागांत कामं केली जातात.
या सर्व कामांमध्ये कुशल म्हणजे यंत्राद्वारे केली जाणारी कामं आणि अकुशल म्हणजे मजुरांकडून
केली जाणारी कामं यांचं प्रमाण ६० : ४० ठेवणं बंधनकारक आहे.
****
मुंबईत सुरु असलेल्या व्यापार आणि गुंतवणूकविषयक कार्यगटाच्या पहिल्या बैठकीचं औपचारिक उद्घाटन आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
यांच्या हस्ते करण्यात आलं. पहिल्या सत्रात, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, जागतिक
बँक आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड द पॅसिफिक यांनी ‘वृद्धी
आणि समृद्धीसाठी व्यापार’ या विषयावर सादरीकरण केलं. निमंत्रित प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक
कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. जी-२० सदस्य देश, निमंत्रित देश, प्रादेशिक
गट आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे १०० हून अधिक प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले आहेत.
****
जालना जिल्ह्यातील घनसावगी इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित
मॉडेल महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं आज कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या उपस्थितीत
उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्रात ७ ‘मॉडेल कॉलेजेस्’ असून या सर्वांचे नेतृत्व घनसावंगीचं
मॉडेल कॉलेज करेल असं, असा विश्वास कुलगुरुंनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना
आणखी पायाभूत, तांत्रिक सोयी-सुविधा आगामी काळात देऊ असंही कुलगुरू यावेळी म्हणाले.
माजी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
‘मॉडेल कॉलेज’साठी मंजूर ८ कोटी रुपये निधीपैकी उर्वरित ४ कोटी रुपये निधी केंद्राकडून
आणण्याचा प्रयत्न करु, असं टोपे यावेळी म्हणाले. महाविद्यालयाचा गेल्या १२ वर्षांतील
प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला. या महाविद्यालयात सध्या अप्लाईड आणि स्किल बेस्ड
अभ्यासक्रमात ८९० विद्यार्थी शिकत आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात ३३ लाख रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणी आज हिंगोली शहर पोलिस
ठाण्यात २० जणांविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला. जिल्ह्यात जानेवारी ते जुलै २०१९ या
काळात स्वस्त धान्य दुकानदारांना, धान्य वाटप करतांना अतिरिक्त धान्याचे वाटप झाल्याचं
समोर आल्यानं, पुरवठा विभागानं नोटीस देऊन अतिरिक्त वाटप झालेल्या धान्याची रक्कम भरण्याच्या
सूचना संबंधितांना दिल्या होत्या, मात्र अद्याप काही जणांनी रक्कम भरणा न केल्यानं
आज तत्कालीन तहसीलदारासह २० जणांविरुद्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात दोन ते पाच एप्रिल दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव
रथ यात्रा काढण्यात येणार आहे. सहकारमंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. सावे आणि
भाजप शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर इथं
आज यासंबंधी नियोजन बैठक घेण्यात आली, त्यानंतर सावे पत्रकारांशी बोलत होते. यात्रेदरम्यान
सावरकरांच्या आठवणी, भाषणं, लिखाण सर्व सामान्य जनतेला दाखवण्यात येणार असल्याचं सावे
यांनी यावेळी सांगितलं. सावरकरांविरोधातले सर्व आरोप हे निरर्थक असून सावरकरांना मरणोत्तर
भारतरत्न पुरस्कार द्यावा यामागणीसाठी भाजप आग्रही असल्याचं भाजप शहर जिल्हाध्यक्ष
शिरीष बोराळकर यांनी यावेळी सांगितलं.
****
हिंगोली जिल्हा कृषी महोत्सवाचा आज समारोप झाला, या महोत्सवात विविध चर्चासत्र
आणि परिसंवादात करवंद लागवड तंत्रज्ञान याबाबत वसमत तालुक्यातील लिंगी इथले प्रगतीशील
शेतकरी सदाशिव चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं. तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे
डॉ.साईनाथ खरात यांनी सेंद्रीय शेतीबाबतच्या उपाययोजनाविषयी मार्गदर्शन केलं. जालना
इथल्या सिताबाई मोहिते यांनी बचतगटांनी फळ प्रक्रिया तसंच इतर उद्योगाच्या विक्री व्यवस्थेच्या
नियोजनाची माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment