Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 20 September 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २० सप्टेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
· पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार-पीएम विश्वकर्मा योजनेच्या
वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन
· राज्य सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर महिला स्टार्टअप योजनेचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
· जालना जिल्ह्यात एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात सहा प्रवासी ठार-२३ जखमी
आणि
· बांगलादेश विरूद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला ३०८ धावांची आघाडी
****
पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार असल्याचं
प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त
वर्धा इथं झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या कार्यक्रमासाठी वर्ध्याच्या
पवित्र धरतीची निवड केल्याचं सांगत, पंतप्रधानांनी राष्ट्रपिता महात्मा
गांधी आणि विनोबा भावे यांचं स्मरण केलं. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी, केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री जयंत चौधरी, मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
अजित पवार
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात
विश्वकर्मा योजना ही फक्त सरकारी योजना नसून, विकसित
भारतासाठीचा रोडमॅप असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. ते
म्हणाले –
विश्वकर्मा योजना केवल सरकारी
प्रोग्रामभर नही है। ये योजना भारत के हजारो वर्ष पुराने कौशल को विकसित भारत के लिये
इस्तमाल करने का एक रोड मॅप है। आप याद करीयें हमें इतिहास में भारत की समृद्धी के
कितने ही गौरवशाली अध्याय देखने को मिलते है। इस समृध्दी का बडा आधार क्या था? इसका
आधार था हमारा पारंपारिक कौशल।
विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना, ओळखपत्रं आणि प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीने पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात
आली. तसंच या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही पंतप्रधानांच्या
हस्ते जारी करण्यात आलं. ७५ हजार विश्वकर्म्यांना यावेळी कर्जमंजूर करण्यात आलं, यापैकी देशभरातून आलेल्या १८ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कर्जाचे धनादेश
पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर येण्यापूर्वी
पंतप्रधानांनी या ठिकाणी उभारलेल्या विविध कारागीरांच्या कक्षांना भेट देऊन, त्यांनी घडवलेल्या वस्तूंची पाहणी केली. राज्यातल्या सर्व तंत्रशिक्षण संस्थांमध्ये
स्थापन करण्यात आलेल्या संविधान मंदिराची प्रतिकृती देऊन पंतप्रधानांचा सत्कार करण्यात
आला. अमरावती,
इथं पीएम मित्रपार्क या समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी
मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचं
तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास
केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातील तेहतीस केंद्रांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर इथला मुख्य कार्यक्रम
छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सभागृहात झाला. जिल्हाधिकारी दिलीप
स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात २८ केंद्राचा शुभारंभ झाला. आपले कौशल्य आणखी
प्रभावी आणि आधुनिक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या केंद्राचा उपयोग करावा, असं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी केलं.
परभणी जिल्ह्यातल्या १४ केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी
रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत धर्मापुरी इथल्या ब्लेसींग कॉलेज ऑफ नर्सिंग इथं शुभारंभाच्या
थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम झाला. धाराशिव जिल्ह्यात १८ केंद्राचा शुभारंभ झाला. बिल
गेट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात या कार्यक्रमाचं
थेट प्रसारण करण्यात आलं.
****
भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २४ आणि २५ सप्टेंबरला
महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. शाह यांच्या २४ तारखेला नागपूर, छत्रपती संभाजीनगर इथं आणि २५ तारखेला नाशिक, कोल्हापूर
इथं भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद बैठका होणार आहेत.
****
तिरुपती इथल्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा
मुद्दा गंभीर असल्याचं केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज
नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित
केला असून प्रसादाच्या लाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या तुपात प्राण्यांची चरबी आढळल्याची
पुष्टी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या प्रयोगशाळेने दिली आहे. या प्रकरणाची सविस्तर
चौकशी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं जोशी म्हणाले.
****
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण महारेराच्या अध्यक्षपदी
राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंत्रालयात मनोज सौनिक यांना पद आणि गोपनीयतेची
शपथ दिली.
****
मुंबईतल्या पश्चिम उपनगरात लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
यांनी आज जनसंवाद यात्रा काढली. खासदार शिंदे यांनी मालाड, मागाठाणे, कांदिवली,
जोगेश्वरी, दिंडोशी, अंधेरी इथं जनसंवाद बैठक घेऊन नागरिकांशी संवाद साधला.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता बांधण्यात येत आहे.
शामलदास गांधी मार्ग उड्डाणपूल ते वरळीपर्यंतच्या या मार्गाचं ९२ टक्के काम पूर्ण
झालं आहे. उद्या शनिवारपासून हा रस्ता दररोज सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू
राहणार आहे. तर,
रात्री १२ ते सकाळी ७ या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
****
नंदुरबार शहरात काल एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान दोन गटात झालेल्या
वादप्रकरणी ५५ जणांना अटक करण्यात आली आहे. यात चार विधी संघर्ष त्रस्त बालकांचा समावेश
आहे. या प्रकरणी फरार ५४ संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
****
जालना-वडीगोद्री महामार्गावरील मठतांडा गावाजवळ आज सकाळी साडे
आठच्या सुमारास एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात
बसमधील वाहकासह तीन महिला प्रवाशी आणि ट्रकमधील चालक, वाहक
असे सहाजण जागीच ठार झाले. तर एसटी बसमधील २३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी १३
जणांवर जालना इथं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून यापैकी तिघांची प्रकृती
चिंताजनक आहे. एसटी बस गेवराईहून जालन्याला जात असताना बीडकडे जाणाऱ्या संत्र्याच्या
भरधाव ट्रकने धडक दिल्यानं, हा अपघात झाल्याचं बसच्या चालकानं
सांगितलं.
****
नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत
माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले यांनी सर्वाचं काँग्रेस पक्षात स्वागत केलं.
****
चेन्नईत एम एम चिदंबरम मैदानावर सुरु असलेल्या भारत आणि बांगलादेश
यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारतानं ३०८ धावांची आघाडी
घेतली आहे. आज सकाळी भारताचा पहिल्या डाव ३७६ धावांवर आटोपला, भारतानं कालच्या ३३९ धावांवरुन आज डाव सुरु केला. अवघ्या ३७ धावातच भारताचे चार
फलंदाज तंबूत परतले. रविचंद्रन अश्विनने ११३ धावा केल्या. बांगलादेशचा संघ पहिल्या
डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, भारतानं दुसऱ्या डावात २३ षटकांत ३ गडी बाद ८१ धावा केल्या आहेत.
****
अहमदनगर इथं माळीवाडा परिसरात स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात
आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती
केली. आयुक्त यशवंत डांगे यांनी यावेळी शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेशी शपथ दिली, तसंच स्वच्छतेबाबत सूचना दिल्या.
****
स्वच्छता ही सेवा या मोहिमंअंतर्गत नांदेड महानगरपालिकेतर्फे
आज रेल्वे स्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात
आली. आयुक्त डॉ.महेशकुमार डोइफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त कारभारी
दिवेकर यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी विविध शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागी होत तीन टन कचरा उचलला. नांदेड इथं विभागीय
रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांच्या हस्ते एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत
डी. आर. एम. कार्यालय परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आलं.
****
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त परभणी जिल्ह्यात आज विविध ठिकाणी मिरवणुका
काढण्यात आल्या. ईदच्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन असल्यामुळे या मिरवणुका आज काढण्यात
आल्या. ईदगाह मैदानावर या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
****
दसरा आणि दिवाळी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता
पुणे - करीमनगर - पुणे विशेष गाडीच्या ०८ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. पुणे करीमनगर
गाडी पुणे स्थानकावरुन २१ आणि २८ आक्टोबर तसंच ४ आणि ११ नोव्हेंबरला रात्री पावणे अकराला
सुटेल. तर परतीच्या प्रवासात २३ आणि ३० ऑक्टोबर तसंच ६ आणि १३ नोव्हेंबरला करीमनगर
स्थानकावरुन सकाळी ६ वाजता सुटेल असं दक्षिण मध्य रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment