Friday, 20 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 20 September 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २० सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      स्वच्छ, निरोगी आणि विकसित भारत घडवण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा दौऱ्यावर

·      विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी बँकांची महत्त्वाची भूमिका, केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात आतापर्यंत पंधरा लाख कोटी रुपयांच्या विविध योजनांची सुरुवात

आणि

·      बांगलादेशविरुद्ध क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर सहा बाद ३३९ धावा

सविस्तर बातम्या

स्वच्छ भारत, तसंच निरोगी आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या काल मध्यप्रदेशात उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून देशवासियांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं निरीक्षण राष्ट्रपतींनी नोंदवलं. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचं उद्दीष्ट साध्य करायचं आहे, असंही त्या म्हणाल्या.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी होतील. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जंवाटप पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही त्यांच्याहस्ते जारी करण्यात येईल. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचा आरंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेहतीस महाविद्यालयांचा समावेश आहे.

****

विकसित भारताचं ध्येय साकारण्यासाठी देशातील बँकिंग क्षेत्राला अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. त्या काल पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या स्थापनादिन सोहळ्यात बोलत होत्या. आपल्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतानाच, जोखीम कमी करण्यासाठी सुसज्ज असण्याची आवश्यकता सीतारामन यांनी व्यक्त केली. आज होणाऱ्या डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे ४५% व्यवहार भारतात होतात, हे प्रमाण अधिक वाढवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करण्याचं आवाहन सीतारामन यांनी केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. सरकारनं पायाभूत सुविधा, शेतकरी, मध्यम वर्ग, महिला आणि युवक अशा सर्व घटकांसाठी पंधरा लाख कोटी रुपये योजनांची सुरुवात केली आहे. सरकारनं देशात आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला बळकट करण्यासाठी नवनवीन पावलं उचलली आहेत.

****

महिला अत्याचाराच्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यासंदर्भात सरकार काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल बुलडाणा इथं, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले…

 

जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आहे, तसंच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहिण योजनादेखील आमची आहे. ज्या लोकांनी माझ्या मुलीबाळींशी, माझ्या बहिणींशी पंगा घेण्याचं काम केलं, कुठे अन्याय-अत्याचार करण्याचं काम केलं, तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, यांच्यासह अनेक  मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी काल पुण्यात 'परिवर्तन महाशक्ती'ची घोषणा केली. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना सहभागी करून घेण्यासाठी चर्चा केली जाणार आहे.

****

स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय अभियानाचा काल मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करून पाण्याने धुतले जातात, त्यामुळे मुंबईचं प्रदुषण कमी झालं असून, सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

****

स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत काल नांदेड रेल्वे स्थानकावर ‘एकल वापर प्लॅस्टिक’ च्या विरोधात जनजागृती करण्यात आली. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉक्टर विजय कृष्णा यांच्या मार्गदर्शनात जनजागृती फेरी काढण्यात आली. रेल्वेचे अधिकारी आणि वाणिज्य विभागातील इतर कर्मचारी या फेरीत सहभागी झाले.

****


छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगान युनेस्कोचं पथक  विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला भेट देणार आहे. त्या अनुषंगानं या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यात शंकरनगर इथलं एसबीआय बँकेचं एटीएम फोडून वीस लाख ४३ हजार रुपये लंपास केल्याची घटना काल घडली. एटीएम मॅनेजर कैलास कांबळे यांच्या तक्रारीवरून रामतीर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील ग्रामसेवकाला साडे तीन हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलं. ग्रामसेवक ईश्वर डफडे याने तक्रारदाराकडे नमुना आठ-असाठी साडेतीन हजार रुपयांची लाच मागितली होती. डफडे याच्याविरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीनं लातूर जिल्ह्यातील मातंग समाज आणि तत्सम जातीतील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी तीन महिन्यांचं व्यावसायीक प्रशिक्षण मोफत देण्यात येणार  आहे. यासाठी प्रमाणपत्राच्या सत्य प्रती जोडून महामंडळाच्या लातूर कार्यालयात अर्ज सादर करावेत, असं आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.

****

भारत आणि बांगलादेश दरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर भारतानं सहा बाद ३३९ धावा केल्या. रविचंद्रन अश्विन १०२ तर रविंद्र जडेजा ८६ धावांवर खेळत आहेत. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत, अवघ्या ३४ धावांत तीन फलंदाज बाद केले. शुभमन गिल शून्य तर रोहित शर्मा आणि विराट कोहली पत्येक सहा धावा काढून बाद झाले. बांगलादेशच्या हसन महमूदनं चार तर नाहीद राणा आणि मेहदी हसन मिराजनं प्रत्येकी एक बळी घेतला.

****

आमदार संजय शिरसाट यांनी काल नवी मुंबईतल्या सिडको भवन इथं सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. नगर नियोजन आणि विकास क्षेत्रातील अग्रगण्य प्राधिकरण ही सिडकोची ओळख कायम ठेवण्यासह सिडको विकसित करत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसंच सिडकोची इतर उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचं,  शिरसाट यांनी सांगितलं.

****

राज्य महिला आयोगाकडून काल जळगाव इथं महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत जनसुनावणी घेण्यात आली. जिल्ह्यात महिला तक्रारींच्या दाखल ९४ प्रकरणांवर तीन पॅनल कडून सुनावणीची कारवाई करण्यात आली. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यावेळी उपस्थित होत्या.

****

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी यांनी नुकतीच कांही आक्षेपार्ह विधानं केली असून यांच्यावर भाजपने अद्यापही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ काल धाराशिव इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह काँग्रेसचे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस -शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. लातूर इथंही संविधान चौकात काँग्रेस पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत दीर्घकाळ सेवा करुन निवृत्त झालेल्या अभियंत्याचा काल सत्कार करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. निवृत्त अभियंत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत, नव्याने रुजू झालेल्या अभियंत्यांना मार्गदर्शन केलं.

****

नांदेड शहरात ईद ए मिल्लादुन्नबी निमित्त काल जुलूस काढण्यात आले. शहरातील विविध भागातून या मिरवणुका निघाल्या होत्या. शहरातील निझाम कॉलनी येथून निघालेली मुख्य मिरवणूक हबीब टॉकीजपर्यंत नेण्यात आली. या मिरवणुकीत युवक, पुरुष, लहान मुलेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

****

नांदेड जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचं निरीक्षण जिल्हास्तरीय समितीने नोंदवलं आहे. समितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना लागू केली आहे. अशा परिस्थितीत मोबदला देण्यासाठी असलेल्या नियमानुसार पिक विमा कंपन्यांनी २५ टक्के अग्रीम तातडीने द्यावा, अशी सूचना विमा कंपनीला करण्यात आली आहे.   

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 28 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...