Monday, 23 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 23.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 23 September 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २३ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      कर्करोग मूनशॉट उपक्रमाला भारताची मदत, भारत-अमेरिकेदरम्यान सेमिकंडक्टर निर्माण प्रकल्पासाठी ऐतिहासिक करार

·      स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत मराठवाड्यात विविध उपक्रमांचं आयोजन

·      मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनात आज नांदेड आणि लातूर इथं सकल मराठा समाजाकडून बंदचं आवाहन

·      बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी, प्रथमच पटकावलं सुवर्णपदक

आणि

·      चेन्नई कसोटीत भारताचा बांग्लादेशवर २८० धावांनी विजय, मालिकेत

 एक - शून्यनं आघाडी

 

सविस्तर बातम्या

लस निर्मिती आणि लसीकरणासाठी जागतिक आघाडी आणि क्वाड उपक्रमाअंतर्गत कर्करोग मूनशॉट उपक्रमामध्ये भारत, साडेसात दशलक्ष डॉलर्सचं, आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी ४० दशलक्ष लस मात्रांचं योगदान देईल, अशी घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या डेलावेर मध्ये आयोजित कर्करोग मूनशॉट उपक्रमाला संबोधित करताना ते काल बोलत होते. सहज उपलब्ध होऊ शकेल अशी आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याबद्दल क्वाड समुह देशांचा सामायिक निर्धार अशा उपक्रमातून प्रतिबिंबित होत असल्याचं ते यावेळी म्हणाले. या उपक्रमाकरता रोग निदान संच देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, काल पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या उपस्थितीत भारत-अमेरिकेदरम्यान ऐतिहासिक सेमिकंडक्टर निर्माण प्रकल्पासंदर्भात करार करण्यात आला. नवीन सेमिकंडक्टर निर्माण प्रकल्प दूरसंचार, लष्करी आयुधं आणि हरित ऊर्जा निर्मितीसाठी पूरक ठरणार असून,या प्रकल्पामुळे भारत चीप निर्मिती करणारा देश ठरेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

राज्यातल्या प्रकल्पांमध्ये नोकरीसाठी भूमीपूत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे, हे राज्य सरकारचं धोरण असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल नवी मुंबई इथं आयोजित कोळी भवनाच्या भूमीपूजनप्रसंगी बोलत होते. आज राज्यामध्ये विकास पर्व सुरू झालं असून, सरकारने प्रकल्पांना चालना दिली, तसंच कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, असं शिंदे म्हणाले. "वाढवण" बंदराच्या प्रकल्पग्रस्त कोळी बांधवाना देशातलं सर्वात मोठं पॅकेज देण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

***

दलित पॅंथर सारख्या अन्यायाविरोधात विद्रोहाची भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या-साहित्यिकांच्या चळवळीतून आपण पुढे आलो असून, आम्हाला समाजामध्ये व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा आहे, असं प्रतिपादन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. मारवाडी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार आठवले यांना काल नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना आठवले यांनी, राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही प्रमुख घटक पक्षांनी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी चार जागा याप्रमाणे एकूण १२ जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आठवले गटाला द्याव्या, अशी मागणी केली आहे.

****

राज्यात सध्या विरोधी पक्षांकडून रिन्यू पॉवर लिमिटेड हा उद्योग प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याचा दावा करणारं वक्तव्य राज्याची प्रतिमा मालिन करणारं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल वार्ताहरांशी बोलत होते. कोणतेही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हस्तांतरित करण्यात आलेले नाहीत, असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. रीन्यू कंपनीने देखील विरोधी पक्षांचा दावा स्पष्टपणे फेटाळल्याचं त्यांनी सांगितलं.

****

देशभरात राबवल्या जात असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे.  या अभियानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

नांदेडमध्ये काल स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत गोदावरी नदी स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.  नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या मोहिमेसंदर्भात अधिक माहिती दिली.

 

स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत आज गोदावरी घाटाची स्वच्छता करण्याचं नियोजन होतं. यामध्ये व्हीआयटीएम कॉलेज, गुजराथी हायस्कूल, नेहरू इंग्लिश स्कूल, स्वामी समर्थ मंदिर, ज्येष्ठ नागरिक संघ या सर्व जणांनी स्वयंस्फूर्तीनं आज सहभाग घेतलेला आहे. अशा पद्धतीनं नांदेडचं पर्यावरण रक्षण करण्याचं काम महापालिका आणि सर्व समाजाच्या सहयोगाने करण्यात येत आहे. हा कार्यक्रम दोन ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. शहराच्या विविध ठिकाणी आपण स्वच्छतेचे कार्यक्रम घेत आहोत. तरी सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संघांनी आणि पर्यावरण प्रेमींनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं मी याद्वारे आवाहन करत आहे.

****

केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीए सरकारनं तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर पहिले शंभर दिवस पूर्ण केले आहेत. या काळात सरकारनं, पायाभूत सुविधा, समाजकल्याण, शेतकरी, मध्यमवर्ग, महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रीत करून, पंधरा लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले. शहरात झाडांचं प्रमाण वाढविण्यासाठी, नगर व्हॅनलाही सरकारनं मंजुरी दिली आहे.

****

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत

****

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनात काल सकल मराठा समाजाच्या वतीने जालना आणि परभणी जिल्ह्यात बंद पाळण्यात आला.

 

जालना जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़. घनसावंगी, अंबड, तीर्थपुरी, भोकरदन, मंठा या ठिकाणी व्यापार्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवली़.

 

परभणी शहर आणि श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी इथं कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तर आज सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर आणि नांदेड जिल्हा बंदचं अवाहन करण्यात आलं आहे.

****

धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी काल धनगर समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन करण्यात आलं. अहमदपूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीर इथं क्रीडा मंत्री संजय बनसोडे तसंच निलंगा इथं भाजप आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरापुढे हे आंदोलन करण्यात आलं.

****

मराठा आरक्षण प्रकरणी कुणबी नोंदी बाबत तसंच हैदराबाद गॅझेटीयरसह उपलब्ध झालेल्या इतर अनेक महत्वपूर्ण कागदपत्रांबाबत जेष्ठ कायदे सल्लागार आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी प्राधिकृत केलेले वकील यांच्यासह संबंधितांची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी आग्रही विनंती तुळजापुरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे. या कागदपत्रांच्या अनुषंगानं पुढच्या  आठवड्यात धाराशिवच्या जिल्हाधिका-यांसोबतही बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरू झालेल्या ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने खुल्या आणि महिला गटात ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलं. भारताच्या डी. गुकेश आणि अर्जुन एरीगैसी या दोघांनी स्लोव्हेनियाविरुद्धच्या आपापल्या सामन्यांमध्ये विजय नोंदवला, तर महिलांच्या गटात अझरबैजानविरुद्धच्या सामन्यांत दिव्या देशमुख हिनं आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला.

****

चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने बांग्लादेशवर २८० धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या कालच्या चौथ्या दिवशी बांग्लादेशचा संघ ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आवघ्या २३४ धावांवर सर्वबाद झाला. या डावात भारताकडून आर. अश्विननं सहा, रविंद्र जडेजानं तीन आणि जसप्रित बुमराहनं एक गडी बाद केला. शतक झळकावण्यासह सहा बळी टीपणारा रविचंद्रन अश्विन सामनाविर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना कानपूर इथं २७ सप्टेंबरपासून खेळला जाईल.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या आवलकोंडा इथल्या सारनाथ बुद्ध विहाराचं भूमिपूजन काल क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. गेल्या पाच वर्षांत उदगीर आणि जळकोट तालुक्यात जवळपास सहा ते साडेसहा हजार कोटी रूपये निधीची विकास कामं मंजूर करून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती दिल्याचं ते यावेळी म्हणाले. उदगीर आणि जळकोट तालुक्यातल्या विविध रस्ते कामांचं भूमिपूजनही बनसोडे यांच्या हस्ते काल झालं.

****

नांदेड इथं श्रीकर प्रतिष्ठानच्या वतीने दि. मा. देशमुख लिखित गंध मातीचा, शब्द हुंकार, आणि शब्दवेध या तीन कविता संग्रहांचं प्रकाशन काल ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात प्रमुख समिक्षक तसंच वक्ते म्हणून  संत साहित्याचे अभ्यासक, लेखक डॉ. मार्तंड कुलकर्णी हे होते.

****

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथलं जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरत आहे. धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक आणि उर्ध्व भागातल्या धरणांमधून येणारी आवक पाहता पुढील दोन दिवसात कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नगरीकांना सावध राहण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.

****

पुढचे पाच दिवस हाज्याच्या चारही विभागांमधे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...