Wednesday, 24 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 24 September 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

मराठवाड्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि इतर मंत्री या भागांची पाहणी करत आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यात आतापर्यंत ७० लाख एकर शेती नुकसान झालं आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री धाराशिव जिल्ह्यात पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

दरम्यान, पवार यांनी आज सकाळी सोलापूर जिल्ह्यात करमाळा, वीट या गावात पूर परिस्थितीची पाहणी केली. शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये, शक्य ती सर्व मदत सरकार करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. प्रशासनाला तातडीनं मदतकार्य राबवण्याचे आणि नुकसानभरपाईसाठी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या सोमठाणा इथं अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून, एक गुंठा जमिनीचं नुकसान देखील देण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. ई -पिक पाहणीची मुदत देखील वाढवून दिली जाईल असंही भरणे यांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट - कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

 

पालकमंत्री  पंकजा मुंडे यांनी जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जांब समर्थ, कुंभार पिंपळगाव, चिंचोली आदी गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली. परतूर तालुक्यातल्या गोळेगाव इथं देखील त्यांनी भेट दिली. गोळेगावात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे गावातल्या नागरिकांना लोणी या गावात स्थलांतरित करण्यात आलं.

**

लातूर जिल्ह्यातल्या तेरणा नदीपात्रातून सावरी गावात पाणी शिरलं आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सावरी गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली, तसंच ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.

****

विभागातले जवळपास सर्वच जलप्रकल्प पूर्ण भरले असून, मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे.

नांदेडमध्ये विष्णुपुरी प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडण्यात आले असून, सुमारे अडीच लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग केला जात आहे. परिणामी नांदेड शहरातल्या अनेक सखल भागात पाणी शिरलं आहे. गोदावरी काठच्या शंभरहून अधिक कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. नांदेडमध्ये महापालिकेने आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत स्थलांतरणाची संपूर्ण तयारी ठेवली असल्याची माहिती आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. जिल्ह्यात ग्रामीण भागातही गोदावरी काठच्या अनेक गावातली पिकं पाण्याखाली गेली आहेत.

**

माजलगाव धरणातून २१ हजार ७०४, सिना कोळेगाव प्रकल्पातून ६४ हजार ७००, तेरणा मध्यम प्रकल्पातून २२ हजार ६२१, तर येलदरी धरणातून २७ हजार ९९० दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

**

पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९८ पूर्णांक ९० टक्के इतका झाला आहे. धरणात सध्या ६६ हजार ७६९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या धरणातून १८ हजार ८६४ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

****

शेतीचं ऊर्जा आणि वीज क्षेत्रात विविधीकरण करणं ही देशाची गरज आहे, असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. आज नवी दिल्ली इथं  इंडिया बायो एनर्जी अँड टेक्नॉलॉजी एक्स्पोच्या दुसऱ्या आवृत्तीला संबोधित करताना ते बोलत होते. भारतातले ६५ टक्के लोक शेती आणि ग्रामीण भागात गुंतलेले आहेत आणि संकल देशांतर्गत उत्पन्नात त्यांचं योगदान फक्त १४ टक्के आहे, जागतिक बाजारपेठा अनेकदा साखर, मका, तेल आणि सोयाबीन यासारख्या पिकांच्या किमती ठरवतात, ज्याचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम होत असल्याचं गडकरी यांनी नमूद केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत उद्या २५ तारखेला महाश्रमदान अभियान राबवण्यात येणार आहे. एक दिवस, एक तास एक साथ या श्रमदान उपक्रमात सर्व शाळा अंगणवाड्या आणि शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तसंच ग्रामस्थानी सहभाग घ्यावा, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात भोकर ग्रामीण रुग्णालयात उद्या गुरुवारी स्वस्थ नारी सशक्त परिवार अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. भोकर शहर आणि परिसरातील महिला तसंच बालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात २२ सप्टेंबरपासून २३ नोव्हेंबरपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे परभणी - नांदेड या गाडीच्या ६३ फेऱ्या रद्द झाल्या आहेत. अमरावती - तिरूपती ही गाडी अकोला ते पूर्णा दरम्यान तर ओखा - रामेश्वरम्‌ ही गाडी जालना ते पूर्णा दरम्यान ६० मिनिटं उशिरा धावणार आहे.

****

No comments: