Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date – 30 September 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० सप्टेंबर
२०२५
सायंकाळी ६.१०
****
·
दुष्काळी टंचाईच्या
काळातल्या सवलती आणि उपाययोजना अतिवृष्टीच्या काळात लागू करण्याचा राज्य
मंत्रिमंडळाचा निर्णय
·
राज्यात पावसाची काही
प्रमाणात उघडीप-मात्र धरणांतून पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरूच
·
नवरात्रोत्सवात
दुर्गाअष्टमीचा सण आज सर्वत्र भक्तिभावाने साजरा
·
प्रलयंकारी किल्लारी
भूकंपाला ३२ वर्ष पूर्ण-दुर्घटनेतल्या मृतांना प्रशासनाकडून अभिवादन
आणि
·
आयसीसी महिला विश्वचषक
क्रिकेट स्पर्धेत भारत आणि श्रीलंका सामन्याला प्रारंभ
****
दुष्काळी टंचाईच्या काळात ज्या सवलती आणि उपाययोजना केल्या
जातात त्या सर्व अतिवृष्टीच्या काळात लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने
घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती
दिली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची कोणतीच तरतूद नसल्याने आजवर कधीच ओला
दुष्काळ जाहीर झाला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्यात अतिवृष्टीनं
झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यात आला. ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीपोटी २ हजार
२१५ कोटींच्या निधी वितरणला यापुर्वीच मान्यता देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. या मदतीसाठीची ईकेवायसीची अट शिथिल करून अँग्रीस्टॅकच्या आधारे निधी
वितरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे पुढील
दोन-तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची ही रक्कम जमा होणार असल्याचं ते
म्हणाले. दरम्यान,
अतिवृष्टीने राज्यभरात ६० लाख हेक्टर शेतपिकांचं नुकसान
झालं आहे, ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालं त्याची भरपाई देण्यासाठी सर्वंकष धोरण
निश्चित करण्यात येणार असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना
मदत पोहचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्य सरकार कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण आखून
प्रत्येक जिल्ह्यात कर्करोगावर दर्जेदार उपचार उपलब्ध करुन देणार आहे. राज्य
मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. राज्यभरात १८
रुग्णालयांमधे कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध होतील. यासाठी १०० कोटी रुपये
भाग भांडवलाची महाकेअर,
अर्थात महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च
अँड एज्युकेशन फाऊंडेशन ही कंपनी स्थापन केली जाणार आहे.
राज्याचं जागतिक क्षमता केंद्र - ग्लोबल कॅपेबिलीटी सेंटर
धोरण २०२५ आजच्या बैठकीत मंजूर झालं. औद्योगिक, वाणिज्यिक तसंच इतर
वर्गवारीतील ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारण्यास मंत्रिमंडळाने
मंजुरी दिली. यामुळे प्रधानमंत्री कुसुम घटक-ब तसंच अन्य योजनेंतर्गत सौर
कृषीपंपासाठी वीज पुरवठ्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे.
महाजिओटेक महामंडळ स्थापन करण्यास आजच्या बैठकीत मंजुरी
देण्यात आली. याअंतर्गत भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या वापरातून प्रशासनात गतिमानता
आणली जाणार आहे.
****
राज्यात अतिवृष्टी होत असूनही
बँकेकडून शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस देण्यात येत असल्याचं, काँग्रेस
विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत
होते राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजूनही
केंद्राकडून पाहणी पथक आलं नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
****
राज्यात कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं
एका दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत म्हणून देण्याचा निर्णय
घेतला आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. आपलं एका महिन्याचं
वेतन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीस देणार
असल्याचं भरणे यांनी जाहीर केलं आहे.
****
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या छत्रपती संभाजीनगर शाखेतर्फे
पैठण पूरग्रस्त भागात आरोग्य तपासणी शिबीर घेऊन धान्य वाटप उपक्रम राबवला. सुमारे
११० धान्यपाकिटांचं यावेळी वाटप करण्यात आलं. नागरिकांची आवश्यक तपासणी करून औषध
वाटप करण्यात आली.
****
राज्यात पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली असली, तरी
धरणांतून पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरू आहे. येलदरी तसंच सिद्धेश्वर धरणातून
प्रत्येकी ११ हजार घनफूट,
माजलगाव बाराशे, तर जायकवाडी धरणातून एक लाख
आठ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दरम्यान पुरामुळे पैठण -पुणे राज्य महामार्ग तीन दिवस बंद
होता. तो आज पूर्ववत सुरु झाला.
****
राज्यात २०२६ मध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे पक्षाने समन्वयकांची नियुक्ती केली.
यात छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. सुनिल देशमुख यांची नियुक्ती
करण्यात आली आहे.
****
नवरात्रोत्सवात दुर्गाअष्टमीचा सण आज साजरा होत आहे. या
निमित्ताने ठिकठिकाणी होम हवन आणि सप्तशती पाठासह विविध धार्मिक उपक्रम राबवण्यात
येत आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र
मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
****
तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीची आज महिषासुरमर्दिनी
अलंकार महापूजा मांडण्यात आली. भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली
आहे.
दरम्यान, तुळजापूर इथं मंदिर परिसरात बाल
भिक्षेकरी पुनर्वसन मोहीम राबवण्यात आली. दोन सत्रात पार पडलेल्या या मोहिमेत
सकाळी ३ तर दुपारी ४ अशी एकूण ७ बालकांची सुटका करून त्यांना धाराशिव इथल्या बाल
कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आलं.
****
प्रलयंकारी किल्लारी भूकंपाला आज ३२ वर्ष होत आहेत. ३०
सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास झालेल्या या भूकंपामुळे लातूर आणि
धाराशिव जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर जीवीत आणि वित्त हानी झाली. २९
सप्टेंबरला गणेश विसर्जनानंतर रात्री झोपलेले हजारो लोक या भूकंपात मारले गेले तर
अनेक लोक कायमस्वरूपी जायबंदी झाले. या मृतांना आज पोलिसांनी बंदुकीच्या फैरी
झाडून मानवंदना दिली. लातूर इथ स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण
करून सर्व मृतांना अभिवादन करण्यात आलं.
दरम्यान, लातूर जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये
मागील काही महिन्यांपासून भूकंपाचे सौम्य धक्के आणि गूढ आवाज येत आहेत. नागरिकांनी
अफवांवर विश्वास न ठेवता,
कोणतीही घटना आढळल्यास तात्काळ नजीकच्या तहसील कार्यालयाला
कळवावं, असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं केलं आहे
**
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका आज दुपारी गूढ
आवाजाने हादरल्याचं वृत्त आहे. या आवाजाने जमीन हादरल्याचं स्थानिकांकडून
सांगण्यात आलं.
****
सेवा आणि सुशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर
प्रयत्नरत आहे. 'सेवा पर्व'च्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ल यांचा
अंतराळातील ऐतिहासिक प्रवास आणि यातून संशोधनाला मिळणारी प्रेरणा याविषयी जाणून
घेऊ.
आंतरराष्ट्रीय
अंतराळ स्थानकावर पहिले भारतीय अंतराळवीर
म्हणून ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ल
यांनी इतिहास घडवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अंतराळ
संशोधनातील महत्त्वाकांक्षी योजनांचा हा
एक भाग आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहीम-
गगनयानच्या यशाचं हे पहिलं पाऊल आहे.
आज मै विश्वास से कहतां हूं, की ये भारत के गगनयान मिशन की सफलता का पहला अध्याय
है। आपकी यह ऐतिहासिक यात्रा, सिर्फ अंतरीक्ष तक सिमित नही है। यह हमारी विकसित भारत
की यात्रा को तेज गती और नई मजबुती देगी। भारत दुनिया के लिये स्पसे की नई संभावनों
के द्वार खोलने जा रहा है।
अंतराळात
असताना, शुक्ला आणि चमूने भारतीय संशोधन संस्थांनी विकसित
केलेल्या सात सूक्ष्म गुरुत्वाकर्षण प्रयोगांचा संच पूर्ण केला. हे प्रयोग
भविष्यातील ग्रह मोहिमांसाठी आणि दीर्घ कालावधीच्या अंतराळ वस्तीसाठी महत्त्वपूर्ण
डेटा तयार करण्यात उपयुक्त ठरणार आहेत.
****
आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ
झाला. मालिकेतला पहिला सामना भारत आणि श्रीलंका संघांत सुरू आहे. श्रीलंकेने
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला,
अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा, भारताच्या
१४ षटकांत एक बाद ५० धावा झाल्या आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे आजचा सामना
प्रत्येकी ४८ षटकांचा होणार आहे.
****
आंध्रप्रदेशात राजमुंद्री इथं झालेल्या ऑल इंडिया सीनियर
रँकिंग स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या सोनाली मिरखेलकर हिने बॅडमिंटनच्या मिश्र
दुहेरीत विजेते पद पटकावलं. सोनाली ही जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात वाणिज्य
शाखेच्या तृतीय वर्षात शिकत आहे.
****
No comments:
Post a Comment