Saturday, 19 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.12.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 December 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

देशात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं एक कोटीचा आकडा पार केला आहे. काल नव्या २१ हजार १५३ रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या एक कोटी चार हजार ५९९ इतकी झाली आहे. काल ३४७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, देशात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत एक लाख ४५ हजार १३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल २९ हजार ८८५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ९५ लाख ५० हजार ७१२ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख आठ हजार ६५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल ११ लाख ७१ हजार ८६८ कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत १६ कोटी ९० हजार ५१४ चाचण्या करणयात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं. 

****

सीएम डॅशबोर्ड, माय गव्ह ऍप, मुख्यमंत्री हेल्पलाईन आणि तक्रार निवारण पोर्टल अधिक सक्षम करून राज्य शासनाच्या सर्व विभागांना याचा सहज उपयोग करता येईल हे पाहावं, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. महानेटद्वारे मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागातले शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर्स यांच्याशी देखील संवाद साधला. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग हा सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान सुधारणं आणि त्यांना उत्तम सोयी-सुविधा आणि सेवा मिळणं यासाठी व्हावा, त्याकरिता तितकी सक्षम तांत्रिक यंत्रणा असली पाहिजे याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. आवश्यक ते मनुष्यबळ यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुख्य सचिवांना दिले.

****

राज्याचं येत्या पाच वर्षांत सौर प्रकल्पांच्या माध्यमातून १७ हजार ३८५ मेगावॅट वीज निर्मितीचं लक्ष्य अलीकडेच जाहीर केलेल्या अपारंपरिक धोरणात असून, राज्याच्या उद्योग क्षेत्राला हे धोरण पूरक असल्याचं ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्रीज - सीआयआयनं आयोजित केलेल्या 'नूतनीकरण भारत २०२०: कार्बनविरहित औद्योगिक वाढ - नूतनीकरण मार्ग' या ऑनलाइन परिषदेत ते बोलत होते. या धोरणांर्गत उद्योग आणि शेतीला स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यात येणार असल्यानं राज्याच्या आर्थिक क्षेत्रात क्रांती घडून येईल, असं त्यांनी नमूद केलं. नवीन अपांरपारिक ऊर्जा धोरणामुळे या क्षेत्रातल्या उद्योजक आणि गुतंवणुकदारांसाठी नवीन संधी निर्माण होतील, मोठया सौर प्रकल्पाच्या सहाय्यासाठी एक विशेष अधिकारी उपलब्ध असेल, सौर प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जा विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करेल आणि सरकारी जमिनी देखील उपलब्ध केल्या जातील, असं राऊत यांनी सांगितलं. या धोरणाअंतर्गत कृषी पंपांना दिवसा वीज उपलब्ध करण्यासाठी येत्या ५ वर्षांत पाच लाख सौर कृषी पंप देण्याचे लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं आज निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. ते गोव्याला कामानिमित्त गेले असता तिथंच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. भारतीय विद्यार्थी सेनेचे ते अध्यक्ष होते. दक्षिण मध्य मुंबईतून ते सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. लालबाग-परळमध्ये पक्षवाढीचे कामही त्यांनी केले असून या भागांत शिवसेना रुजवण्याच्या कामात रावले यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी पक्षासाठी मोलाचे योगदान देताना अनेक शिवसैनिकही घडवले.

****

कोल्हापूरत इथला आयकर निरीक्षक प्रताप चव्हाण याला दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. डॉक्टराविरुध्द आलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं. काल दिवसभरात ५१ दात्यांनी रक्तदान केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

औरंगाबाद शहरात पर्यटनासाठी पुढच्या महिन्यात पाच इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी ही माहिती दिली. या वातानुकूलित बसचं तिकीट घेतलेल्या पर्यटकांना कोणत्याही स्थळावरून बसमध्ये बसता तसंच उतरता येईल.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा एकोणिसावा भाग आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान ॲडलेड इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात, ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी ३६ धावांची आवश्यकता आहे. सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा दुसरा डाव केवळ ३६ धावांवर संपुष्टात आला. भारताचा एकही फलंदाज दहा पेक्षा अधिक धावा करु शकला नाही. भारताच्या पहिल्या डावात २४४ धावा झाल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात १९१ धावांत सर्वबाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद ५४ धावा झाल्या होत्या.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...