Friday, 28 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 28.10.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  28 October  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ ऑक्टोबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      दहशतवाद विरोधातील लढाई सामुहिकपणे लढण्याची गरज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त.

·      टाटाचा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप - प्रत्यारोप सुरुच.

·      जांब समर्थच्या प्राचीन मूर्तींच्या चोरी प्रकरणात दोन संशयितांना अटक, अकरापैकी पाच मुर्त्याही मिळाल्या.

आणि

·      ऑस्ट्रेलियातल्या विश्वचषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतले आजचे दोन्ही सामने पावसामुळे रद्द.

****

दहशतवादाच्या विरोधातील लढाई सामुहिकपणे लढण्याची गरज असल्याचं मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची विशेष बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले –

मी सर्वच युनायटेड नेशन्सचे मेंबर्स, त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो की मुंबईमध्ये, ताजमध्ये त्यांनी इंटरनॅशनल कॉन्फरन्सचं आयोजन केलं. त्यामध्ये आमचे परराष्ट्रमंत्री जयशंकरजी सहभागी होते. विविध देशांचे रिप्रेझेंटेटीव्ह होते. आणि आतंकवाद विरोधात लढाई जी आहे ती आपण सामुहिकपणे लढतोय आणि हे गरजेचं पण आहे. यासाठीच ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स जी आहे अतिशय महत्वाची आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या या विशेष बैठकीत आज नवीन दहशतवादी आक्रमणांचा सामना करण्यासाठी नवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, आव्हाने, उपाययोजना आणि मानवी हक्कांशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना बैठकीपूर्वी समितीच्या सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली. दहशतवाद्यांना होणारा संसाधनांचा पुरवठा थांबवावा अशी मागणी यावेळी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समितीचे अध्यक्ष आणि गॅबॉनचे परराष्ट्र मंत्री मिशेल मौसाश अडेमो यांनी केली. उद्या ही बैठक नवी दिल्लीत सुरू राहणार आहे.

****

एअरबसचं तंत्रज्ञान असलेला टाटाचा सी-२९५ या मालवाहू विमानांच्या निर्मितीचा प्रकल्प, गुजरातमध्ये बडोद्यात गेल्याच्या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप - प्रत्यारोप सुरुच आहेत. भाजप नेते प्रसाद लाड यांनी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर टक्केवारी घेतल्याचा आरोप केला. त्यावर बोलताना देसाई यांनी असले आरोप सहन करणार नाही, असे सांगत पुरावे देण्याचं आव्हान दिलं आहे. लाड यांचे हे आरोप बालीश असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष स्वतःला घरात कोंडून घेतले. त्यामुळे टाटा एअर बसचा प्रकल्प गुजरातला गेल्याचं सांगत भारतीय जनता पक्षानं उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी ट्विटरवरुन केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी टाटा एअरबसच्या प्रकल्पासंदर्भातील सर्व करार हे वर्षभरापूर्वी झाले आहेत. आता आगामी प्रकल्प महाराष्ट्रात यावेत यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.

राज्यातून एका पाठोपाठ एक उद्योग गुजरातला जात आहेत. यामुळे राज्यातील युवकांचा रोजगार हिसकावला जात असल्याचं मत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राज्यातील सरकार हे गुजरातचं एजंट असल्याची कठोर टीका केली आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या जांब समर्थ इथल्या समर्थ रामदास स्वामी पूजन करत असलेल्या प्राचीन मूर्तींच्या चोरी प्रकरणातल्या दोन संशयितांना जालना पोलिसांनी सोलापूर जिह्यातल्या बार्शी इथून आज ताब्यात घेतलं. शेख राजू शेख हुसेन आणि महादेव चौधरी अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या अकरा मूर्त्यांपैकी पाच मूर्त्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणात अन्य एका संशयिताला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांनी आज वार्ताहारांशी बोलताना दिली.

दरम्यान, या मूर्ती सापडल्यामुळे समर्थ भक्तांनी आज घरोघरी देवासमोर दिवा लावून आणि साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. या शोध कार्यात सहभागी असलेल्या प्रशासनातील सर्व तपास अधिकाऱ्यांचे समर्थ भक्तांनी आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

****

आगामी २०२३ या शैक्षणिक वर्षापासून मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण सुरू करण्यात येणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. धुळे इथं प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आज ही माहिती दिली. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतून शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचं महाजन म्हणाले. मराठीतून शिक्षण घेणं ऐच्छिक असणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचे इंग्रजीतून मराठीत भाषांतर करण्याच्या सूचना नागपूर, अमरावती आणि गडचिरोली या तीन विद्यापीठांना देण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सांवत यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. जिल्ह्यातल्या परांडा, वाशी, इंदापूर आणि कळंब या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सावंत यांनी पाहणी केली. परांडा इथल्या आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्याच्या कुटुंबातील मुलांना दत्तक घेऊन त्यांना पाच लाख रूपयांची तात्काळ मदत दिली. गावांतर्गत रस्त्यांच्या विकासाकरिता पस्तीस कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असल्याचंही सावंत यांनी यावेळी सांगितलं

****

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं येत्या ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी इथं राज्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांसाठी ‘राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा’ या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी दिली. या शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कृषी, विज्ञान, अर्थ, संरक्षण, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जयप्रकाश दांडेगावकर, काँग्रेसच्या आमदार डॉ.प्रज्ञा सातव, आमदार राजू नवघरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आणि उद्योगासाठी कर्ज घेत असताना सिबिल स्कोअरची अट लावू नये, पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना तातडीनं पिक विमा मिळावा, शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करावं, वन्य प्राण्यांपासून शेतीचं नुकसान होऊ नये यासाठी योग्य ती उपाययोजना करावी यासह इतर मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे यावेळी सादर करण्यात आलं.

****

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या विश्वचषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान आणि आयर्लंड तसंच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे चारही संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला. उद्या न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरीभाऊ बागडे यांनी यापुढे विधानसभा आणि लोकसभा यासारख्या निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र हा आपला वैयक्तिक निर्णय असून पक्षाचा निर्णय नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. फुलंब्रीत दीपावली मिलन कार्यक्रमात बोलताना आमदार बागडे यांनी ही घोषणा केली आहे. भाजप पक्षाकडून जो आदेश येईल, त्याप्रमाणे पुढील काळात काम करणार असल्याचं बागडे म्हणाले. ७७ वर्षीय आमदार बागडे १९८५ मध्ये औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून सर्वप्रथम विधानसभेवर निवडून आले. आतापर्यंत ते चार वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. १९९५ ते १९९९ या काळात शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचं मंत्रिपदही भूषवलं होतं.

****

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी साडे सात वाजता राष्ट्रीय एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. असं जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज चौक- बस स्टँड- शाहीर अणाभाऊ साठे चौक- जालना रोड मार्गे जिल्हा क्रीडा संकुल इथं या दौडचा समारोप होणार आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...