Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 June
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०५ जून २०२३ सकाळी ७.१० मि.
****
·
‘महारेल’ने उभारलेल्या नऊ रेल्वे ओलांडणी उड्डाणपुलांचं लोकार्पण तर ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचं मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते भूमिपूजन
·
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचं निधन;आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
·
ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीत उभारणार देशातलं पहिलं कार्बन न्यूट्रल आदिवासी गाव
·
मराठवाड्यासह राज्यभरात काल जोरदार वारे आणि गारपिटीसह पाऊस; बारा जणांचा मृत्यू
·
औरंगाबादच्या जय बाबाजी भक्त परिवाराकडून काल देशात पाचशे
ठिकाणी स्वच्छता मोहीम
·
उस्मानाबाद जिल्ह्यात नवीन चार रुग्णालयांना १५४ कोटी रुपये निधी मंजूर
·
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला आजपासून प्रारंभ
आणि
·
भारतीय क्रीडापटूंची काल विविध स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट
****
केंद्रीय
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या हस्ते, ‘महारेल’तर्फे
महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या, ४४० कोटी रुपयांच्या नऊ रेल्वे ओलांडणी उड्डाणपुलांचं लोकार्पण, आणि नियोजित ७०० कोटी रुपयांच्या ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचं भूमिपूजन काल करण्यात आलं.
महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्यासाठी विशेष मोहिम हाती
घेण्यात आली असून, गतीने ही कामं पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. गडकरी यांनी यावेळी बोलताना, दरवर्षी
११ पूल याप्रमाणे १६ हजार कोटींची कामं करण्यात येणार असल्याचं
सांगितलं. काल लोकार्पण तसंच भूमिपूजन झालेल्या प्रकल्पांमध्ये, मराठवाडयातल्या हिंगोली-नांदेड राज्य महामार्गावर, हिंगोली ते धामणी
रेल्वे स्थानकांदरम्यान दोन पदरी उड्डाणपूल, उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या ढोकी ते उस्मानाबाद दरम्यान दोन पदरी उड्डाणपूल, तसंच लातूर इथं कुर्डुवाडी ते लातूर रेल्वे स्थानकांदरम्यानच्या दोन
पदरी उड्डाणपुलाचा समावेश आहे.
****
ज्येष्ठ अभिनेत्री
सुलोचना लाटकर यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं, त्या ९४ वर्षांच्या
होत्या. कोल्हापूर जिल्ह्यात खडकलाट इथं तानीबाई आणि शंकरराव दिवाण यांच्या पोटी जन्मलेल्या रंगू उर्फ सुलोचना
यांचे आईवडील लहानपणी निवर्तल्यानं, मावशी बनुबाई लाटकर यांनी त्यांचा सांभाळ केला. मास्टर
विनायक यांच्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ या
कंपनीत सुलोचना यांनी १९४३ साली वयाच्या
चौदाव्या वर्षी, ‘चिमुकला संसार’ या चित्रपटात पहिली छोटीशी भूमिका केली. कोल्हापूर इथल्या प्रभाकर स्टुडिओचे प्रमुख भालजी पेंढारकर यांनी
त्यांचं सुलोचना असं नामकरण केलं, तसंच भाषा शुद्धीसाठी मार्गदर्शन केलं. सुलोचना यांनी, दीडशेहून अधिक हिंदी तसंच अडीचशे
हून अधिक मराठी चित्रपटांमधून विविध भूमिका साकारल्या. यामध्ये वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, मोलकरीण, धाकटी जाऊ, भाऊबीज,
मराठा तितुका मेळवावा, सांगत्ये ऐका, साधी माणसं, सासू वरचढ जावई, आदी
मराठी चित्रपटांसह, सरस्वतीचंद्र, बंदिनी,
कटी पतंग, कोरा कागज, मुकद्दर
का सिकंदर, आशा, खून भरी मांग, आदी हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. प्रारंभीच्या काळात
नायिकेच्या भूमिका साकारल्यानंतर सुलोचना यांनी, नंतरच्या काळात
साकारलेल्या चरित्र भूमिका रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. सुलोचना
यांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषणसह विविध पुरस्कारांनी गौरवण्यात
आलं होतं.
त्यांच्या पार्थिव देहावर आज
सायंकाळी मुंबईत शिवाजी पार्क स्मशानभूमीत
अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुलोचना दीदी यांच्यावर
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
दिल्या आहेत. सुलोचना यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक
कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
देशातलं पहिलं कार्बन न्यूट्रल आदिवासी गाव ठाणे
जिल्ह्यात भिवंडीत उभारलं जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी काल भिवंडी इथं पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. केंद्र शासनानं गेल्या नऊ वर्षात राबवलेल्या विविध योजनांची माहिती
त्यांनी दिली, भिवंडी लोकसभा मतदारसंघात एक
लाख ७५ हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा
लाभ घेतला आहे. भिवंडी मतदारसंघात १२१ आदिवासी गावांचा आदर्श
गावं म्हणून विकास करण्यात येत असल्याचंही पाटील म्हणाले.
****
केंद्र सरकारनं देशाच्या ऐतिहासिक उच्च संस्कृतीचं पुनरुज्जीवन केलं
असून, सरकारला देशाच्या उज्ज्वल परंपरेचा अभिमान आहे,
असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. ते काल उल्हासनगर इथं बोलत होते. आपल्या सरकारनं कर्तारपूर कॉरिडॉर,
अयोध्या इथं राम मंदिर अशा अनेक गोष्टींच्या उभारणीत
पुढाकार घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात काल जोरदार वारे आणि गारपिटीसह पाऊस झाला.
या पावसाशी संबंधित घटनांत राज्यात बारा जणांचा मृत्यू झाला, तर वादळी वाऱ्यांमुळे
घरं, दुकानं आणि आठवडी बाजारातल्या विक्रेत्यांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं
उन्मळून पडली, घरावरचे पत्रे उडाले आणि काही घरांच्या भिंती ढासळल्या.
गंगापूर तालुक्यातल्या तुर्काबाद खराडी इथं शेतात काम करतांना वीज पडून कृष्णा मेटे
या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण होपळल्याचं वृत्त आहे. पावसामुळे वैजापूर कृषी
उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या कांद्यांचं नुकसान झालं.
पाचोड आणि दौलताबादच्या आठवडी बाजारात वादळी वाऱ्यानं व्यापाऱ्यांसह
नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर धुळीमुळे वाहनधारकांना वाहन
चालवणं कठीण झालं होतं.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील
पत्रे, दुकानांच्या नावांचे फलक उडून गेले. अनेक ठिकाणी झाडं,
विजेचे खांब उन्मळून पडले. अंबड तालुक्यातल्या रवना, परडा, मठपिंपळगाव, सुखापुरी या
भागात, डाळिंब आणि मोसंबी फळबागांना वादळाचा फटका बसला.
हिंगोली जिल्ह्यात काल अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. औंढा नागनाथ, शिरड शहापूर, वसमत, कळमनुरी,
आखाडा बाळापुर, कन्हेरगावसह अनेक भागात
पाऊस पडला. तर जवळा बाजार परिसरात गारपीट झाल्याचं वृत्त आहे.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात घाटनांदूर इथं वीज पडून भरत मुंडे यांचा मृत्यू
झाला. तसंच एक बैल, दोन म्हशी आणि दोन शेळ्या दगावल्या.
वाशिम जिल्ह्यात रिसोड तालुक्यातल्या मौजे भर जहागीर इथं अंगावर वीज पडल्यानं एकाचा मृत्यू झाला.
मालेगांव तालुक्यांत मुसळवाडी इथं आंबे उतरवताना झाडावर वीज पडल्यानं नारायण गोविंदा
कदम यांचा मृत्यू झाला, अमानवाडी परिसरात अंगावर वीज पडून तीन जण जखमी झाले.
बुलडाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यात किशोर खोडके या शेतकऱ्याच्या अंगावर झाड पडून
मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या राष्ट्रीय
महामार्गावर मलकापूर आणि नांदुरा रस्त्यादरम्यान अवकाळी पाऊस
आणि वादळी वाऱ्यामुळे झाड पडल्यानं
वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
नंदुरबार जिल्ह्यात धुळीच्या वादळात
समोरुन येणारं वाहन न दिसल्यानं बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या
अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधले आठ प्रवासी
गंभीर जखमी झाले. नवापूर तालुक्यातल्या
मासलीपाडा जवळ काल हा अपघात झाला. तळोदा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे वडाचं झाड एका धावत्या कारवर
पडून एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी
झाले. तळोदा तालुक्यात रानात चरायला गेलेल्या जवळपास ३० ते ३५ बकऱ्या
मुसळधार पावसामुळे दगावल्याचं वृत्त आहे.
जळगाव जिल्ह्यात वादळामुळे झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनात तीन
जणांचा मृत्यू झाला. चाळीसगाव बाजार विक्रीसाठी आलेला
मका तसंच ज्वारी कालच्या पावसात भिजून नुकसान झाल्याचं, आमच्या
वार्ताहराने कळवलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात म्हाळादेवी इथं वीज पडून उघडे यांचा मृत्यू झाला. कोपरगाव, नेवासे पाथर्डी तालुक्यासह अनेक ठिकाणी
वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पाथर्डी तालुक्यात पाथर्डी
- बीड राष्ट्रीय महामार्गांवर खरवंडी इथला पथकर नाका कोसळला, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली
नाही.
सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात कमल आडसुळ या
४० वर्षीय महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला, तर सांगोला
तालुक्यात शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेले भगवान व्हनमाने यांचा वीज
पडून मृत्यू झाला. या पावसामुळे जिल्ह्यात आंबे, केळी आणि नारळाच्या बागांचं काही भागात नुकसान झालं आहे.
राज्यात पालघर, नंदुरबार, नाशिकसह अनेक जिल्ह्यात पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी
कळवलं आहे.
****
चंद्रपूर जिल्ह्यात काल रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू
झाला. काल दुपारच्या सुमारास नागपूर वरून नागभीडकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाची समोरून येणाऱ्या बसशी धडक झाली.
या अपघातात चारचाकी मधल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण रुग्णालयात उपचारादरम्यान
दगावल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत औरंगाबाद
इथल्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं, काल महाराष्ट्रासह १९ राज्यात पाचशे ठिकाणी, महाश्रमदान
स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पाचशे
पैकी ३४९ स्थळं ही महाराष्ट्रातली आहेत. ज्यामधे प्राचीन
मंदिरांचा तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या १५१ गड किल्ल्यांचा समावेश
असल्याची माहिती, समन्वयक राजेंद्र पवार यांनी दिली. पैठण इथं पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते काल सकाळी या स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. संत एकनाथ मंदिर आणि गोदावरी घाटांवर या अंतर्गत स्वच्छता करण्यात आली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा, भूम आणि
वाशी तालुक्यात नवीन चार रुग्णालयास १५४ कोटी
रुपये निधी मंजूर करून मान्यता देण्यात
आली आहे. आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजी सावंत
यांनी ही माहिती दिली. शासन आपल्या दारी या मोहिमेच्या
अनुषंगानं जनतेसाठी केलेल्या विकासात्मक कामांचा काल परंडा इथं आढावा घेण्यात आला, त्यावेळी
ते बोलत होते. यावेळी शासनाच्या विविध उपक्रमांचं सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलिन करून उद्घाटन झालं. विविध योजनांच्या लाभार्थ्यांना सावंत
यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले. परंडा इथल्या ऐतिहासिक किल्यातल्या साफसफाईची त्यांनी पाहणी केली.
****
औरंगाबाद इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया आजपासून ऑनलाइन पद्धतीनं सुरू होत आहे. सर्व
अभ्यासक्रमांसाठी १५ जूनपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे. २०
जून रोजी प्राथमिक यादी, तर २८ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी
प्रकाशित करण्यात येईल. चार आणि सहा जुलै रोजी प्रवेश देण्यात
येणार आहेत. संपूर्ण शैक्षणिक वर्षात अध्यापन, परीक्षा आणि निकाल हे सर्व वेळेत व्हावं यासाठी विद्यापीठ
प्रशासन प्रयत्न करत असल्याचं, कुलगुरु
डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितलं.
****
भारतीय क्रीडापटूंनी काल वेगवेगळ्या देशात झालेल्या स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट
केली.
बेल्जिअम इथं सुरु असलेल्या फ्लेंडर्स
चषक २०२३ ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या अमलान बोर्गोहेन यानं पुरुषांच्या शंभर आणि
२०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रत्येकी एक एक सुवर्ण पदक जिंकलं. महिलांच्या शंभर
मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताची सपना कुमारी दुसऱ्या स्थानावर राहिली.
**
दरम्यान, आशियाई २० वर्षाखालील ॲथलेटिक्स स्पर्धेत भारतानं दोन सुवर्ण पदकं पटकावली.
दक्षिण कोरियाच्या येचियोन इथं महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रेजोआना मल्लिक
हिनाने, तर पुरुषांच्या थाळी फेक स्पर्धेत भारतप्रीत सिंह यांनी सुवर्ण पदक जिंकलं.
महिलांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या अंतिमा पालनं कांस्य पदक जिंकलं.
**
जर्मनी इथं सुरु असलेल्या आयएसएसएफ कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत दहा मीटर
एयर रायफल मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या अभिनव शॉ आणि गौतमी भानोत यांनी सुवर्ण
पदक जिंकलं. या जोडीने फ्रान्सच्या जोडीचा १७ - ७ असा पराभव केला. यासोबतच भारतानं
काल या स्पर्धेत एक रौप्य आणि एका कांस्य पदकाचीदेखील कमाई केली.
****
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ७५ वर्षे झाल्यानिमित्त औरंगाबाद
जिल्ह्यात वैजापूर बस स्थानकात वाहक, चालक, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी काल अमृत महोत्सव साजरा केला. यावेळी ७५ वर्षांवरील प्रवाशांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आलं. महामंडळच्या लौकिकासाठी प्रवाशांना सौजन्यपूर्ण सेवा पुरवण्याची तसंच
महामंडळाच्या सर्वांगीण वृद्धी आणि विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा यावेळी
सर्वांनी घेतली.
****
औरंगाबाद इथं काल मध्यवर्ती बसस्थानक तसंच रेल्वेस्थानकावर पथनाट्याच्या
माध्यमातून तंबाखू व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. भारतीय वैद्यक संघटना-आय एम ए च्या औरंगाबाद शाखेच्या महिला आघाडीच्या
वतीनं, या पथनाट्याचं सादरीकरण करण्यात आलं.
****
उस्मानाबाद तालुक्यात मौजे मेडसिंगा इथं काल पर्यावरणासाठी जीवनशैली या उपक्रमांतर्गत महिला, युवती आणि युवकांना पौष्टिक तृणधान्याची ओळख करून देण्यात आली. पद्मश्री साखरे यांनी उपस्थितांना
ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा,
आदी धान्यांबाबत माहिती दिली. पर्यावरणासाठी जीवनशैली वर आधारित हरित शपथ यावेळी घेण्यात आली .
****
बीड जिल्हयात शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी, शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक सुरक्षितेबाबतची पाहणी करुन, कुटुंबाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात येत
आहे. तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी
सेविका, कृषी सहाय्यक तसंच शिक्षक यांच्याकडून
प्रत्यक्ष भेटी घेण्यात येत आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांनी सर्वेक्षण पाहणी
विवरणपत्र निःशुल्क भरणा करुन घ्यावं, कोणत्याही खाजगी
व्यक्ती किंवा खाजगी इंटरनेट कॅफेवर पैसे देवून विवरणपत्र
भरुन घेवू नये, असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी केलं आहे.
****
लेखक दलित असू शकतो, पण साहित्य दलित नसतं, असं ज्येष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब कसबे
यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं डॉ ऋषिकेश कांबळे यांच्या कृतज्ञता सोहळ्यात
बोलत होते. मराठी साहित्यात सृजनशील लेखकांची कमतरता असल्याची खंत डॉ कसबे यांनी यावेळी
व्यक्त केली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात
तुळजापुर तालुक्यातल्या उमरगा चिवरी इथं आमदार निधीतून मंजूर करण्यात आलेल्या
सभागृहाचं भूमिपूजन, काल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. 'महाबजेट आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांना
अर्थसंकल्पातल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती, पाटील
यांनी यावेळी दिली.
****
No comments:
Post a Comment