Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
· शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता आणि मानवतेची जोड
देण्याची आवश्यकता राज्यपालांकडून व्यक्त
· राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी
एक वाजता जाहीर होणार
· राज्यातील सर्व अकृषी वीज ग्राहकांचे वीजमीटर बदलून स्मार्ट
मीटर लावण्यात येणार
आणि
· मलेशियन मास्टर्स बॅटमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूला
उपविजेतेपद
****
शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता
आणि मानवतेची जोड देण्याची आवश्यकता राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली आहे. रामकृष्ण
मठ आणि मिशनच्या गेले वर्षभर चाललेल्या शताब्दी वर्षाची सांगता मुंबईत वांद्रे इथं
झाली, त्यावेळी ते बोलत होते. विविध आजारांच्या उपचारासाठी मुंबईत येणारे रुग्ण तसंच
त्यांच्या नातलगांसाठी निवासी व्यवस्था असलेले 'माँ शारदा भवन' उभारल्याबद्दल
मिशनचे कौतुक करून राज्यपाल बैस यांनी समाधान व्यक्त केलं. रामकृष्ण मिशनने शाळांशी
रचनात्मक सहकार्य प्रस्थापित करावं, असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी
केलं.
****
पावसाळ्यात मुंबईत पाणी कोठेही तुंबू नये, यासाठी
योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महापालिकेकडून मुंबईतील नालेसफाई युद्धपातळीवर
सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आज मुंबईत नालेसफाईची
पाहणी केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, पुण्यात पोर्शे कार अपघात
प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अनधिकृत पब आणि बारवर कारवाईच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी
दिल्या आहेत. जे पब किंवा बार निर्धारित वेळेनंतर सुरु असतील अशांवरही कारवाई होणार
असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुणे प्रकरणात आपण स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो
असून, दोषींवर कारवाई होणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.
****
राज्य माध्यमिक - उच्च माध्यमिक मंडळातर्फे
घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर
होणार आहे. मंडळाच्या विविध सहा संकेतस्थळांवर हा निकाल बघता येईल. गुणपडताळणीसह गुणपत्रिका
छायाप्रतींसाठी परवा २८ मे पासून ११ जूनपर्यंत संकेतस्थळावरच ऑनलाइन पद्धतीनं अर्ज
सादर करता येईल. दरम्यान,
जुलै-ऑगस्टमध्ये नियोजित पुरवणी परीक्षेसाठी ३१ मे पासून संकेतस्थळावरून
ऑनलाइन अर्ज भरता येईल.
****
पवित्र हज यात्रेला उद्यापासून प्रारंभ होत
आहे. उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक हजार ६४० मुस्लिम भाविक रवाना होणार आहेत.
अल्पसंख्यांक विभागाद्वारे शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या हज हाऊस इथं यात्रेकरूंना
यात्रे विषयीची सर्व माहिती आणि प्रशिक्षण केंद्रीय हज कमिटी तसंच हज कमिटी ऑफ महाराष्ट्र
यांच्या वतीने देण्यात आले आहे.
****
दिग्दर्शक पायल कापडीया यांच्या 'ऑल
वुई इमॅजिन ऍज लाईट'
या चित्रपटानं कान चित्रपट महोत्सवात ग्रॅण्ड पिक्स हा प्रतिष्ठेचा
पुरस्कार पटकावत इतिहास घडवला आहे. हा चित्रपट गेल्या गुरुवारी या महोत्सवात
दाखवण्यात आला. गेल्या तीस वर्षाच्या कान चित्रपट महोत्सवात मुख्य स्पर्धेत दाखल झालेला
त्याचप्रमाणे कोणत्याही भारतीय महिला दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट आहे.
****
राज्यातील सर्व अकृषी वीज ग्राहकांचे सध्याचे
वीजमीटर बदलून लवकरच स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. राज्यात कृषिपंपांच्या वीजजोडण्या
वगळता महावितरणच्या सर्व लघुदाब वर्गवारीतील दोन कोटी ४१ लाख वीजग्राहकांकडं हे स्मार्ट
मीटर मोफत लावण्यात येणार आहे. यामुळं सध्याच्या पारंपरिक मीटरचे रीडिंग घेणं, वीजबिल
तयार करणं आणि ते वितरीत करणं बंद होणार आहे. रिचार्ज करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइनचे
सर्व पर्याय खुले राहतील. मीटर रिचार्ज केल्यानंतर वीजपुरवठा सुरु होईल. यामुळे ग्राहकसेवा
आणखी तत्पर होणार असल्याचं,
महावितरणनं कळवलं आहे.
****
बीड जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत ८२ हजार
५४५ कुणबी,
मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात
आलं आहे. या प्रमाणपत्रांसाठी दाखल तीन हजार ६६८ अर्जांवर काम सुरू असल्याची माहिती
निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं भरडधान्य कृषी उत्पन्न
बाजार समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या आंबा आणि भरड धान्य महोत्सवाचा आज समारोप झाला.
नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याच्या विविध जातींची खरेदी करून ग्राहकांनी महोत्सवाला
उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भरड धान्यापासून बनवलेल्या नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांनाही
ग्राहकांची पसंती मिळाली. छत्रपती संभाजीनगर अथल्या जागरूक नागरिक मंच च्या वतीने महोत्सवात
भरड धान्या विषयी जनजागृती करण्यात आली. मंचाचे सदस्य चंद्रकांत वाजपेयी यांनी नागरिकांना
दररोजच्या आहारात भरड धान्याचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
मिलेटस् - श्रीअन्न अर्थात
भरडधान्य हे भविष्याचं धान्य आहे. कारण पावसाळा, उन्हाळा, तापमान वगैरे हे सगळं सहन
करण्याची शक्ती ही गहू-तांदुळाच्या रूपामध्ये नसून ही भरडधान्याच्या ज्वार, बाजरी वगैरे
रोग प्रतिरोधक धान्य आहे. संपूर्ण समाजाला देशाला आवाहन करतो आम्ही, की आपण नागरिकांनी
दररोज आपल्या आहारात मिलेटस्चा उपयोग करावा.
****
मलेशियन मास्टर्स बॅटमिंटन स्पर्धेच्या महिला
एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूला चीनच्या वांग-झी-यी हिच्याकडून पराभव पत्करत, उपविजेतेपदावर
समाधान मानावं लागलं. आज क्वालालंपूर इथं झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूनं
पहिला गेम २१-१६ अशा फरकानं जिंकला, मात्र वांग हिनं पुढचे दोन्हीही
गेम्स ५-२१,
१६-२१ अशा फरकानं जिंकत, अजिंक्यपद पटकावलं.
****
इंडियन प्रिमियर लीग - आय पी एल क्रिकेट
स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात अंतिम सामना होणार आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम् मैदानावर संध्याकाळी
साडेसात वाजेपासून हा सामना खेळवला जाणार आहे.
****
जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यात काल
रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात ६०० हेक्टरवरील केळी बागांचं मोठं नुकसान
झालं असून,
तालुक्यात सुमारे २५५ घरांची पडझड झाली आहे. प्रांताधिकारी देवयानी
यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार बंडू कापसे यांच्या सूचनेनुसार
महसूल विभागामार्फत पंचनामे केले जात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तसंच केज तालुक्यामध्ये
काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात केज बसस्थानकातील मोठे फलक, तसंच
झाडाच्या फांद्या तुटून पडल्या, काही घरांवरील पत्रे उडाले, राष्ट्रीय
महामार्गावरील वाहतुकही काही काळ ठप्प झाली होती. वीज वाहक तारांचे काही खांब या वादळात
जमीनदोस्त झाल्यानं,
वीज पुरवठाही विस्कळीत झाला आहे.
****
लातूर जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त
शिवार अभियानाला गती देण्यात आली आहे. लातूर तालुक्यातील धानारी इथल्या तावरजा मध्यम
प्रकल्पातील गाळ उपसाच्या कामाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते प्रारंभ
करण्यात आला. नाम फाऊंडेशनच्या सहकार्यातून हा गाळ उपसा सुरू आहे. जिल्ह्यात जवळपास
५२ प्रकल्पातील गाळ उपसा केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी
या अभियानात सहभागी होऊन तलाव गाळमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी
वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.
****
जालना औद्योगिक वसाहतीत भारतीय स्टेट बँकेचे
एटीएम, गॅस कटरच्या सहाय्यानं कापून चोरट्यांनी रोख रक्कम लांबवल्याची घटना निदर्शनास
आली आहे. या एटीएममधले सुमारे आठ लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचा पोलीस सूत्रांचा
अंदाज आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील
सगरोळी इथं वाळू वाहतूक करणाऱ्या एका हायवा वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरुण
जागीच ठार झाले. आज सकाळी ही घटना घडली. मोईन वजीरसाब शेख आणि नवीन संग्राम पवार अशी
मृतांची नावं आहेत.
****
परभणी इथल्या संबोधी अकादमीच्या वतीनं तेवीसावा
सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आज पार पडला. या सोहळ्यात ६२ जोडपी विवाहबद्ध झाली
आहेत. खासदार फौजिया खान यांनी या सोहळ्याला हजेरी लावत नवविवाहित दाम्पत्यांना शुभेच्छा
दिल्या.
****
दिवंगत केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी
मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात
आलं. लातूर जिल्ह्यात बाभळगाव इथं विलास बागेत देशमुख कुटूंबीय तसंच मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत विलासराव यांना आदरांजली वाहण्यात आली.
या निमित्तानं भावस्वरांजली हा कार्यक्रमही सादर करण्यात आला.
****
बीड जिल्ह्यात सध्या ४३३ टँकरनं पाणी पुरवठा
केला जात आहे. बीड तालुक्यात १४० तर गेवराई तालुक्यात ११५ टँकर सुरू आहेत. तलावांतील
पाणी पातळी कमी झाल्यानं जिल्ह्यातील ६६५ खासगी विहिरी आणि बोअर प्रशासनानं पाणी पुरवठ्यासाठी अधिग्रहित केले आहेत.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागात
रेल्वेचा रोलिंग ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड रायचूर ही गाडी उद्यापासून
येत्या ३० जूनपर्यंत तांडूर ते रायचूर दरम्यान, तर रायचूर परभणी ही गाडी उद्यापासून
येत्या एक जुलैपर्यंत रायचूर ते तांडूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या दोन्ही
गाड्या अनुक्रमे तांडूर ते नांदेड तसंच तांडूर ते परभणी दरम्यान धावणार असल्याचं, दक्षिण
मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे
****
No comments:
Post a Comment